Sunday 8 December 2013

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या परिणामाला Modi  Factor  पेक्षाही राज्यकर्त्याची भोंगळ आणि चुकलेली आर्थिक धोरणे, निष्क्रिय आणि दिशाहीन प्रशासन, अनिर्बंध प्रमाणात वाढलेली महागाई  आणि आकाशही व्यापणारा भ्रष्टाचार हीच कारणे महत्त्वाची ठरलेली असावीत.

इतरत्रही ''आप'' सारखा सक्षम पर्याय मिळाला तर Modi Factor ची कसोटी लागेल, यात शंका नाही.

अन्नसुरक्षा कायद्यासारख्या लोकप्रिय योजना आता लोकांना फसवू शकणार नाहीत, असे वाटते. जनसामान्याच्या जीवनात मूलगामी परिवर्तन घडवू आणणारी धोरणेच आता आकर्षक ठरतील किंवा ठरावित, असे वाटते.

हिंदुत्ववाद किंवा धर्मनिरपेक्षता या बाबीही आता फार प्रभाव टाकू शकतील , असे वाटत नाही.  राजकीय पक्षाच्या  हिंदुत्ववादाचा थोडा सकारात्मक आणि अधिक नकारात्मक आणि त्यांच्या धर्मनिरपेक्षतेचा थोडा सकारात्मक आणि थोडा  नकारात्मक,परिणामी शुन्य परिणाम होईल, असे वाटते. नवीन पिढीला यात फारसा रस नाही, हे राजकीय पक्षांनी शक्य तितक्या लवकर लक्षात घेण्याची गरज आहे. 

Sunday 1 December 2013

जी बाब वैज्ञानिक पद्धतीद्वारे सिद्ध होऊ शकत नाही, तिला अस्तित्वात राहण्याचा अधिकार नाही. थोडक्यात अशी बाब अस्तित्वात असू शकत नाही. हा निष्कर्ष वैज्ञानिक दृष्टीकोनाची निष्पत्ती आहे.
याचा दुसरा अर्थ , ज्ञान मिळविण्याचा वैज्ञानिक पद्धतीशिवाय इतर मार्ग नाही, असाही निघतो. 
मानवी जीवनात आपल्याला आणि इतरांना असेही अनुभव आलेले असतात की , ज्यांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण करता येत नाही. याचा अर्थ या प्रकारच्या अनुभवाचे कालांतराने वैज्ञानिक स्पष्टीकरण मिळणार आहे किंवा हे अनुभव म्हणजे केवळ आभास आहेत. 
बरेच अनुभव वैज्ञानिक नियमाशी पूर्णपणे विरोधी असतात. मग ते वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार  निश्चितपणे आभास ठरतात. 
आपल्याला काय वाटते?

Monday 25 November 2013

भारतीय कार्मावादाचा सिद्धांत माणसाची कार्यप्रेरणा  नष्ट करतो. तो त्याला निराशाग्रस्त बनवितो . अशा प्रकारची सर्वसाधारण समजूत आहे. तथापि कर्मवाद समजून घेतल्यावरही आपल्याला असेच वाटते काय, हे पाहायला हवे.
कर्मवाद थोडक्यात--
१) केलेल्या प्रत्येक मानसिक, वाचिक, शारीरिक कर्माचे चांगले- वाईट फळ मिळतेच.
२) हे फळ मागच्या किंवा या जन्मात केलेल्या कर्माचे असून ते या जन्मात किंवा पुढील जन्मात  मिळू शकते.
३) चांगल्या कर्माचे फळ चांगले आणि वाईट कर्माचे फळ वाईट मिळते.
४) याचा अर्थ चांगले फळ मिळवायचे असेल तर चांगलेच कर्म करावे लागते
५) आपण सध्या दु:खात  असूत तर आपण आपल्या पूर्वी केलेल्या वाईट कर्माचे नियत फळ भोगत आहोत, असे समजावे. त्यासाठी इतरांना  दोष देण्याचे कारण नाही .
६) दु:खाच्या  परिस्थितीतही आपण चांगलेच काम करीत राहिलो तर आपल्याला या चांगल्या कामाचे फळ पुढे निश्चितपणे मिळणारच आहे. याचा अर्थ , दु:ख भोगून संपणारच आहे आणि चांगली स्थिती येणारच आहे .
७) आपण वाईट परिस्थितीत असताना वाईट वागलो तर आपली प्राप्त परिस्थितीतून विशिष्ट वेळी सुटका होइलही . परंतु आपण या परिस्थितीत असताना केलेल्या वाईट कर्माचे फळ आपणास पुढे निश्चितच मिळणार आहे.
कर्मवादाच्या वरील स्वरूपामुळे मला जगण्याचे पुढील तत्त्वज्ञान प्राप्त होऊ शकते.--
१) वाईट परिस्थितीत किंवा दु:खातही चांगले कर्म करणे मुळीच सोडू नये.
२) आपल्यावर इतर कोणामुळे दु:खी स्थिती ओढवली असली तरी सुडाची भावना न ठेवता आपण चांगलेच वागावे. कारण वाईट वागून तात्पुरते बरे वाटले तरी  पुढे दीर्घकाळाचे दु:ख ठेवलेलेच आहे.
थोडक्यात -----------
भारतीय कर्मवाद  व्यक्तीला नेहमीच चांगले कर्म करण्याची  प्रेरणा देतो.
तो व्यक्तीला कधीच निष्क्रिय किंवा निराशावादी बनवित नाही.
आपल्याला काय वाटते ? 

Wednesday 20 November 2013

साचलेला किंवा साचू पाहणारा मानवी जीवनाचा प्रवाह प्रवाहित करणे, मानवी जीवनाची गुणवत्ता  लक्षनिय प्रमाणात वाढविणे तसेच तळातील माणसाला तिथून काढून मुख्य प्रवाहात आणणे ही आणि अशा स्वरुपाची उद्दिष्टे साध्य  करण्यात अत्युत्कृष्ट योगदान देणारी व्यक्ती ''भारतरत्न'' या पारितोषिकास पात्र ठरावी, असे वाटते .

मानवी जीवनाचे शारीरिक, मानसिक,वैचारिक,बौद्धिक, राजकीय,आर्थिक,धार्मिक, सांस्कृतिक,सामाजिक असे अनेक पैलू आहेत. मानवी जीवनाची  प्रगती म्हणूनच अशा अनेक पैलूवर अवलंबून असणे स्वाभाविक आहे.

क्रीडा , संगीत ही मानवी संस्कृतीची एकेक अंगे आहेत. केवळ कोणत्याही एका अंगाच्या प्रगतीमुळे मानवी जीवनाची सर्वंकष प्रगती होणे शक्य नाही.  अशा एकेक क्षेत्रात अत्युत्कृष्ट योगदान देणाऱ्यास त्या त्या क्षेत्रातील सर्वाच्च पारितोषिक बहाल करणे समजू शकते. परंतु "भारत रत्न '' हे पारितोषिक मात्र  मानवी जीवनाच्या सर्वंकष प्रगतीला प्रेरक ठरणाऱ्या महनीय व्यक्तीसाठी राखून ठेवणे आवश्यक आहे . अन्यथा या पारितोषिकाचे लवकरच अवमुल्यन झाल्याशिवाय राहणार नाही.

निवडणुकीवर डोळा ठेऊन लोकमताच्या लाटेवर आरूढ होणाऱ्या  नेतृत्वाकडून होणाऱ्या  या प्रकारच्या निर्णयातून देशाला काय संदेश मिळत आहे, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. लोकमत घडविणे हे नेतृत्वाचे काम आहे,लोकमताच्या लाटेवर  आरूढ होऊन खुर्च्या टिकविणे नव्हे.

या देशातील तरुण वर्ग हा स्वत:ची जबाबदारी ओळखू शकत नाही  किंवा आंधळेपणाने तो ती टाळत आहे.  कोणाला तरी देव मानून, त्याच्यामध्ये स्वत:चे प्रतिबिंब पाहणे आणि त्याच्या खांद्यावर आपले सगळे ओझे टाकून निवांत होणे, ही भारतीयांची प्रवृत्ती आहे. विभूतीपुजा  हा आपला स्थायीभाव आपल्या चिकित्सेला अवकाश देत नाही.

आपल्या श्रद्धा, आपली भक्ती, आपले प्रेम या बाबी  आपल्या  चिकित्सेतील फार मोठे अडथळे आहेत. या बाबी म्हणजे आपल्या दृष्टीपुढील झापडे असून त्यामुळे आपल्याला आपल्या पुढील मार्ग तसेच आपले हित आणि आपले भवितव्य दिसू शकत नाही.

आपला देश आज खरोखरच अंधारात चाचपडत आहे. आपली शोकान्तिका म्हणजे आपण अंधारात चाचपडतो आहोत, हेच आपल्याला कळत नाही आणि कळले तरी आपण ते मान्य करीत नाही . यालाच आपण आपला सकारात्मक दृष्टीकोन म्हणतो. 

Thursday 3 October 2013


वारकरी संप्रदायाला ब्राह्मणांनी हायजॅक केले. वारकरी संप्रदायाचे आजचे बहुतांश नेते ब्राह्मण आहेत, हा या हायजॅकिंगचाच परिणाम आहे . ब्राह्मण महानुभाव संप्रदायाला  हायजॅक करु शकले नाहीत.मग त्यांनी या पंथाचा द्वेष व बदनामी करण्यास सुरुवात केली. हा द्वेष तरी किती करावा? तर या द्वेषाचा व बदनामीचा एक इतिहास बनला.
मला वाटते, चक्रधरस्वामींनी मनुस्मृतीप्रणीत ‘ब्राह्मणश्रेष्ठत्व’ या तत्त्वाचा नि:संदिग्धरित्या विरोध केला. तसेच त्यांनी वेदाची अपूर्णता घोषित करून देवताजानित कर्मकांडांची निरर्थकता स्पष्ट केल्यामुळे ब्राह्मणी अर्थव्यवस्थेवर संकट आणून ठेवले.
ब्राह्मणी परंपरा काहीही सहन करू शकेल. तुम्ही कोणतेही तत्त्वज्ञान मांडा, कोणत्याही देवतांची आराधना करा. त्याविषयी या परंपरेला कोणताही आक्षेप नसतो. तथापि हे सर्व ब्राह्मणश्रेष्ठत्व, वेदप्रामाण्य, वर्णाश्रम धर्म, देवताजनित कर्मकांड या बाबी मान्य करून, त्यांचे आचरण करून, किमान ही चौकट मान्य करून त्या चौकटीत करा, असा या परंपरेचा आग्रह असतो.
मनुस्मृतिप्रणीत धर्मशास्त्राच्या या गाभ्यालाच स्वामींनी स्पष्टपणे विरोध केला. असा विरोध करताना त्यांनी कोणत्याही तडजोडी केल्या नाहीत किंवा तथाकथित समन्वयाचीही भूमिका घेतली नाही. त्यासाठी त्यांनी तत्कालीन धर्मसत्तेच्या प्रचंड विरोधाला तोंड दिले.
संतांनीही देवताभक्ती आणि देवताजानित कर्मकांड यांचा खणखणीत विरोध केला. परंतु संत या बाबतीत फार आग्रही राहू शकले नाहीत. संतांच्या समन्वयवादी दृष्टिकोनाची ही निष्पत्ती होती.
त्यामुळेच ब्राह्मण वारकरी पंथाला सहजपणे हायजॅक करू शकले व त्यांनी या पंथाला सनातनी धर्माचा एक भाग करून टाकले.
महानुभाव संप्रदायाला  हायजॅक करता आले नाही. मग परंपरेने या पंथाची पद्धतशीरपणे बदनामी करून त्याचे यशस्वीपणे खच्चीकरण केले. तडजोड करा, नाही तर उद्ध्वस्त व्हा, हे परंपरेचे धोरण आहे.
प्रसिद्ध विचारवंत प्रभाकर वैद्य यांचा ‘संतांनीसुद्धा वाळीत टाकलेला संतश्रेष्ठ चक्रधर’ हा ग्रंथ या विषयावर चांगलाच प्रकाश टाकतो.
चक्रधर स्वामींचे  विचार –
रज काळात स्त्रियांचा विटाळ मानणे अत्यंत हास्यास्पद ठरविले आणि आपल्या अनुयायांना तसे करू दिले नाही.
गाय पवित्र आणि कुत्रे अपवित्र अशा कल्पना हास्यास्पद ठरविल्या .
मातंग आणि ब्राह्मण हे दोघेही  मनुष्य देहधारीच असल्याने त्यांच्यांमधील श्रेष्ठ कनिष्ठत्व ही कल्पना निरर्थक ठरविली. आणि हे प्रत्यक्षात आणले.
स्त्री-पुरुष यांच्यातील चैतन्य एकाच प्रकारचे असल्याने त्यांच्यात भेद मानणे निरर्थक आहे, असे मानले.
कर्मकांड , व्रतवैकल्ये यांचा विरोध केला. देवताभक्ती अनुपयोगी असल्याचे सांगितले.
शेवटी—
देव धातूचा नव्हे
देव पाषाणाचा नव्हे
देव काष्ठाचा नव्हे
देव मातीचा नव्हे
देवा पटीचा(वस्त्राचा ) नव्हे
देव चित्रीचा नव्हे
      धातूचा तो झिजेल
      पाषाणाचा तो फुटेल
      काष्ठाचा तो मोडेल
      मातीचा तो  विरेल
      पटीचा तो फाटेल
      चित्रीचा तो पुसेल
            देव तो अच्छेदू अभेदू की.

                  इति चक्रधर .

Monday 16 September 2013

ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी गणेशवंदन केलेले आहे, हे आपल्याबरोबरच बहुतेक सर्व अभ्यासकांचे आणि सर्वसामान्य वाचकांचेही मत दिसते. मी मात्र जेंव्हा जेंव्हा ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय वाचतो किंवा कोणत्याही लेखकाचे या बद्दल मत वाचतो, तेंव्हा तेंव्हा मला याविषयी प्रश्न पडतो.
आता मी या विषयावरील माझे मत आपल्यासमोर विचारार्थ ठेवतो.
भगवद्गीतेमध्ये अनन्यभक्तीचा आग्रह धरलेला आहे. ‘अनन्य भक्ती’ याचा अर्थ एका ईश्वराशिवाय किंवा श्रीकृष्णाशिवाय इतर कोणत्याही देवदेवतांची भक्ती करायची नाही. ज्ञानेश्वरांनाही याची कल्पना असणे स्वाभाविक आहे.
असे असताना ज्ञानेश्वर गणेशवंदन  कसे करतील, हा माझ्यापुढील प्रश्न आहे.
आपण प्रथम ज्ञानेश्वरीच्या पहिल्या काही ओव्या उद्धृत करूयात.-
‘ओम नमोजी आद्या, वेदप्रतिपाद्या
जय जय स्वसंवेद्या, आत्मरुपा’
या मध्ये स्पष्ट दिसते की, ज्ञानेश्वरांनी प्रथम ओंकारस्वरूप व स्वसंवेद्य असणाऱ्या आद्य पुरुषाला वंदन केलेले आहे. गणेशाला नव्हे.
तथापि पुढे त्यांनी---
‘देवा तूची गणेशु, सकलार्थमतिप्रकाशु’
असेही म्हटलेले आहे. यात गणेशाचा स्पष्ट उल्लेख आलेला आहे. असे असले तरीही ज्ञानेश्वरांनी गणेशाला प्रथमत: वंदन केलेले आहे, हे मात्र दिसत नाही. प्रथम त्यांनी त्या एकमेवाद्वितीय परमेश्वरालाच वंदन करून पुढे त्या परमेश्वरालाच म्हटले आहे की, हे देवा परमेश्वरा, तुझ्याच ठायी सर्व एकवटले आहे. लोक ज्याला गणेश म्हणतात, तोही तूच आहेस. थोडक्यात, सामान्यांच्या गणेशालाही त्यांनी  त्या एकमेव ईश्वरातच पाहिले आहे. त्यांना वेगळा गणेश मानण्याची आवश्यकता पडलेली नाही.
ज्ञानेश्वरांनी स्पष्टपणे गणेशवंदन केले नसावे याला पुरावा खुद ज्ञानेश्वरीचाच देता येईल.
ज्ञानेश्वरीचा अध्याय १३, ओवी क्र. ८१५ ते ८२३ पहा. विविध देवदेवता यांचे पूजन करणाऱ्यांना त्यांनी ‘जाण अज्ञानाचा मूर्तु अवतार तो’ (अज्ञानाचा मूर्त अवतार) असेच म्हटले आहे. या ओव्यांमध्ये त्यांनी गणेशाचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे, तो पुढील प्रमाने.
त्यांच्या अज्ञानाच्या अवताराला उद्देशून त्यांनी म्हटले आहे—“ चौथ मोटकी पाहे, आणि गणेशाचाची होये.”
असे आहे तर, ज्ञानेश्वरांनी दुरान्वयाने तरी गणेशाचा प्रथम उल्लेख का केलेला आहे, हा प्रश्न आहेच. गणेशाला वंदनच कारायाचे नाही, तर त्याचा उल्लेखच का केला?
याचेही उत्तर पुढीप्रमाणे देता येईल.—
ज्ञानेश्वरांच्याकाळी प्रथम गणेशवंदन करणे पूर्णपणे रूढ झालेले होते. त्या काळच्या बहुतेक सर्व ग्रंथकारांनी आपल्या ग्रंथारंभी गणेशवंदन केलेले आहे.
थोडक्यात, परंपरा व लोकमत तर गणेशवंदनाच्या बाजूने. ज्ञानेश्वर तर लिहितात भगवद्गीतेवरील भाष्य. भगवद्गीता तर अनन्य भक्तीचा आग्रह धरते.
ज्ञानेश्वरांनी वरील परिस्थितीतून मार्ग काढला. प्रथम वंदन केले आद्यपुरुष परमेश्वराला आणि त्या परमेश्वराच्या ठायीच गणेशाला कल्पून गणेशवंदनाचाही आभास निर्माण केला.
अशाप्रकारे ज्ञानेश्वरांनी लोकभावना व परंपरा या विषयी आदर दाखवून भगवद्गीतेच्या तत्त्वांशीही सुसंगती प्रस्थापित केली.
ज्ञानेश्वर मुळात बंडखोर नव्हतेच. ते एक समन्वयवादी संत होते. त्यांना परंपरा सांभाळत, सांभाळत समाजाचेही प्रबोधन करायचे होते. त्यांच्या ज्ञानेश्वरीत याचा सातत्याने प्रत्यय येतो.
“ज्ञानेश्वरीतील गणेशवंदन” हा देखील ज्ञानेश्वरांच्या समन्वयवादाचा पुरावाच मानता येईल. 

Saturday 7 September 2013

आज चक्रधर जयंती. आजही महाराष्ट्राला चक्रधरस्वामीबद्दल फारशी माहिती नाही.
त्यांचा परिचय आपण त्यांच्या काही वचनांवरून व त्यांच्या काही कृतीवरून करून घेउयात.
समता --- ब्राह्मण म्हणिजे श्रेष्ठ अन मातंग म्हणिजे कनिष्ठ . परी तोही मनुष्यदेहची असे . परि वृथा कल्पना करी.
स्त्रीपुरुष समता ---- पुरुषाचा जीव अन स्त्रियाचा काई जीउलिया ? थोडक्यात, स्त्रीपुरुष एकाच चैतन्याने युक्त आहेत . त्यात लिंगभेद असू शकत नाही.
मानवता ---१) मनुष्य मात्र होवोनी असावे. थोडक्यात , जात, धर्म, वर्ण, श्रीमंत, गरीब इत्यादींचा विचार न करता प्रत्येक माणसात फक्त मनुष्यत्व पहावे.
वैज्ञानिक दृष्टीकोन--- रज कालावधीत स्त्रियांना अस्पृश्य समजण्याचे कारण नाही. कारण नाक, कान,मुख इत्यादी शरीराद्वारावाटे वाहणाऱ्या मळाप्रमाणे तोही एक मळच आहे.
२) गाय म्हणिजे पवित्र अन सुने (कुत्रे) म्हणिजे अपवित्र . परी तोही पशुदेहची अन वृथा कल्पना करी . गायीच्या पावित्र्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्याचा उद्देश नसावा. परंतु कुत्रे अपवित्र का?
स्वातंत्र्य ----- स्वातंत्र्य हा मोक्ष , पारतंत्र्य हा बंध . आपण कवनाचे अधीन होऊ नये . तसेच आपल्या अधीन कोणाला करू नये.
प्रयत्नवाद ---- १) यत्ने न पाविजे ऐसे काई असे ? अर्थात - प्रयत्नाने मिळणार नही असे काही नाही.
२) पडे तव धावावे, अन मरे तव करावे .
कृती ---
१) दाकोबा नावाच्या शुद्र व्यक्तीला मठात घेतले . आपल्या शिष्याकरवी त्याचे पाय धूऊन घेतले . स्वत:च्या पंक्तीत बसवून घेऊन सोबत जेवण घेतले.
२) मातंगाने दिलेला लाडू प्रसाद म्हणून आपल्या सोबतच्या ब्राह्मणांना वाटला अन त्यांना खायला लावला.
३) अंधश्रद्धा , रूढी , धार्मिक कर्मकांड इत्यादींचा नि:संदिग्धरित्या विरोध केला.
४) सर्वसामान्य लोकांसाठी मराठीचा आग्रह धरला . आणि मराठी भाषेत एक स्वतंत्र , सुव्यवस्थित, सुसंगत , तत्त्वज्ञानाच्या बहुतेक सर्व अंगांना कवेत घेणारे , आचाराशी सुसंगत आणि मराठीतील एकमेव दर्शन शास्त्र निर्माण केले.

चक्रधरस्वामींनी आपले अंतिम ध्येय मोक्षच मानले असले तरी त्या ध्येयाप्रत जाण्याचा त्यांचा मार्ग हा सामाजिक सुधारणेच्या, वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या, सामाजिक समतेच्या व मानवतेच्या मैदानावरूनच जातो. अन्यथा साधकाला आपले ध्येयच गाठता येणार नाही.
स्वामींच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्याविषयी अपार कृतज्ञता व्यक्त करून त्यांना अनंत दंडवत करतो.
नोट -- सुलभतेसाठी स्वामींच्या वचनाच्या भाषेत अनेक ठिकाणी बदल केलेले आहेत.
Like ·  · Promote · 

Monday 8 July 2013

जमा महसूलाचा लक्ष्यांक हा निश्चितपणे अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर अवलंबून असतो.
अर्थव्यवस्था ही सातत्याने बदलणारी असते.
त्याचप्रमाणे विशिष्ट भागातील अर्थव्यवस्थेचे स्वरूप काही प्रमाणात तरी विशिष्ट स्वरूपाचे असते.
मंदी- तेजीचे परिणामही सर्वत्र सारख्या स्वरूपाचे नसतात.
आपण मात्र आपले लक्ष्यांक -
"अर्थव्यवस्था ही राज्याच्या सर्व भागात आणि सर्व काळात एकसमान गतीने पुढे जाते"
या गृहितकावर ठरवीत असतो.
अर्थव्यवस्थेचा आकार, अवस्था आणि तिची गती याच बाबी जमा महसूलाची रक्कम निश्चित करीत असल्यामुळे आणि आपण अर्थव्यवस्था  नियंत्रित करू शकत नसल्यामुळे जमा महसूलाचे  लक्ष्यांक गाठण्यात आपले फार महत्त्वाचे योगदान असण्याची किंवा न गाठण्यात फार मोठे दोष असण्याची  शक्यता नाही.
आपण फक्त आणि फक्त एवढेच करू शकतो आणि तेवढ्यासाठीच जबाबदार ठरू शकतो.
सर्व व्यापाऱ्यांकडून सर्व विवरणपत्रे भरून घेऊन करकसूरदाराकडून सर्व थकबाकी भरून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करणे हेच  केवळ आपल्या हातात आहे. त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांना,  आपल्या अभिलेखाची  केंव्हाही तपासणी होऊ शकते ही जाणीव  सातत्याने राहील या दृष्टीने अंमलबजावणी शाखेचे काम चालू ठेवणे , ही एक बाब आपल्यांकडून शक्य आहे.
दुर्दैवाने, व्यापारी आपल्या  विवरणपत्रांमध्ये आपली सर्व उलाढाल अचूकरित्या दाखवित आहेत काय आणि त्यावर योग्यरित्या करभरणा करीत आहेत काय, हे नियमितपणे पाहण्याची यंत्रणाच आपल्याकडे नाही, असे मला वाटते.


Saturday 6 July 2013

dnyaanache mahattva

बुद्धिमान आणि ज्ञानी माणसाला त्याच्या अज्ञानाची जाणीव अधिक लवकर होते.
यावर काही उद्धरणे खालीलप्रमाणे --

जगातील सर्व ज्ञानाची तुलना समुद्र किनाऱ्यावरील वाळूशी केल्यास,  माझे ज्ञान हे  वाळूच्या एका कणाच्या सर्वात सूक्ष्म भागाएवढे आहे. --- न्यूटन .

गो. नी . दांडेकर  गाडगेबाबांना उद्देशून -  आपल्या सहवासात राहून मला हे समजले की, मला काही समजत नाही.

आइनस्टाइन -  माझे ज्ञान एवढे आहे की, त्याच्यामुळे  मला मी किती अज्ञानी आहे, हे समजते.

श्रीचक्रधर --    जव जव जानता तव तव नेणता .  अर्थात जसे जसे आपल्याला ज्ञान होते  , तसे तसे आपल्याला आपल्या अज्ञानाची जाणीव होते 

Friday 5 July 2013

antim hetu

सर्व जगातील आणि सर्व काळामधील महापुरुष मोठेच आहेत.  अखिल मानवजातीचे कल्याण करणे हाच त्यांचा निरपेक्ष हेतू असतो.
तथापि -
वेगवेगळ्या महापुरुषांच्या समाजस्थितीविषयक  आकलनाला देश-काल-स्थितीच्या तसेच त्यांच्या बुद्धीच्याही मर्यादा असतात . तसेच मानवकल्याणाचा अर्थही प्रत्येकानुसार वेगवेगळा असणे स्वाभाविक  मानले पाहिजे.
त्यामुळेच -
त्यांनी मांडलेले विचार , तत्त्वज्ञान , त्यांचे कार्य , त्यांचे आदर्श , त्यांनी मांडलेली आचरणव्यवस्था यामध्ये काहीशी भिन्नता  आढळून येते.
त्यामुळेच -
जगात वेगवेगळे धर्म, संप्रदाय , विचारधारा आढळून येतात.
तथापि -
या महापुरुषांचा हेतू नि:संशयरित्या  मानवकल्याण हाच असतो.
म्हणूनच -
धर्म, संप्रदाय , विचारधारा यांच्या आधारांवर समाजात पडलेले परस्परविरोधी तट हे प्रयोजनशुन्य अर्थात निरर्थक आहेत.

Saturday 29 June 2013

मोह आणि संयम यांचा अगदी जवळचा संबंध आहे. मोहाला बळी न पडण्यातूनच संयम सिद्ध होतो. आणि संयमानेच मोहावर नियंत्रण मिळविता येते.
भारतीय तत्त्वज्ञांनी संयम हा जीवनाचा आधार मानलेला आहे.
आधुनिक काळात, निसर्गाच्या शोषणाचा अतिरेक झालेला आहे. तसेच त्यातून पर्यावरणाच्या प्रदूषणाची भयावह समस्या निर्माण झालेली आहे.
मानवी जीवनाचे अस्तित्व टिकविण्यासाठी आणि आपल्या पुढील पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आजही संयमाचे महत्त्व   पुर्विइतकेच , नव्हे, पुर्विपेक्षाही अधिक आहे , यात शंका ती कोणती.  

Wednesday 26 June 2013

प्रेम आणि त्याग हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जिथे खरे प्रेम आहे, तिथे निरपेक्ष त्याग अनिवार्यपणे असतोच . आणि त्याग ही भावना  प्रेमाचीच निष्पत्ती असते. म्हणूनच तथाकथित प्रेम प्रकरणात होणारा छळ खऱ्या प्रेमाचा निदर्शक नसतो.
मग खरे प्रेम कुठे असते ? आध्यात्मिक तत्त्वज्ञानुसार खरे प्रेम ईश्वराजवळ असते. तसे असेल तर त्या ईश्वरीय प्रेमाचा पृथ्वीवरील अवतार म्हणजे आईचे प्रेम होय. 

Tuesday 25 June 2013

कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती . महाराजांची जयंती महाराष्ट्रामध्ये ''सामाजिक न्याय दिन '' म्हणून साजरी केल्या जाते.

महाराष्ट्राच्या  शिल्पकारांपैकी महाराज एक महान शिल्पकार होते. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत महाराजांचे फार मोठे योगदान आहे, यात शंका नाही.

जनतेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सामान्य जनतेमध्ये  शिक्षणाचा प्रसार होणे आणि प्रत्येकाला सामाजिक प्रतिष्ठा मिळणे आवश्यक आहे, हे त्यांनी ओळखले. त्यासाठी त्यांनी शिक्षण प्रसाराला विशेष महत्त्व दिले. नवीन शाळा काढणे , अशा कृतींना सक्रिय प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांसाठी वसती गृहे काढणे, आरक्षणाची तरतूद करणे  या मार्गांनी त्यांनी शिक्षण प्रसाराचे काम केले.

सामाजिक समता निर्माण झाल्याशिवाय उपेक्षीतांकडून  संधींचा   योग्य प्रकारे वापर होऊ शकत नाही, हे त्यांनी ओळखले होते. त्यासाठी त्यांनी जातीयवाद, अस्पृशता या अपप्रवृत्तींविरुद्ध लढा दिला.तसेच त्यांनी  सामाजिक समतेसाठी कार्य करणाऱ्या चळवळींना पाठींबा आणि    आवश्यक वाटल्यास सक्रिय मदत केली.

महाराजांचा या निमित्ताने  ''आर्य समाज'' तसेच ''सत्यशोधक समाज'' या सामाजिक संघटनांशी घनिष्ठ संबंध आला . यातूनच महाराज आर्य समाजाचे की सत्यशोधक  समाजाचे यावर विद्वानांमध्ये वादही झाला किंवा होत आहे.

उघड उघड त्यांनी स्वत:ला आर्यसमाजाचे म्हणवून घेतले. परंतु स्वत:च्या कृतींनी सत्यशोधक समाजाला सक्रिय पाठींबा दिला.   थोडक्यात सांगावयाचे झाल्यास, जिथे जिथे सुधारणा तिथे तिथे महाराज , हेच खरे .

महाराजांच्या जयंती निमित्ताने त्यांना अनंत अभिवादन . 

Tuesday 4 June 2013

दु;खितांना , पीडितांना  मदत करा , त्यांच्यावर दया दाखवा , असे सर्वच धर्म सांगतात . तथापि त्यांच्या जागेवर जाऊन त्यांच्या दु:खांशी समरस होऊन त्यांच्या वेदना समजावून घ्या, असे किती धर्म सांगतात?  दया दाखविण्यामध्ये- दुखितांमध्ये व दया दाखविणाऱ्यामध्ये एक अंतर सुचित होते.एक भेद तयार होतो.  दया घेणाऱ्यामध्ये उपकृततेची जाणीव व दया दाखविणाऱ्यामध्ये अहं भावाची भावना निर्माण होऊ शकते . प्रत्येक माणसाला सुजीवन जगण्याचा हक्क आहे. आपण त्यांना त्या हक्काची जाणीव फक्त करून देत आहोत आणि तो हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहोत , आणि ते आपले कर्तव्य आहे,  अशी जाणीव मदत करणाऱ्याने  ठेवली पाहिजे. 

Monday 3 June 2013

जगातील सर्व प्रकारच्या संघर्षांमध्ये भूमिका संघर्ष अध्याहृत असतो. आपण जर समोरच्या व्यक्तीच्या भूमिकेशी समरस झालो किंवा तिच्या भूमिकेत जाऊन विचार करू लागलो तर जगातील अर्ध्याहून अधिक संघर्ष निरर्थक ठरतील. थोडक्यात, जगातील बव्हंश संघर्ष हे भूमिकासंघर्ष असावेत, असे वाटते. 

Thursday 30 May 2013

नजिकच्या भूतकाळात कोणताही वारसा नसताना शिवाजी महाराजांनी 'प्रजाहित' हे राजाचे आद्य कर्तव्य मानले.आणि अत्यंत धामधुमीच्या काळातही त्याचे कटाक्षाने पालन केले.  महाराजांच्या आज्ञापत्रावरून त्यांच्या प्रजाहितदक्षतेचा स्पष्टपणे प्रत्यय येतो.

महाराजांच्या नंतर दुर्दैवाने नंतरच्या राज्यकर्त्यांमध्ये हा पैलू क्वचितच  दिसून येतो . याला एक स्पष्ट अपवाद आहे. 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर' हा तो सन्माननीय अपवाद होय.

अतिशय बिकट परिस्थितीत राज्यकारभार हाती घेऊन त्यांनी जी प्रजाहितदक्षता दाखविली, ती त्यांचे असामान्यत्व स्पष्ट करते, यात शंका नाही.

आज त्या पुण्यश्लोक व्यक्तित्वाची पुण्यतिथी. त्या निमित्त त्यांना भावपूर्ण वंदन करण्याची संधी घेतो. 

Saturday 25 May 2013

आज बुद्ध पोर्णिमा अर्थात बुद्ध जयंती साजरी करण्यात येत आहे.
भगवान बुद्ध म्हणजे भारताच्या सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व. सामाजिक समता व विचारांची स्वतंत्रता हे त्यांच्या विचारविश्वाचे महत्त्वाचे पैलू आहेत. जागतिक तत्त्वज्ञानाचा इतिहास भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, हे जाणकारांना मान्य आहे.
वेदोक्त कर्मकांडाच्या पार्श्वभूमीवर भगवान बुद्धांनी पुरस्कृत  केलेला   विशुद्ध जीवनाचा आग्रह हा आजच्या जीवनातही उपयुक्त ठरतो.

"बुद्ध भारताचा सर्वश्रेष्ठ पुरुष असल्याबद्दल भारतीय व पाश्चात्य विद्वानांमध्ये दुमत नाही." या शब्दांत प्रसिद्ध प्राच्यविद्यापंडित श्री शरद पाटील भगवान बुद्धांचा यथार्थ गौरव करतात.

बुद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान बुद्धांप्रती कोटी कोटी प्रणाम. 

Thursday 23 May 2013

अतिरेकी सकारात्मकतेची परिणती  कटू वास्तवाकडे दुर्लक्ष करण्यात होऊ शकते.त्यामुळे आपली फसगत   होण्याची शक्यता असते. कटू वास्तवाकडे लक्ष वेधणे म्हणजे नकारात्मकता नव्हे. उलट त्यामुळे  नियोजन व डावपेच बदलण्याची जाणीव होते  आणि तसा बदल करण्याची संधीही उपलब्ध होते.  त्यासाठी ---

सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याबरोबरच वास्तवाकडे किंचितही दुर्लक्ष होऊ नये, असे मला वाटते. 

Tuesday 21 May 2013




जिथे आभाळच फाटले आहे, तिथे ठिगळे काय लावताय?

ठिगळे लाऊन स्वत:चे समाधान करून घेता काय ?

ठिगळे लावण्यालाही कोणाची हरकत असण्याचे कारण नाही.

पण आपल्याला आभाळ शिवायचे आहे, याची जाणीव ठेवा .

म्हणजे, आभाळ शिवण्याला ठिगळाचे योगदान लाभेल.

Saturday 18 May 2013

"ज्या प्रमाणे जिभेवरील मध किंवा विष चाखल्यावाचून राहत नाही, त्याप्रमाणे राजाच्या खजिन्यात वावरणाऱ्याकडून थोडातरी पैसा खाल्यावाचून राहणे शक्य नाही. पाण्यात राहणारे मासे पाणी केंव्हा पितात हे जसे कळत  नाही, तसे कामावर नेमलेले अधिकारी पैसे केंव्हा खातात, हे कळणे  शक्य नाही." 

हा अर्थ आहे कौटिल्याच्या 'अर्थशास्त्र' या साडे तेवीसशे वर्षापूर्वी लिहिलेल्या ग्रंथातील एका श्लोकाचा. 

मूळ श्लोक असा आहे. 


यथा हि अनास्वादयितुं न शक्यं जिव्हातलस्थं मधु वा विषं वा|

अर्थस्तथा हि अर्थचरेण राज्ञ:स्वल्पोअपि अनास्वादयितुं न शक्य:|
मत्स्या यथाअन्त: सलिले चरन्तो ज्ञातुं न शक्या: सलिलं पिबन्त:। 

Thursday 16 May 2013

आपल्या देशात विविध जाती,धर्म, संप्रदाय, कुळ, वर्ण, विचारधारा, परंपरा, इतिहास, आदर्श असलेले लोक राहतात. या विविधतेचा आपल्याला अभिमानही वाटतो. तथापि या विविधतेमुळे आपले कुठल्याच  विषयावर एकमत होत   नाही. प्रत्येक गोष्ट म्हणजे कोणतीही  घटना, इतिहास पुरुष , विचारधारा, परंपरा, विविध  संकल्पना,आपले ध्येय , आपला इतिहास इत्यादी बाबीकडे आपण  वर उल्लेखित चष्म्यातूनच बघत असतो. त्यामुळे आपले वरील  बाबतींमध्ये तीव्र मतभेद असतात. मानव प्राणी बुद्धिमान आहे. मतभेद स्वाभाविक आहेत. परंतु वरील  चश्म्यामुळे आपल्यांमध्ये अगदी साध्या साध्या विषयावरही टोकाचे मतभेद होतात. श्री चाक्रधरांचे एक  वचन आहे. " मनुष्य मात्र होवोनि असावे " थोडक्यात, सर्व चष्मे टाकून देऊन सर्व माणसाचा  फक्त मनुष्य म्हणुन विचार करावा.

या कृत्रिम मतभेदांमुळे आपल्या कुठल्याच चळवळी किंवा आंदोलने सर्वसमावेशक बनत नाहीत किंवा पुढे तसे चालू राहत नाहीत. याला याला एकाच उपाय --- मनुष्य  मात्र होवोनि असावे. ------पण  कसे ?
भर्तृहरी हा प्रथितयश कवी व विद्वान होता. त्याच्या कालावधीबाबत अनेक  मतभेद आहेत. तरी तो एक हजार वर्षापूर्वी होऊन गेला, या बाबतीत विद्वानांमध्ये एकमत दिसते. उज्जैन नगरीचा हा राजा त्याच्या शतकत्रयासाठी   प्रसिद्ध आहे. एक नीतिशतक,दुसरे शृंगारशतक तर तिसरे वैराग्यशतक होय.  त्यातही त्याचे सुलभ व लालित्यपूर्ण  भाषेतील नीतिशतक विशेष  प्रसिद्ध आहे. ते संस्कृत भाषेत असून सुंदर विचारांनी परिप्लुत आहे.

भर्तृहरीने  आपल्या शतकत्रयामधून  जीवनविषयक तत्त्वज्ञान अगदी सोप्या भाषेत मांडले आहे. भर्तृहरीच्या नितीशतकातील असाच एक मनोरंजनात्मक परंतु जीवनविषयक अनुभव मांडणारा एक श्लोक मी खाली देत आहे.
"यां चिन्तयामि सततं, मयि सा विरक्ता |
सापि अन्यं इच्छति जनं, स जनो अन्य असक्त:|
अस्मत्कृत्ये च परितुष्यति काचिदन्या |
धिक् तां च तं च मदनं च इमां च मां च |

अर्थ : जिचा मी नेहमी विचार करतो, ती माझ्याबद्दल उदासीन आहे. ती दुसऱ्याच मनुष्यावर प्रेम करते. आणि तो दुसरा मनुष्य मात्र आणखी कोण्यातरी दुसरीचाच विचार करतो. माझ्यावर कोणीतरी तिसरीच प्रेम करते.
या वर भर्तृहरी म्हणतो- तिचा , त्याचा , प्रेम भावनेचा , हिचा आणि माझाही धिक्कार असो.

हा अनुभव किमान एक हजार वर्षापूर्वीचा आहे बरं . 

Tuesday 14 May 2013


आज आद्य शंकराचार्य यांची जयन्ति. अद्वैत तत्त्वज्ञानाचे श्रेष्ठ प्रणेते . वेदांत तत्त्वज्ञान अतिशय प्रगल्भ आणि तर्कप्रतिष्ठित बनविण्यात शंकराचार्यांचा   वाटा फार मोठा आहे. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात ९० % हून अधिक लोक अद्वैत तत्त्वज्ञानाचे अनुयायी आहेत, यावरून भारतीय तत्त्वज्ञानावरील त्यांचा प्रभाव स्पष्ट होतो.
"सर्व खलु इदं ब्रह्म"  (सर्व विश्व ब्रह्मस्वरूप आहे); "अहं ब्रह्म अस्मि"(मी ब्रह्म   आहे) ; या सारख्या सुत्राद्वारे  त्यांनी जीव आणि जगत हे ईश्वर स्वरूप मानले. वेदांताची पद्धतशीर मांडणी करण्याचे त्यांचे कार्य त्यांची प्रकांड बुद्धिमत्ता सिद्ध करते.
वयाच्या आठव्या वर्षी गृहत्याग करून त्यांनी संपूर्ण भारत वर्षात आपल्या तत्त्वज्ञानाचा परिणामकारकरित्या        
प्रचार आणि प्रसार केला.
सन ७८८  ते  ८२० या केवळ 3२ वर्षांच्या या  अल्प कालावधीत त्यांनी केलेले कार्य विस्मयकारक आहे, यात शंका नाही.
धर्म प्रचारासाठी त्यांनी भारताच्या चार कोपऱ्यामध्ये  चार मठ स्थापन केले. १. द्वारका २. पुरी ३. बद्रीनाथ ४. रामेश्वर .
अद्वैत तत्त्वज्ञानाच्या रूपाने त्यांनी समतेच्या तत्त्वाला आध्यात्मिक व तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान पुरविले, असे मला वाटते .

डॉ . कमल  गोखले यांनी 'शिवपुत्र संभाजी' या संशोधनात्मक ग्रंथाद्वारे संभाजी राजे यांचा जीवनपट समर्थपणे उलगडून दाखविलेला आहे. राजे संभाजी यांच्याविषयी बरेचशे समज - गैरसमज या पुस्तकामुळे दूर होण्यास मदत झालेली आहे .हा ग्रंथ पूर्णपणे ऐतिहासिक साधनावर आधारित आहे.
 संभाजी राजे अतुलनीय शौर्यवान  होते , यात शंका नाही. पण ते विद्वान होते, हेही सिद्ध झालेले आहे.
त्यांच्या ऐतिहासिक बलिदानामुळे त्यांचे धाडस, सहनशक्ती, स्वाभिमान(धर्माभिमान म्हणजे स्वाभिमानच.) प्रखरपणे समोर आले.
त्यांच्या बलिदानामुळे मराठ्यांच्या मनात जी आग पेटल्या गेली, ती कित्येक वर्षे ज्वलंत राहिली. शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण होण्यात या बलिदानाचे योगदान फार महत्त्वपूर्ण राहिलेले आहे.
त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सादर प्रणाम. 

Monday 13 May 2013

आज वेदांतावरील शंकराचार्यानंतरचे समर्थ भाष्यकार रामानुजाचार्य 

यांची जयंती. त्यांनी प्रथमच सामन्यांच्या भक्तिला वेदांताचा भाग 

बनविले. " विशिष्टाद्वैत " हा त्यांचा वेदांतावरील सिद्धांत. सोप्या 

पद्धतीने वेदांत सांगणारे हे आचार्य होते. अकरावे शतक हा त्यांचा 

कालावधी. प्रत्येक व्यक्ती ही बरे वाईट कर्म करण्यास स्वतंत्र असून

 फळ भोगण्यास मात्र परतंत्र आहे. म्हणजे त्याच्या कर्माचे चांगले वाईट 

फळ ईश्वर देतो. थोडक्यात, व्यक्ती चांगले काम करून आपले 

चिरकालीन भविष्य उज्ज्वल बनवू शकते , हे त्यांचे मत प्रत्येकास

 व्याक्तीविकासाची हमी देते . त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सादर 

अभिवादन.
आज महात्मा बसवेश्वर यांची जयंती . 

बाराव्या शतकात कर्नाटक प्रांतात होऊन गेलेले महात्मा बसवेश्वर हे भगवान बुद्ध यांच्या नंतरचे त्या श्रेणीचे दुसरे समाज व धर्म क्रांतिकारक असले पाहिजेत , असे त्यांच्या या क्षेत्रातील कार्यावरून वाटते. 
धार्मिक व सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य अतुलनीय स्वरूपाचे असेच आहे . 
त्यांनी ---
* जातिभेदाला कृतीशील विरोध केला. 
* बहुदेवपूजा, कर्मकांड, व्रत्वैकल्य,बलीप्रथा,अंधश्रद्धा यांचा प्रखर निषेध केला.
* आंतरजातीय विवाह, विधवा विवाह यांचा सक्रिय पुरस्कार केला.
त्यांनी स्थापन केलेली सर्व जातीधर्माच्या तसेच पुरुषांबरोबरच स्त्रियांनाही आपले विचार , चिंतन मोकळेपणे मांडण्यास मुक्तद्वार देणारी "अनुभवमण्टप " ही संस्था आधुनिक लोकशाही संसदेचे मध्ययुगीन बीज वाटते.

" कायकवेकैलास "(Work is Heaven ) हा त्यांचा श्रमाला प्रतिष्ठा देणारा व श्रमाचा पुरस्कार करणारा महामंत्र त्यांचे वेगळेपण अधोरेखित करतो.

महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम.

Thursday 9 May 2013

विज्ञानाचा नितीमत्तेशी काहीही संबंध नसतो. याचा अर्थ विज्ञानातून नीतीला समर्थन मिळत नाही. तसेच विज्ञानाचा नीतीला विरोधही नसतो. थोडक्यात, विज्ञान हे नितिनिरपेक्ष असते. 
त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनही नीती-अनीती निरपेक्ष कार्यरत राहतो. 

उदार अर्थव्यवस्था ही आर्थिक विकास करण्यासाठी प्रत्येकाला स्वातंत्र्य तसेच संधीची उपलब्धताही करून देते. आर्थिक विकासाला ती प्रतिष्ठा निर्माण करून देते. तसेच व्यक्तीमध्ये आर्थिक विकासाची प्रेरणाही निर्माण करते.

उदार आर्थिक व्यवस्था ही आर्थिक विकासाबरोबरच चंगळवादी प्रवृत्ती निर्माण करते. आणि त्यातूनच शोषणही वाढत जाते. कोणत्याही परिस्थितीत आर्थिक विकास हेच माणसाचे ध्येय बनून जाते. साहजिकच या प्रक्रियेत नितीमत्तेला फारसे महत्त्व राहत नाही.

सध्याचे युग हे वैज्ञानिक दृष्टिकोनाचे तसेच उदार अर्थव्यवस्थेचे आहे. त्यामुळे या युगात नीतीला फारसे स्थान नाही. नीतीचे समर्थन करणारे कोणतेही तत्त्वज्ञान/ विचारधारा समाजाला मार्गदर्शन करण्यास समर्थ ठरत नही.

प्रगतीचे भौतिक व सांस्कृतिक असे दोन अंग असतात. या दोन्हीही अंगांचा समतोल विकास होण्यातूनच प्रगती पूर्णत्वाला जाते. सध्या भौतिक प्रगतीला सीमा नाही. तथापि सांस्कृतिक प्रगतीचे काय ? आणि त्यातून निर्माण होणाऱ्या शोषण, द्वेष, संघर्ष यांचे काय ?

Monday 6 May 2013

जनतेला खऱ्या अर्थाने सुशिक्षित करण्यातूनच देशापुढील /समाजापुढील समस्या नष्ट होण्यास सुरुवात होईल.

जनतेला परिणामकारकरित्या  सुशिक्षित करण्याची सुरुवात प्राथमिक शिक्षणापासूनच होते, असे मला वाटते.

त्यासाठी शासनाने प्राथमिक शिक्षणावर , ते आता जितका खर्च करते, त्याच्या ५० पट अधिक खर्च केला पहिजे.

मुलांना शिक्षण देताना वैज्ञानिक दृष्टिकोन , सामाजिकता , नैतिकता, सृजनशीलता  इत्यादि  बाबी शिकविण्यावर  भर दिला पाहिजे . त्यासाठी अभ्यासक्रमात मूलगामी सुधारणा करणे आवश्यक आहे .

प्राथमिक शिक्षकासाठीची योग्यता आणि त्याला दिले जाणारे वेतन व सुविधा यात अनेकपट वाढ करणे अपेक्षित आहे .

पुढे चालून विद्यार्थी 'प्राथमिक शिक्षक' ही आपल्या करीयरची एक महत्त्वाची संधी मानतील , एवढी प्राथमिक शिक्षकाची योग्यता वाढविण्याची गरज आहे.

"शिक्षण सेवक" या संकल्पनेने प्राथमिक शिक्षणाचा बट्ट्याबोळ करण्यात मोठे योगदान दिलेले आहे , असे मला प्रामाणिकपणे वाटते . 

Friday 12 April 2013

समान उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी आपापसांमध्ये  समन्वय साधत साधत उद्दिष्टांप्रत जाण्याची प्रक्रिया म्हणजे "संघटन" होय. 
 
उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्या सर्वांच्या पुढील समस्या आणि सर्वांच्या नेमक्या गरजा काय आहेत, हे ओळखून त्यांच्या आकलनासाठी आपल्या सदस्यांना मदत करतात, ते संघटनेचे नेते असतात. 
 
संघटनेचा व संघटना सदस्यांचा स्वाभिमान कायमपणे जागृत ठेवणे , तसेच अचूक उद्दिष्टे अभ्यासासाहित वरिष्ठांपुढे मांडणे व त्यांचा ठामपणे पाठपुरावा करणे ,गरज पडल्यास करावयाच्या संघर्षाचे सुयोग्य व्यवस्थापन करणे, हे  नेत्यांचे कार्य आहे. 
 
सर्व संघटना सदस्यांना विश्वासात घेणे ,ही संघर्षाची पूर्वावश्यकता  आहे, हे नेत्यांनी कधीही विसरता कामा नये.
 
संघर्ष करताना,  ध्येयावरील अचल दृष्टी व अढळ निष्ठा, प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी , सदस्यांना कायम संपर्कात व सोबत ठेवणे , संघर्षाचे नियोजन, डावपेच व ठामपणा , या बाबी नेत्यांसाठी पर्यायाने उद्दिष्टसिद्धीसाठी महत्त्वाच्या असतात , हे सांगायला नकोच. 
 
तथापि आपले नेते वरीलप्रमाणे काम करतात काय , याकडे सातत्याने लक्ष्य ठेवणे हे त्यापेक्षाही  महत्त्वाचे आहे, हे आपल्याला मान्य केलेच पाहिजे.  

Thursday 11 April 2013

उदार अर्थव्यवस्था ही आर्थिक विकास करण्यासाठी प्रत्येकाला समान संधी उपलब्ध करून देते , हे खरे आहे ; तथापि या संधीचा उपयोग करण्यासाठी प्रत्येकजण पुरेसा समर्थ व स्वतंत्र आहे  काय,याचाही  विचार करणे  आवश्यक  आहे.

प्रत्येकजण तसा समर्थ  आणि स्वतंत्र नसेल तर , त्या प्रत्येकाला तसे बनविण्यासाठी तथाकथित उदार अर्थव्यवस्था काय करू शकेल, हा मोठा प्रश्न आहे . 

Tuesday 9 April 2013

         
आपल्या सुखाला सुरक्षित ठेवायचे असेल तर , आपल्या अवती भवती देखील सुख कसे निर्माण होईल व ते कसे टिकून राहील , याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे . 
 
कारण - दारिद्र्य  व दु: खाच्या  महासागरात आपण सुख- समृद्धीची बेटे तयार करू शकत नाहीत आणि ती टिकवूही शकत नाहीत . 
 
दारिद्र्य व दु:खाचा महासागर त्यास केंव्हा गिळंकृत करील , हे कधीही सांगता येणार नाही.  

 

Monday 8 April 2013

ईश्वर सत्य आहे की कल्पना आहे ,या वादात पडण्यात अर्थ नाही. कारण अशा वादाला शेवट नसतो . ईश्वर तर्काने किंवा प्रत्यक्ष सिद्ध होतो किंवा नाही , यावर आस्तिकांचा देवावरील विश्वास अवलंबून नसतो . 
 
ईश्वर म्हणजे सृष्टीमधील संतुलनाचे तत्त्व , असा एक विचार मांडता येईल. त्याला विश्वात्मक चैतन्य असेही संबोधता येईल. सृष्टीचे संतुलन राखणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आणि आवश्यकता आहे. कारण त्याच्याशी आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निगडीत आहे. 
 
या संतुलनाचे दोन पैलू आहेत . एक म्हणजे भौतिक सृष्टीचे संतुलन तर दुसरे म्हणजे मानवी वर्तनाचे संतुलन .पर्यावरणीय संतुलन  हे भौतिक सृष्टीच्या संतुलनाचे उदाहरण मानता येईल . मानवा-मानावांमधील अंतर-क्रिया अर्थात मानवी वर्तन यांचे संतुलन हा सृष्टीच्या संतुलनाचा दुसरा महत्त्वाचा पैलू आहे . 
 
एकमेकाशी चांगले वागल्यामुळे मानवी वर्तनामध्ये संतुलन निर्माण होते तर वाईट वागल्यामुळे हे संतुलन बिघडते . तथापि चांगले वागणे म्हणजे काय हा एक मोठा प्रश्न आहे.  जगातील तत्त्वज्ञांमध्ये यावर गहन चर्चा चालू असते . परंतु ढोबळ मानाने -आपल्या ज्या कायिक-वाचिक-मानसिक कृत्यांमुळे आपल्यामध्ये किंवा इतरांमध्ये दुख:निर्माण न होता सुखच निर्माण होते त्या कृत्यांना चांगली कृत्ये असे म्हणता येइल. येथे तत्कालीन सुख- दु:खापेक्षा दीर्घकालीन सुख-दु:ख अर्थात हिताहित गृहीत धरले अहे. 
 
दुसरा एक ढोबळ मानदंड आपण मानत असतो . मानवी जीवनासंबंधी निरपेक्षपणे मार्गदर्शन करणारे संत , महापुरुष यांचा उपदेश हाच तो मानदंड होय . त्यांनी ज्या पद्धतीने वागण्यास सांगितले आहे किंवा ते जसे जगले आहेत , तसे किंवा त्यासारखे किंवा त्यांच्याशी सुसंगत वागणे किंवा जगणे म्हणजे चांगले वागणे , असे आपण सर्वसाधारणपणे मनात असतो. 
 
हे तर नक्की की, वरील महापुरुषांचा उपदेश हा सृष्टीचे संतुलन टिकविणारा होता असे ढोबळ मानाने मानता येते. थोडक्यात, चांगले वागणे आणि सृष्टीसंतुलन यांचा काहीतरी संबंध आहे , असे मला वाटते. माणसाचे चांगल्या वागण्याचे निदर्शक ठरणारे सद्गुण पूर्ण स्वरुपात कोणत्याही व्यक्तीमध्ये असणे संभवत नही. म्हणूनच प्रगल्भ माणसाने या सर्व सद्गुणांचा मूर्तिमंत अविष्कार म्हणजे ईश्वर, अशी कल्पना केली असली पहिजे. म्हणूनच अशा सर्व सद्गुणांची आराधना म्हणजेच असे सद्गुण आपल्यामध्ये बिम्बाविण्याची साधना म्हणजेच ईश्वरार्चना होय . 
 
पुर्णस्वरुपातील सद्गुणांचा समुच्चय असणाऱ्या ईश्वरासारखे बनणे तर शक्य दिसत नाही . तथापि तो व आपण यामधील अंतर तर कमी करणे आपल्या हातात आहे . 
 
असे केल्याने विश्वात्मक संतुलन कायम राहील आणि त्यामुळे माणसाच्या सुखाचाही मार्ग मोकळा होइल. 
 

Friday 5 April 2013

सर्वसामान्य  लोकांना आपले हित कशात आहे  किंवा आपले ध्येय काय असायला हवे हे कळत नाही . जी व्यक्ती सर्वसामान्य  लोकांना त्यांचे हित समजावून सांगते आणि त्याकडे प्रवृत्त करते तीच व्यक्ती खरा नेता असते . लोकमताच्या लाटावर स्वार होणारी व्यक्ती खरा नेता असू शकत नाही .

आपल्या देशाची खरी समस्या नेतृत्वाची आहे ,हे आपण समजून घेतले पाहिजे .
 
चांगले  वागने  ही  एक  अतिशय  सोपी  गोष्ट आहे . ती  अतिशय आनंददायक देखिल आहे . तथापि चांगले वागण्याची चव आपल्याला कळली (realise) पाहिजे .