Thursday 26 November 2015

आमिर खान आणि

अमीर खानच्या वक्तव्याविरुद्ध प्रतिक्रियांचा जो गदारोळ उठला आहे, तो अमीर खानच्या वक्तव्यात काही अंशी तरी तथ्य आहे, हेच अधोरेखित करीत नाही काय? सध्या वाढलेल्या तथाकथित असहिष्णुतेविषयी देशातील अनेक लेखक-कलावंत-विचारवंत-शास्त्रज्ञ यांचे जे मत बनले आहे, ते का बनले आहे याचाही विचार आपण करू नये काय? अमीर खानचे तसे मत बनले असेल तर ते का बनले आहे याचा खोलात जाऊन विचार करण्याची गरज आहे.त्याच्या वक्तव्याच्या मागचे पुढचे संदर्भ लक्षात न घेता आपण प्रतिक्रिया व्यक्त करण्याची किती घाई करतो! तरीही  अमीर खानच्या वाटण्यात काही अंशी तरी तथ्य आहे काय, याचाही विचार करायला हवाच. काही असले तरी अमीर खानची उक्त प्रतिक्रिया ही Over Reaction च्या सदरात येते हे मात्र मान्य करावे लागेल.तेवढ्यापुरता त्याला दोष दिलाच पाहिजे. त्याच्यासारख्या प्रथितयश व्यक्तीने अशी वक्तव्ये करण्यापूर्वी विचार केला पाहिजे.
अमीर खानऐवजी इतर मुस्लीम नसलेल्या व्यक्तींनी जेंव्हा अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या तेंव्हा आपण एवढा गदारोळ केलेला आहे काय?  अमीर खान मुस्लीम नसता तर त्याच्या प्रतिक्रियेवर आपण एवढे क्रुद्ध  झालो असतो काय, याचेही  प्रत्येकाने आत्मपरीक्षण  केले पाहिजे. याचे उत्तर नकारात्मक येत असेल तर ते अतिशय गंभीर आणि संवेदनशील माणसांची काळजी वाढविणारे आहे, यात शंका वाटत नाही.

Thursday 19 November 2015

असहिष्णुते विषयी

यापूर्वी घडलेल्या असहिष्णुतानिदर्शक घटनांच्या वेळी लेखक, विचारवंतांनी  पुरस्कार परत केले नाहीत म्हणून त्यांनी  आता ते परत करू नयेत, असा युक्तीवाद कसा काय सिद्ध होऊ शकतो. आधी पुरस्कार परत न करण्यात चूक झाली असेल तर आता ते परत करून ही चूक दुरुस्त करूच नये काय?

दुसरी गोष्ट महणजे यापूर्वी घडलेल्या असहिष्णुतादर्शक घटनांना त्यावेळच्या सरकारचा पाठींबा नव्हता, असे लोकांचे मत असल्याचे दिसते. आता मात्र या घटना सरकारपुरस्कृतच असाव्यात असा संशय लोकांच्या मनात असल्याचे जाणवते. त्यामुळेच यापूर्वी पुरस्कारवापसीचा प्रश्न निर्माण झाला नसावा. आता मात्र सरकारवरील संशयामुळे लेखक-विचारवंतांना पुरस्कार परत करून सरकारचा निषेध करण्याची आवश्यकता वाटली असावी. 

Thursday 12 November 2015

Wakeup: स्वातंत्र्य आणि समता. न्याय व नीतीही.

Wakeup: स्वातंत्र्य आणि समता. न्याय व नीतीही.: समता आणि स्वातंत्र्य या तत्त्वांवर आजपर्यंत अनेकांनी प्रकाश टाकलेला आहे. परंतु या तत्त्वविचारांचे आकर्षण मुळीच कमी होत नाही. समता हे तत्त्...

स्वातंत्र्य आणि समता. न्याय व नीतीही.

समता आणि स्वातंत्र्य या तत्त्वांवर आजपर्यंत अनेकांनी प्रकाश टाकलेला आहे. परंतु या तत्त्वविचारांचे आकर्षण मुळीच कमी होत नाही. समता हे तत्त्व अखिल मानवजातीच्या समानतेकडे निर्देश करते. परंतु जगातील माणसे प्रत्यक्षात समान नसतात. प्रत्येकाची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमता वेगवेगळी असल्यामुळे यच्चयावत मानवजात स्वभावत: समानतेच्या पातळीवर येऊ शकत नाही. त्याचबरोबर जगाच्या विविध भागांतील वेगवेगळ्या संस्कृतीने मानवाचे जात, धर्म. वंश, वर्ण, आर्थिक क्षमता, राजकीय सत्ता इत्यादी शारीरिक व सांस्कृतिक आधारांवर असंख्य भेद केलेले आहेत. या भेदांवर आधारित असलेले प्रस्थापित गट त्याहून कनिष्ठ गटांवर अन्याय करून त्यांचे सातत्याने शोषण करीत असतात. त्यामुळे विविध गटांमधील दरी उत्तरोत्तर वाढत जाते आणि त्यातूनच सामाजिक आरोग्याला बाधा पोहोचते. या स्थितीच्या पार्श्वभूमीवर समाजातील काही जाणत्या लोकांना समाजात समानतेची प्रस्थापना करण्याची  आवश्यकता जाणवली असावी. परंतु अशी प्रस्थापना कशी करायची हा एक जटील प्रश्न जाणत्या लोकांसमोर उभा राहतो.
हा प्रश्न सोडविण्यासाठी वेगवेगळ्या अंगांनी विचार करण्यात आला. आधुनिक काळातील मार्क्सवाद हा त्यापैकीच एक विचार होय. समाजाचे आर्थिक अंग हा त्याचा पाया आहे. यात आवश्यक ते मुलभूत बदल झाल्यास समाजरूपी इमारतीच्या इतर अंगांतही आपोआप  बदल होतात, असे मार्क्सवादाचे प्रतिपादन आहे. म्हणूनच आर्थिक समानता आली की इतर समता आपोआपच प्रस्थापित होतात, हे ओघाने आलेच. परतू या समानतेच्या स्थापनेसाठी हा विचार स्वातंत्र्याचा बळी घेतो. संपत्तीचे समान वितरण घडवून आणायचे असेल तर ज्याच्याकडे ती अधिक प्रमाणात आहे, ती त्याच्याकडून हिरावून घेणे अपरिहार्य असते. अशा वेळी त्या संपन्न माणसाच्या स्वातंत्र्याला साहजिकच पायदळी तुडविले जाते. यातूनच समता व स्वातंत्र्य यांच्यात ताळमेळ घालणे ही एक समस्या समोर येते. आपल्याला स्वातंत्र्य या मूल्याची बूज राखण्याबरोबरच समाजात समताही प्रस्थापित करावयची आहे. त्यासाठी स्वातंत्र्य आणि समता या दोन्हीही मुल्यांचा संकोच करावा लागतो.
समतेच्या तत्त्वानुसार सर्व नागरिक कायद्यासमोर समान आहेत. याचा अर्थ राज्य हे नागरिकांमध्ये धर्म, जात, लिंग, अर्थसत्ता, धर्मसत्ता अशा आधारांवर भेदाभेद करणार नाही. एवढेच नव्हे तर वरील आधारांवर भेदाभेद करणाऱ्या प्रवृत्तींवर प्रतिबंध घालील.  जातीचा आधारावर दुसऱ्याला हीन लेखणाऱ्या प्रवृत्तींना अटकाव करण्यासाठीच राज्याला “अॅट्रोसिटी प्रतिबंध” सारखे कायदे पारित करावे लागतात. कायद्यासमोर सर्व नागरिक समान असतील तर कायदा हा सर्वांना विकासाची समान संधी देईल. कोणत्याही जाती-धर्माच्या व्यक्तीला विकास करण्यासाठी राज्य समान अवकाश उपलब्ध करून देईल. कोणी कोणालाही कनिष्ठ समजून हीन लेखू शकणार नाही. अन्यथा स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशात  मनुस्मृतीप्रणित धर्मशास्त्र हे माणसाला जन्माधारित जातीवर श्रेष्ठ-कनिष्ठ असा दर्जा प्रदान करीत असे. समता हे तत्त्व म्हणूनच मनुस्मृतीप्रणित धर्मशास्त्राला पूर्णपणे विरोधी असल्याचे स्पष्ट होते. यामुळेच बाबासाहेब आंबेडकरांना मनुस्मृतीचे दहन करणे आवश्यक वाटले. केवळ कायद्यासमोर समान या तत्त्वाचा अवलंब केल्याने खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित होऊ शकत नाही. एखाद्या लंगड्या व्यक्तीबरोबर सुदृढ व्यक्तीची  धावण्याची शर्यत लावली आणि अशा शर्यतीत दोघांनाही सारखीच संधी, सारख्याच सुविधा आणि सारखेच नियम लावले तरीही या शर्यतीत सुदृढ व्यक्ती जिंकणार हे उघड आहे. आपल्याला या दोघांमध्ये खऱ्या अर्थाने शर्यत लावायची असल्यास त्यांना सर्व दृष्टींनी समान पातळीवर आणणे आवश्यक आहे. त्यासाठी लंगड्या व्यक्तीच्या ठिकाणी असणारी अक्षमता लक्षात घेता त्याच्यासाठी वेगळे नियम लावावे लागतील. केवळ समान संधी पुरविल्याने लंगड्या व्यक्तीला सुदृढाच्या पातळीवर आणता येणार नाही. आरक्षणाच्या मागेही हेच तत्त्व अनुस्यूत असल्याचे आपल्या लक्षात येईल. थोडक्यात खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित करायची असल्यास सर्वांसाठी समान धोरणे अवलंबून उपयोगाचे नाही. धोरणातील असा भेदाभेद हा अंतिमत: समतेसाठीच आहे, हे आपल्या सहज लक्षात येईल.
समता या मूल्याचा विचार करताना स्वातंत्र्य या मुल्याचाही विचार करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय? माणसाला कशापासून स्वातंत्र्य पाहिजे आहे? या सारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यातूनच आपल्याला स्वातंत्र्याचा अर्थ उमगू शकेल. सूक्ष्म पातळीवर विचार करता माणसाला त्यांच्या  अज्ञान आणि  अज्ञानजनित अंधश्रद्धा व पूर्वग्रह यांच्यापासून स्वातंत्र्य हवे आहे. परंतु अशा अज्ञान व पूर्वग्रहदूषित माणसाला याची जाणीव नसते त्यामुळे त्याला अशा स्वातंत्र्याची आवश्यकताही भासत नाही. कदाचित विषमता, पारतंत्र्य, अन्याय व तद्जनित शोषण यामुळे असा माणूस स्वातंत्र्य व समता  या मूल्यांची कल्पनाही करू शकत नाही.   तथापि  ढोबळपणे विचार करता माणसाला परकीय सत्तेपासून मात्र  स्वातंत्र्य हवे असते. कारण माणसाला शारीरिक, वाचिक स्वरूपाच्या कृती करण्याचे स्वातंत्र्य पाहिजे आहे. आणि परकीय सत्ता असे स्वातंत्र्य देत नसते. परंतु अशा कृती करण्याचे स्वातंत्र्य कशाला हवे आहे? माणसाला मुळात त्याच्या दु:ख, दारिद्र्य, यांच्यापासून स्वातंत्र्य पाहिजे. त्यासाठी त्याला स्वविकासार्थ वांछित कृती करण्याची गरज असते. आणि अशा कृती स्वातंत्र्यातच शक्य होऊ शकतात. याचा अर्थ स्वातंत्र्य हे कशाचे तरी साधन आहे काय, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही.
एखाद्या हुकुमशहाने आपल्या प्रजेच्या सर्व शारीरिक गरजा पूर्ण केल्या तर माणसाला स्वातंत्र्याची इच्छा राहणार नाही काय? जागतिक इतिहासाचा विचार केला तर या प्रश्नाचे उत्तर “ तशाही स्थितीत स्वातंत्र्याची आस राहीलच” असेच द्यावे लागते.  प्रारंभीच्या काही कालावधीसाठी  माणूस अशा राजवटीत समाधानी राहील. परंतु हे समाधान फार काळ टिकणारे नसते. लवकरच त्याची स्वातंत्र्याची उर्मी जागृत होते  आणि तो पारतंत्र्याच्या विरोधात लढायला तयार होतो. कारण माणसाला मुळातूनच शारीरिक-वाचिक कृतीचे स्वातंत्र्य हवे असते. अशा स्वातंत्र्याची इच्छा इतकी प्रभावी असते की  हे स्वातंत्र्य कशाचे तरी साधन नसून त्याला  साध्यमूल्यच आहे, असे वाटते. यामुळेच माणूस या स्वातंत्र्यासाठी आपल्या  सर्व ऐहिक सुखांचा त्याग करायला तयार होतो. एवढेच काय, तो स्वातंत्र्यासाठी आपले प्राणही द्यायला तयार होतो. थोडक्यात माणूस कोणत्याही परिस्थितीत, सोन्याचा असला तरी , पिंजऱ्यात बंदिस्त होऊ इच्छित नाही. याचा अर्थ स्वातंत्र्याला साधनमूल्यापेक्षाही अधिक मूल्य आहे, असे दिसून येते.
वरील विवेचनावरून स्वातंत्र्य हे माणसाची मुलभूत उर्मी आहे आणि ते मानवी प्रगतीचे साधनही असल्याचे ठरते. तथापि हे स्वातंत्र्य अनिर्बंध असून उपयोगाचे नाही. ते तसे असल्यास मानवी प्रगतीचा उद्देश पूर्ण होण्याची शक्यता नाहीशी होते. कारण असे अनिर्बंध स्वातंत्र्य समाजात स्पर्धा, संघर्ष आणि त्यातून अराजक निर्माण करू शकते. शारीरिक, मानसिक, बौद्धिक पातळीवर प्रत्येकजन वेगळा असल्यामुळे जे लोक बलवान आहेत ते बलहीनांचे शोषण व दमन करू शकतात. यातून अखिल मानवसमाजाच्या स्वातंत्र्याऐवजी मुठभरांचे स्वातंत्र्य प्रस्थापित होऊ शकते. इतिहासाने ते सिद्ध केलेच आहे.  सहाजिकच अशा समाजात समतेचे तत्त्व पायदळी तुडविले जाते. म्हणूनच अखिल मानव्याच्या कल्याणाच्या दृष्टीने समता व स्वातंत्र्य या मुल्यांचा ताळमेळ घातलाच पाहिजे. त्यासाठी स्वातंत्र्याचे तत्त्व समता व न्याय या तत्त्वांच्या मर्यादेतच राबविणे आवश्यक आहे. तरच या स्वातंत्र्याचा लाभ सर्व मानवसमाजाला होऊ शकेल.
परंतु मुठभर बलवानांनी आपल्या अनिर्बंध स्वातंत्र्याला मर्यादा का घालून घ्यावी? अशी मर्यादा घालून घेण्यासाठी त्यांच्यावर कोणती प्रेरणा कार्य करीत असावी? बलवानांनाही स्वातंत्र्याचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्याभोवतीचे वातावरण स्वस्थ असण्याची गरज आहे. अन्यथा त्यांना विनाअडथळा या स्वातंत्र्याचा लाभ घेता येणे शक्य होणार नाही. कारण स्वातंत्र्याअभावी बलहीनांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता  बलवानांच्या स्वातंत्र्यामध्ये अडथळे निर्माण करते. त्यासाठी अशा बलवान लोकांना आपल्या स्वातंत्र्याला मर्यादा घालून घेणे अपरिहार्य होते.
माणसाच्या ठिकाणी बंधुतेची भावनाही नैसर्गिकरीत्या अस्तित्वात असते. स्वातंत्र्याच्या तुलनेत ही भावना बलवान नसली तरी ती काही प्रमाणात तरी ती कार्य करीत असतेच. या भावनेमुळे व्यक्तीच्या मनात  आपल्या गटातील अन्य व्यक्तींच्या बाबतीत  सहानुभाव व आपुलकीची संवेदना निर्माण होते. या संवेदनेतून व्यक्तीच्या ठायी काही प्रमाणात तरी नि:स्वार्थी भावना निर्माण होत असावी. आपल्या सहकाऱ्यासाठी  आपल्या स्वातंत्र्यालाही मर्यादा आणण्याला त्याला आनंदच होत असावा. समाजात समता प्रस्थापित करण्यासाठीही राज्याला व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आणाव्या लागतात.
स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याच्या इच्छेतूनच ‘नीतिशास्त्र’ निर्माण झालेले आहे काय, असाही विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. आपल्याशी समोरच्याने कसे वागावे, याविषयी आपली एक निश्चित कल्पना असते. त्याने तसे वागावे यासाठी आपण बळाचाही वापर करू शकतो. पण आपल्यापेक्षा अधिक बलवान व्यक्ती आपल्या बाबतीतही त्याच बळाचा वापर करून आपल्यालाही गुलाम बनवू शकतो. मग यावर उपाय काय? मग समोरचा आपल्याशी ज्या प्रकारे वागावा, अशी आपली इच्छा असते, तसेच आपण त्याच्याशी वागल्यास काय होईल? कदाचित तोही आपल्याशी तसाच वागेल. यावर कांट या तत्त्वज्ञाचे विचार वाचणे मननीय ठरेल. थोडक्यात आपल्याला आपले स्वातंत्र्य निर्भयपणे वापरायचे असेल तर समोरच्यालाही त्याच्या स्वातंत्र्याचा उपभोग निर्भयपणे घेता आला पाहिजे. अर्थात अशा नीतीच्या प्रस्थापनेसाठी सबलांनीच पुढाकार घ्यायला हवा. अंतिम हिताचा विचार केल्यास दुसऱ्याचा विचार करून वागणे, आवश्यकच आहे, हे समाजाला समजल्यामुळे नितीशास्राचा उदय झाला असावा, असे वाटते. अशी नीती समाजात प्रस्थापित होण्यासाठी प्रथा, रूढी, धर्मवचनें व कायदा या बाबींची निर्मिती झाली असावी. साधारणत: धर्म हा नीतीचा स्रोत मानल्या जातो. परंतु सूक्ष्मपणे विचार केल्यास प्रथम सामाजिक आवश्यकता निर्माण होते आणि त्यानंतर समाज साधने निर्माण करतो, हे लक्षात येईल. म्हणूनच समाज टिकण्यासाठी नीती अपरिहार्य आहे, हे लक्षात आल्यानेच नीतिशास्त्र निर्माण झाले असावे, असे वाटते. आणि त्यानंतरच नीती प्रस्थापनेसाठी आणि ती टिकविण्यासाठी धर्माने पुढाकार घेतला असावा. म्हणूनच धर्म न मानणारी व्यक्तीही उच्च कोटीची नीतिमान असू शकते. थोडक्यात सांगायचे झाल्यास, नीती ही मानानिर्मित संस्कृतीचा भाग असून पुढे ती  आपल्या सवयीचा भाग झाली आणि आपल्याला मात्र नीती ही नितीसाठीच असते, असे वाटू लागले.
सारांश, समाजविकासाच्या ओघात प्रथम  स्वातंत्र्याची उर्मी उद्भूत झाली असावी. या स्वातंत्र्याच्या उपभोगासाठी बलवानांनी स्वत:च्या बळाने व अन्यायकारक तत्त्वांच्या सहाय्याने  समाजात विषमता प्रस्थापित केली. आणि ती टिकविण्यासाठी धर्माचा वापर केला. समाजातील अन्यायग्रस्त लोकांमधील जागृतीमुळे या बलवान लोकांना आपल्या स्वातंत्र्यावर मर्यादा आणणे आवश्यक ठरले. त्यातूनच समतेचा मार्ग सुकर झाला असावा.

Monday 2 November 2015

स्वामी विवेकानंद यांना समजून घेताना.

सामान्य भारतीयांच्या मनात स्वामी विवेकानंदांची प्रतिमा ‘हिंदू धार्मिक नेता’ अशीच असते. प्रत्यक्षात स्वामी विवेकानंद कोण होते, हे समजावून घ्यायचे असेल तर त्यांचे चरित्र आणि विचार मुळातूनच वाचले पाहिजेत. खरे विवेकानंद भारतीय समाजासमोर का येऊ शकले नाहीत, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि आपल्या देशाचे ते एक दुर्दैवच म्हणावे लागेल. स्वामी विवेकानंदांना समजून घेण्यासाठी त्यांची वक्तव्ये आपल्याला  उपयोगी ठरतील. त्या दृष्टीने मी त्यांची  काही वक्तव्ये उदधृत करणार आहे.
रामनदचे राजे ‘भास्कर सेतुपती’ यांना उद्देशून-  “ मोक्ष हेच संन्याशाचे लक्ष्य असले तरीही, भारतवर्षातील जनतेची उन्नती करण्याचा प्रयत्नदेखील मोक्षप्राप्तीचे एक साधन होय”
म्हैसूरच्या महाराजांना २३-०६-१८९४ रोजी शिकागोहून लिहिलेल्या पत्रातील काही अंश—
“भारताच्या सर्व प्रकारच्या दुर्गतीचे मूळ कारण आहे, तेथील दरिद्री सर्वसाधारण जनतेची दु:स्थिती. .....खालच्या म्हणून गणल्या जाणाऱ्या जातींच्या बाबतीत आमचे एकमेव कर्तव्य म्हणजे त्यांना शिक्षण देणे, त्यांच्या व्यक्तित्वाचा विकास करणे, हे होय. त्यांना हेच शिकवावे लागेल की, तुम्हीही माणसे आहा,.....या लोकांची ही जाणीवच मुळी हरपून गेली आहे. आपल्या देशातील कार्यकर्त्यांपुढे आणि राजांपुढे सेवेचे हे विस्तृत क्षेत्र पसरलेले आहे. आजपावेतो या दिशेने काहीच हालचाल झालेली नाही. पुरोहित-पंड्यांच्या आणि विदेशी राजशक्तींच्या पायाखाली शतकानुशतके सतत तुडविले गेल्यामुळे हे (खालचे गणले जाणारे) लोक विसरून गेले आहेत की तेही मनुष्यच होत. ......पुष्कळ दिवसांपासून माझ्या मनात याच (खालच्या म्हणून गणल्या जाणाऱ्या लोकांसंबंधी) कार्यासंबंधीच्या कल्पना सारख्या घोळत आहेत. त्यांना प्रत्यक्षात उतरविण्याचा उपाय मला भारतात आढळेना म्हणून मी या देशात(अमेरिकेत) आलो आहे. ......ही दरिद्री मुले शिक्षणकेंद्रावर येऊ शकत नसतील तर शिक्षणच त्यांच्या घरी न्यावे लागेल.”
या पत्रात स्वामीजींनी त्यांचा अमेरिकेत जाण्याचा उद्देश स्पष्ट केलेला आहे. आपल्याला उगीचच वाटते की स्वामीजी हिंदू धर्माची पताका फडकाविण्यासाठीच अमेरिकेत गेले.
आणखी काही उद्धरणे-----
१०-०७-१८९३ रोजी जपानहून त्यांच्या मद्रासी शिष्याला लिहिलेल्या पत्रात  स्वामी विवेकानंद लिहितात.
“(भारतीय सुशिक्षितांना उद्देशून-) ह्या हजारो वर्षांच्या साचलेल्या खुळचट समजुतींचा बोजा डोक्यावर घेऊन बसला आहात. शतकानुशतके खाद्य-अखाद्याचा विचार करण्यात सारी शक्ती बरबाद करीत आहात. पुरोहितगिरीरुपी महामुर्खपणाच्या भोवऱ्यात गरगरा चक्कर खात आहात. ......या, मनुष्य व्हा. आधी त्या दुष्ट पुरोहितांना दूर करून टाका. कारण हे बिनडोक्याचे लोक कधीही चांगल्या गोष्टी ऐकायला तयार व्हायचे नाहीत. त्यांचे हृदयही शून्य होऊन बसलेले आहे. त्याचा विकास-विस्तार कधीही होणे शक्य नाही. शेकडो शतकांच्या खुळचट समजुतींमध्ये आणि अत्याचारांमध्ये यांचा जन्म—आधी यांना बाजूस सारा.”
त्यांनी एका ठिकाणी लिहिले आहे-
“(आपल्या अनुयायांना उद्देशून-) लक्षावधी, कोट्यावधी दारिद्र्यपीडितांच्या हृदयातील वेदनेची स्वत:ला जाणीव होऊ द्या, निष्कपट होऊन त्यांच्यासाठी भगवंताजवळ सहाय्यार्थ प्रार्थना करा- साहाय्य लाभेलच लाभेल. वर्षांमागून वर्षे ह्याच चिंतेचा भार डोक्यावर,आणि ह्याच दु:खाचा भार हृदयामध्ये बाळगून मी सारखे भ्रमण केले आहे. तथाकथित धनी आणि मोठ्या लोकांच्या दारोदार फिरलो आहे. आणि अखेरीस हृदयाचे रक्त सांडत सांडत अर्धी अधिक पृथ्वी पायाखाली तुडवून या सुदूर विदेशी (अमेरिकेत) साहाय्यलाभाच्या आशेने येऊन उपस्थित झालो आहे. ......मी कदाचित या परदेशात थंडीने आणि उपासमारीने मारूनही जाईन, परंतु हे युवकांनो! आपल्या या दरिद्री, पतित आणि रंजल्यागंजल्या बांधवांसाठी प्राण पणास लावून प्रयत्न करण्याचा वारसा मी तुम्हा सर्वांसाठी मागे ठेवून जात आहे. तुम्ही या तीस कोटी नर-नारींच्या उद्धाराचे व्रत घ्या”

वरील उद्धरणावरून स्वामीजींचा खरा जीवनोद्देश काय होता आणि त्यांना आपल्याकडून काय अपेक्षित होते, हे स्पष्ट होते. त्यांचे अनुयायी म्हणवून घेणारे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायला तयार आहेत काय, हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही.

Monday 26 October 2015

चरित्रनायक समजून घेताना-

कोणत्याही महापुरुषाचे चरित्र लिहिताना चरित्रकाराने तटस्थता तर बाळगलीच पाहिजे. त्यासोबतच तो चरित्रविषय असलेल्या महापुरुषाशी समरसही व्हायला पाहिजे. तटस्थता बाळगल्यामुळे तो त्या महापुरुषाचे विचार, कृती, उक्ती यांचे योग्य असे  मूल्यमापन करण्यात यशस्वी ठरू शकतो. आणि समरसतेमुळे त्या महापुरुषाने व्यक्त केलेले विचार व केलेल्या कृती कोणत्या विशिष्ट सामाजिक-राजकीय-आर्थिक  अवस्थेत आणि कोणत्या मानसिक अवस्थेत केलेल्या आहेत याचे आकलन चरित्रकाराला होऊ शकते. कोणत्याही महापुरुषाच्या उक्ती-कृतीला त्या त्या देश-काळ-स्थितीच्या मर्यादा असतातच. चांगला चरित्रकार महापुरुषाच्या उक्ती-कृतीची मांडणी-वर्णन-मूल्यमापन करताना त्या त्या वेळची सामाजिक-राजकीय-आर्थिक अवस्था व त्या महापुरुषाची मानसिक अवस्था पार्श्वभूमीवर ठेवतो. त्यामुळे वाचकाला त्या महापुरुषाचे आकलन योग्यप्रकारे होते. शाहू महाराजांचे चरित्र लिहिताना त्या काळाची राजकीय स्थिती लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण महाराजांना विशिष्ट राजकीय स्थितीच्या मर्यादेत आपले काम करावे लागलेले आहे. सावरकरांचे चरित्र लिहिताना सावरकरांची जन्माठेपेमुळे जी मानसिक अवस्था झालेली होती, ती लक्षात घेतलीच पाहिजे. म्हणजे त्यांच्या माफिनाम्याचाही अर्थ लागू शकतो तसेच त्यांचा माणूसघाणेपणाही समजून घेता येतो. फुल्यांचे चरित्र लिहिताना त्यांच्या शिक्षण व ज्ञानाच्या मर्यादा आपण लक्षात घेतल्याच पाहिजेत. ते ज्या वातावरणात वाढले होते त्या वातावरणात तेवढी ज्ञान-साधणे त्यांना प्राप्त होणे शक्य नव्हते. किंवा अशी ज्ञान-साधणे मिळाली असती तरी त्यांना प्राप्त परिस्थितीत त्यांचा वापर करता आला असता काय? हे जर आपण समजून घेतले तर इंग्रजी सत्तेची वास्तविकता त्यांना समजली नाही ही बाब आपल्याला समजावून घेता येते. समाजातील सर्वात तळाशी असलेल्यांच्या उद्धाराची त्यांची तळमळ आपण समजून घेतली तर असा उद्धार करण्यासाठी इंग्रजी सत्ता अधिक अनुकूल होती, हे आपणास मान्य करावे लागेल. आणि मग इंग्रजी सत्तेविषयीची त्यांची आपुलकीही आपणास समजू शकते. मध्ययुगीन संतांची चरित्र लिहिताना संतांना असलेल्या त्या काळाच्या मर्यादा आपण लक्षात घेतल्याच पाहिजेत. आताच्या सामाजिक सुधारणांची त्यांच्याकडून अपेक्षा करणे चुकीचेच ठरेल. संतांकडून त्या काळात बुद्धिवाद, इहवाद यांची अपेक्षा करणेही  अवाजवीच म्हणावे लागेल. उगीचच आधुनिक मुल्ये त्यांना चिकटवणे अनैतिहासिकच म्हणावे लागेल. अशी मुल्ये त्यांच्या चरित्रात दाखविता आले नाहीत म्हणून  संत छोटेही ठरत नाहीत.
या दृष्टीने विचार करता धनंजय कीर हे चरित्रकार सर्वात उजवे ठरतात, असे मला वाटते. महात्मा फुले, शाहूमहाराज, बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर यांना खऱ्या अर्थाने समजावून घ्यायचे असेल तर कीरांच्या चरित्रांना पर्याय नाही, असे मला वाटते. त्यांची चरित्रे वाचताना चरित्रनायक गुण-दोषांसहीत आपल्यासमोर स्पष्ट होतात. ही चरित्रे वाचताना आपणामध्ये  या चरित्रनायकांचे दोषही समजावून घेण्याची क्षमता निर्माण होते.
जाता जाता-

वरील पार्श्वभूमीवर आपण चरित्रनायकांना देवत्व बहाल करून या देवतांना एकेका जातीमध्ये बंद करून त्यांच्या आकलनाचे  मार्गच बंद करीत नाहीत काय?

Sunday 18 October 2015

ब्राह्मणेतरांमध्ये प्रामुख्याने दोन गट पडतात. एक गट स्थितीवादी आहे. ते आर्थिकदृष्ट्या बऱ्या स्थितीत असतात किंवा सामाजिक इतिहासाविषयी बऱ्यापैकी अनभिज्ञ असतात. दुसरा गट बंडखोर आहे. इतिहासाची थोडीफार तरी जानकारी यांना असते. हे क्रियाशील असतात. पण यांची क्रियाशीलता इतकी तीव्र असते की ते चटकन टोकाच्या  निष्कर्षांवर येतात.
१)      स्थितीशील ब्राह्मणेतरांना बहुत्येक वेळा इतिहासातील समांतर प्रवाहाची जाणीव नसते. ते मुख्य प्रवाहातील विचारांनीच प्रभावित झालेले असतात.
२)      दुसऱ्या टोकावरील थोड्या प्रमाणात असलेल्या बंडखोर  ब्राह्मणेतरांचा  ‘इतिहासातील सर्व पापे ब्राह्मणांनीच केलेली आहेत’ यावर पूर्ण विश्वास असतो.
३)      सर्वच ब्राह्मण कावेबाज असतात, याची त्यांना खात्रीच असते. त्यामुळे कोणी ब्राह्मण सद्हेतूनेच केवळ काही विचार मांडत असेल यावर त्यांचा विश्वास बसने शक्य होत नाही.
४)      ब्राह्मणांवर टीकाच करायची असल्याने ते त्यांचे चुकीचे संदर्भ आधारासाठी घेतात. आणि या संदर्भांचा सरळ अर्थ न लावता वाकड्यात घुसतात. त्यांच्या मते हाच त्या संदर्भांचा गर्भितार्थ आहे. खरे तर यांना ब्राह्मणांना अचूकपणे पकडताच येत नाही.
५)      परंपरांना ते आवर्जून विरोध करतात. मग त्या काही वेळा चांगल्या असल्या तरी. त्यासाठी त्या परंपरांचा ते स्व अर्थ साधक असा अर्थ लावतील. बहुजन समाजाने मोठ्या प्रमाणात स्वीकृत केलेल्या काही परंपरांचा ते ब्राह्मण विरोधी असा अर्थ लावतील.
६)      ब्राह्मणेतरांच्या मधील बहुसंख्य ब्राह्मणेतर या बंडखोर ब्राह्मणेतरांना विरोध करतात किंवा उपेक्षा तरी करतात. पुरंदरे प्रकरणात विश्वास पाटील आठवावेत.
७)      अशा बहुत्येक ब्राह्मणेतरांना परंपरेचा भाग व्हायला आवडते.
८)      अशा  ब्राह्मणेतरांना वाद नको असतात. सगळे गोडी गोडी असणे त्यांना निर्धोक वाटते. बहुत्येक करून अशी मंडळी आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असतात. किंवा प्रस्थापित व्यवस्थेत त्यांना आपापल्या जागा प्राप्त झालेल्या असतात.
९)      ब्राह्मणेतरांमधील या फुटीमुळे- जसे सर्वच ब्राह्मण पुरंदरेंना पाठींबा देतात तसे सर्व ब्राह्मणेतर पुरंदरेंना विरोध करीत नाहीत. त्यातील विश्वास पाटलांसारखे काहीजण तर पुरंदरे यांचे कट्टर समर्थकही असतात.
१०)  ब्राह्मणेतरांमधील बंडखोर ब्राह्मणेतर दलित आणि मुस्लीम यांच्याबद्दल बरे बोलत असतात. ब्राह्मणांच्या विरुद्ध लढावयाच्या लढ्यात त्यांना दलित आणि मुस्लीम यांना सोबत घ्यावयाचे आहे. इतर ब्राह्मणेतर मात्र दलित आणि मुस्लीम यांच्याबाबत खाजगीत प्रतिकूल शेरे मारीत असतातच.
११)  बंडखोर ब्राह्मणेतर हे प्राय: हिंदुत्ववादाविरोधी असतात. त्यामुळे हे  हिंदुत्ववादी विचार व विचारवंत यांच्याविरुद्ध तुटून पडतात. हिंदुत्वाची मांडणी करणारे सावरकर किंवा शिवाजी महाराजांची हिंदू राजा अशी प्रतिमा  रंगविणारे  पुरंदरे म्हणूनच त्यांच्या टोकाच्या टीकेचे लक्ष्य ठरतात. मग सावरकरांचे निरातिशय देशप्रेम व इतर गुण  त्यांना महत्त्वाचे वाटणार नाहीत. किंवा शिवचरित्र लोकप्रिय करण्याचे श्रेयही ते पुरंदरेंना देणार नाहीत.

जाता जाता – मला वाटते, ब्राह्मण व ब्राह्मणेतर यांचे एकमेकाविरुद्ध टोकांवर असणे हे क्रिया-प्रतिक्रियांचा खेळ आहे काय? एकाने टोकावर जाऊन क्रिया व्यक्त केली की दुसरा गट दुसऱ्या टोकावर जाणारच. समतोल विचार करताच येणार नाही काय?

Thursday 15 October 2015

ब्राह्मणी दृष्टिकोन म्हणजे दृष्टीचा कोणता कोण?

अनेकांच्या बोलण्यात आणि लिहिण्यात ‘ब्राह्मणी विचार’, ‘ब्राह्मणी दृष्टिकोन’ असे शब्द सहजपणे येतात. परंतु या शब्दांचा नेमका अर्थ काय, याचा फारसा विचार कोणी करताना दिसत नाही. मी अनेक ब्राह्मणेतरांशी या विषयावर बोललो. त्यांना या शब्दांचा काय अर्थ अभिप्रेत आहे, यावर चर्चा केली. अशा चर्चांमधून ब्राह्मणेतरांच्या दृष्टीकोनातून वरील शब्दांचा मला समजलेला अर्थ पुढीलप्रमाणे मांडीत आहे. चुकल्यास क्षमस्व. 
१)      ब्राह्मण बव्हंशी ‘परम्पराभिमानी’ असतात. या देशातील मुख्य समजल्या जाणाऱ्या प्रवाहातील विचार, इतिहास त्यांना प्रिय असतात. समांतर परंपरा, जसे चार्वाक, बुद्ध, बसवेश्वर, चक्रधर, कबीर इत्यादिसारख्यांविषयी ते फारसे प्रेम व्यक्त करीत नाहीत.
२)      ते जातिभेदाचा निषेध करतात, पण हळूच चातुर्वर्ण्याविषयी soft corner व्यक्त करतात किंवा चातुर्वर्ण्याचा नि:संदिग्धरित्या निषेध करीत नाहीत. चातुर्वर्ण्य हे मुळात आदर्श व शास्त्रीय आहे, असे सांगण्याचा मोह त्यांना बऱ्याच वेळा आवरत नाही.
३)      ते बहुत्येक करून हिंदुत्ववादी असतात. यात त्यांना ‘परंपरागत हिंदू माणूस’ अभिप्रेत असतो. यांचा हिंदुत्वाचा पाया बऱ्याच प्रमाणात ‘मुस्लिमद्वेष’ हा असतो.
४)      मनुस्मृतीचा कितीही निषेध करीत असले तरी दुरान्वयाने  तरी मनुस्मृतीचे  गुणगान केल्याशिवाय राहत नाहीत.
५)      लोकप्रिय महापुरुषांना परंपरागत हिंदू म्हणून पाहण्यात त्यांना आनंद वाटतो. उदाहरणार्थ, शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, सरदार पटेल.
६)      जन्माने ब्राह्मण असलेल्या महापुरुषांना ब्राह्मणेतर महापुरुषांच्या तुलनेत, कळत किंवा नकळत, अधिक महत्त्व देऊन जातात.  ज्ञानेश्वरांच्या तुलनेत नामदेवांचे मूल्यमापन करताना कमी पाने खर्च होतात. तसेच रामदासांच्या तुलनेत तुकारामांचे मूल्यमापन करण्यासाठी कमी शब्द पुरतात.
७)      स्वातंत्र्य, समता, बंधुता धर्मनिरपेक्षता इत्यादी मुल्यांचा स्रोतही त्यांना भारतीय इतिहासातच सापडतो. परंतु या मुल्यांचा फारसा आग्रह धरताना मात्र ते दिसत नाहीत.
८)      यातील काहीजण ब्राह्मणांनाही शिव्या देतात. असे वाटते की हे खरोखरच ब्राह्मणी प्रभावापासून मुक्त झालेले आहेत. पण ते शेवटी किंतु-परंतुने आपल्या लिखाणाचा शेवट करतात आणि जे सांगायचे ते सांगतातच.
९)      हे जात्याच हुशार असतात. कोणतेही लिखाण करताना अवाजवी किंवा आक्षेपार्ह शब्द, विधाने टाळूनही वाचकांना जे द्यायचे ते देतातच. असे लिखाण वाचून जो एकंदर प्रभाव निर्माण होतो तो ब्राह्मणेतर किंवा पुरोगामी यांना आवडत नाही. परंतु या प्रभावाला विरोध करण्यासाठी या ब्राह्मणेतरांना अशा लिखाणात नि:संदिग्ध पुरावे मात्र सापडत नाहीत.

पुरंदरे यांच्या शिवचरित्राने जनमानसांत शिवाजी महाराजांची जी हिंदुत्वप्रधान प्रतिमा निर्माण झालेली आहे ती पुरोगाम्यांना व ब्राह्मणेतरांना आवडत नाही. परंतु पुरंदरेंच्या विरोधात बोलताना त्यांना स्पष्ट संदर्भ मात्र सापडत नाहीत. मग ही ब्राह्मणेतर मंडळी आवश्यक असे संदर्भ कुठेतरी शोधण्याचा प्रयत्न करतात. असे करताना काहीतरी चुका करतात. आणि अशा चुका शोधण्यात संजय सोनवणी सारखे आपली विद्वत्ता व बुद्धिमत्ता खर्च करतात.
१०)  दलित-पिडीत-शोषित यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त करतीलच, पण सामाजिक असंतोषातून निर्माण होणाऱ्या विद्रोहाबाबत मात्र असमाधान व्यक्त करतील. दलितांसाठी देवाचे दार बंद असेल तर ते उघडण्यासाठी बंड न करता वेगळेच मंदिर बांधतील.
११)  हे गांधी-नेहरूवर टीका करायची एकही संधी सोडणार नाहीत, पण त्या त्या वेळी बाबासाहेब आंबेडकरांची आवर्जून स्तुती करतील. परंतु असे करताना बाबासाहेबांचा विद्रोह, प्रभंजन या बाबींना मुळीच  high light  करणार नाहीत.
जाता जाता-
पुरंदरे प्रकरणात पुरंदरेंच्या समर्थनासाठी बहुसंख्य ब्राह्मण मैदानात उतरले असले तरी त्यामध्ये लक्षणीय प्रमाणात ब्राह्मणेतरांचाही समावेश होता. तथापि पुरंदरेंना विरोध करणाऱ्यांमध्ये मात्र एकही ब्राह्मण नव्हता. असे का व्हावे?     

Thursday 8 October 2015

लोकशाही समाजवादाची आवश्यकता.

‘लोकशाही समाजवाद’ हे आपले उद्दिष्ट असल्याचे आपली राज्यघटना उद्घोषित करते. परंतु मुक्त व उदार आर्थिक धोरणांमुळे परिपोषित होणारी व बहुसंख्य विचारवंतांकडून आणि नेत्यांकडून समर्थन प्राप्त असलेली भांडवलशाही सध्या लोकशाही समाजवादाला संदर्भहीन करीत आहे. त्यामुळे आता लोकशाही समाजवादाला फक्त ऐतिहासिक महत्त्वच तेवढे उरले आहे असे वाटत आहे. लोकशाही समाजवाद ही विचारसरणी खरोखरच कालबाह्य झालेली आहे काय, यावर आता गंभीरपणे विचार करण्याची वेळ  आलेली आहे. या विचारसरणीच्या आवश्यकतेविषयी चर्चा करण्यापूर्वी आपण लोकशाही समाजवाद म्हणजे काय, यावर थोडा विचार करूयात.
जगाचा इतिहास हा वर्गसंघर्षाचा असून आता सर्व साधनसंपत्तीची मालकी शोषित-वंचित कामगारांनी घेण्याची वेळ आलेली आहे असे मार्क्सने जाहीर केले आणि मार्क्सवादी तत्त्वज्ञानाचा उदय झाला. मार्क्सवाद अर्थात साम्यवादात केवळ देशातीलच  नव्हे तर जगातील भांडवलाची मालकी तसेच नियंत्रण कामगारांकडे अर्थात समाजाकडे येणे अपेक्षित होते. भांडवलाच्या अशा नियंत्रणातून संपत्तीचे समान वितरण घडवून आणणे हे साम्यवादी विचारसरणीचे अंतिम उद्दिष्ट होते. मार्क्सवादाचे प्रयोग करताना मार्क्सवादाच्या मर्यादा दिसून आल्या. मार्क्सवादाचे ध्येय हे माणसाच्या स्वार्थ व व्यक्तिवाद या मुलभूत प्रेरणेच्या विरुद्ध असल्यामुळे मार्क्सवादाचे अपयश अपरिहार्यच झाले. मार्क्सवादाच्या या उणिवांच्या पार्श्वभूमीवर समाजवादी विचारसरणीचा विकास झाला. यामध्ये प्रथम साधनसंपत्तीची मालकी सरकारकडे असणे अपेक्षित होती; परंतु असे सरकार लोकशाही तत्त्वावर अधिष्ठित असणे अभिप्रेत असते. आपल्या देशातही आपल्या अर्थव्यवस्थेला आकार आणि उभारी देण्यासाठी  पंडित नेहरूंनी रशियन समाजवादी व्यवस्थेकडून प्रेरणा घेतल्याचे दिसते. परंतु हे करताना लोकशाही मुल्ये ही समाजवादी व्यवस्था अंमलात आणण्यासाठी आधार मानली गेली. पंचवार्षिक नियोजनाच्या माध्यमातून पायाभूत क्षेत्रात सार्वजनिक उपक्रमांची स्थापना केली गेली. बँकिंग, रेल्वे, रोड वाहतूक या क्षेत्रात सरकारचे संपूर्ण नियंत्रण आले. एकंदर अर्थव्यवस्थेवर बाजाराच्या नियंत्रणाऐवजी सरकारी नियंत्रण प्रस्थापित झाले.  अशा प्रकारे लोकशाही मूल्यावर अधिष्ठित राज्यव्यवस्थेद्वारे अर्थव्यवस्थेवर संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित करून साधनसंपत्तीचे समान वितरण घडवून आणण्याचे उद्दिष्ट मानणारी विचारसरणी म्हणजे  लोकशाही  समाजवाद असे सुरुवातीला अभिप्रेत होते. तथापि या प्रकारच्या लोकशाही समाजवादाद्वारे  वरील उद्दिष्ट साध्य करणे आपल्याला फारसे शक्य झाले नाही, हे पुढील काळात सिद्ध झाले. शेवटी सरकारने १९९१ पासून  देशाची आर्थिक स्थिती सुधारणेच्या उद्देशाने आर्थिक सुधारणा राबविण्यास सुरुवात केली. यात खजगी भांडवलाला प्राधान्य, अर्थव्यवहारांवर बाजाराचे नियंत्रण, सरकारी नियंत्रणात शिथिलता आदी उपायांचा समावेश होता. खरे तर अशा सुधारणांचा अवलंब म्हणजे समाजवादाचा त्याग आणि भांडवलशाहीकडे वाटचाल हेच होय. त्यामुळे आपली आर्थिक संकटातून सुटका झाली, असे वाटते. परंतु आर्थिक सुधारणेच्या या काळात गरीब व श्रीमंत यांच्यामधील दरी  वाढलेली आहे. जगातील सर्वांत श्रीमंत अशा १% लोकांकडे २००९ मध्ये एकूण ४४% एवढी संपत्ती होती. २०१४ मध्ये ही संपत्ती ४८% पर्यंत वाढलेली आहे. आपल्या देशातही या बाबतीत अशीच स्थिती आहे. भारतातील १०% उच्चत्तम श्रीमंत वर्गाकडे ७५% एवढी संपत्ती आहे. १०% सर्वोच्च श्रीमान्तांकडे  तळातील १०% लोकांपेक्षा ३७० पट अधिक संपत्ती आहे. दुर्दैवाने ही दरी उत्तरोत्तर वाढत आहे. उत्पन्नाच्या बाबतीतही सर्वोच्च १०% श्रीमंतांच्या उत्पन्नाचा वाटा १९९२ मध्ये २५.३२% होता. तो २०१० मध्ये २७.१६% पर्यत वाढला. या उलट तळातील १०% लोकांचे एकूण उत्पन्न १९९२ मध्ये ३.८४% होते . ते कमी होऊन २०१० मध्ये ३.६३% एवढे झाले. याचा अर्थ हे आकडे गरीब-श्रीमंतांमधील दरी उत्तरोत्तर वाढत असल्याचे दर्शवितात, हे उघड आहे. या वाढत्या दरीमुळे उत्तरोत्तर सामाजिक समतोल बिघडत चाललेला आहे. आर्थिक प्रगती करण्यास प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र आहे या तत्वामुळे पैशाला अधिकच प्रतिष्ठा मिळाली आहे. त्यामुळे समाजात पैसा मिळविण्यासाठी स्पर्धा व त्यातूनच  संघर्ष सुरु झालेला आहे. या स्पर्धा-संघर्षामुळे समाजात  परस्पर विश्वास, प्रेम, सौहार्द यांचा अभाव निर्माण होत आहे. मिळालेल्या अतिरिक्त पैशाचा परिणाम चंगळवादी प्रवृत्तीमध्ये वाढ होण्यात होत आहे. त्यामुळे निसर्गाचे शोषण आणि प्रदूषण वाढत आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्यामधील वाढती दरी ही गरीब-शोषित-वंचित यांच्या शोषणाची निदर्शक आहे. याचा अर्थ समाजवादी अर्थव्यवस्था संपत्तीचे समान वितरण घडवून आणण्यात यशस्वी ठरत नाही आणि भांडवलशाही ही समान वितरणाच्या तत्त्वाला सुरुंग लावते. निरोगी आणि स्वस्थ समाजव्यवस्था निर्माण करायची असेल तर संपत्तीचे न्याय्य वाटप होणे आवश्यक आहे. आणि हे साध्य करण्यासाठी समाजवादी तत्त्वाची कास धरण्यावाचून  पर्याय दिसत नाही. आर्थिक सुधारणेच्या या युगात आर्थिक स्वातंत्र्याचा त्याग करणेही शक्य नाही. मग यातून कसा मार्ग काढायचा हा जगातील विचारवंतांसमोरील महत्त्वाचा प्रश्न असायला हवा.
बदलत्या आर्थिक-सामाजिक पार्श्वभूमीवर व्यक्तीचे  आर्थिक स्वातंत्र्य शाबूत ठेवून तिच्यामध्ये  समाजवादी वृत्ती बिम्बविण्याचा प्रयत्न करणे हेच आपले उद्दिष्ट असले पाहिजे. लोकशाही राज्यव्यवस्थेद्वारे व्यक्तीच्या  स्वातंत्र्याची जपवणूक करून आणि त्याच राज्यव्यवस्थेद्वारे लोकसंमतीने विशिष्ट आर्थिक धोरणांची अंमलबजावणी करून समाजाच्या  तळातील लोकांच्या हिताला प्राधान्य देता येईल. आधुनिक काळाच्या संदर्भात  लोकशाही समाजवादाचा हाच अर्थ अभिप्रेत असायला हवा. तथापि समाजवादी व्यवस्था निर्माण करण्याचे हे उद्दिष्ट समाजवास्तवावर आधारित असल्याचे दिसत नाही. स्वार्थ ही माणसाची सहज प्रेरणा आहे. या स्वार्थाला मोठ्या प्रमाणात तिलांजली दिल्याशिवाय ‘लोकशाही समाजवाद’ अस्तित्वात येऊ शकत नाही. जेंव्हा व्यक्तिहिताला बाधा निर्माण होते तेंव्हाच फक्त  ही बाधा दूर करण्याच्या दृष्टीने  माणूस समष्टीच्या हिताची बाजू घेत असल्याचे दाखवितो. व्यष्टी-समष्टीमधील परस्परसंबंध गुंतागुंतीचे असून  अंतिमत: प्राधान्य व्यष्टीलाच दिले जाते. हा प्राधान्यक्रम बदलल्याशिवाय ‘लोकशाही समाजवाद’ अस्तित्वात येऊ शकत नाही. माणसात व्यक्तीहिताबरोबरच समाजहिताचा दृष्टीकोन  आणण्यासाठी काय करावे लागेल हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. समाजहित हे व्यक्तीहिताशी सुसंगत असेलच  याची खात्री देता येत नाही. बऱ्याच वेळा समाजहित हे व्यक्तीहिताच्या विरुद्धही असते. आणि माणूस स्वार्थी असल्यामुळे त्याचा ओढा स्वभावत: व्यक्तीहिताकडे असतो. ‘नाही रे’ वर्गातील व्यक्ती समाजवादाची भूमिका घेत असली तरी ती जेंव्हा आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत येते तेंव्हा व्यक्तिहितालाच प्राधान्य देते, हे आपल्या प्रत्यही अनुभवाला येते.
व्यक्तिहितामध्ये आपल्या भावी पिढीच्या व्यक्तिहिताचा समावेश केला तर आपण थोडा वेगळा विचार करू शकतो. काही बाबतीत तत्कालिकदृष्ट्या व्यक्तीहित महत्त्वाचे वाटले तरी भविष्याचा विचार केला तर ते अहितकारकच असते. निसर्गाचे व समाजाचे शोषण/प्रदूषण करून समृद्धी उपभोगणाऱ्या व्यक्तीला व्यक्तिवाद आकर्षक वाटणारच. परंतु निसर्गाचे हे अतिरिक्त शोषण/प्रदूषण हे आपल्याच  भावी पिढीच्या दृष्टीने विनाशकारी ठरू शकते, असा विचार केल्यास माणूस या प्रकारच्या व्यक्तिवादाकडे वेगळ्या नजरेने बघू शकेल, असे वाटते. भ्रष्टाचाराच्या आधारे समृद्ध जीवन जगणाऱ्यांना वाटले पाहिजे की आपले वारसही याच  भ्रष्टाचाराचा बळी ठरू शकतात. आज आपण टेबलाच्या या बाजूस आहोत. उद्या  तुमचा मुलगा टेबलाच्या दुसऱ्या बाजूस असेल आणि तिसराच कोणीतरी टेबलाच्या या बाजूस बसून त्याचे शोषण करीत असेल. आपल्याच समाजाचे शोषण करून समृद्धीची बेटे तयार करणाऱ्यांनी हेही लक्षात घेतले पाहिजे की शोषणामुळे अधिकाधिक दरिद्री झालेला हा समाजसागर तुमची ही बेटे गिळंकृत करू शकतो.
वरील विवेचनावरून असे वाटू शकते की अंतिम हित लक्षात घेतल्यास समष्टीवादच व्यक्तिवादाच्या तुलनेत महत्त्वाचा आहे. परंतु लोकशाही समाजवाद अस्तित्वात येण्यासाठी एवढे पुरेसे नाही. लोकशाही समाजवादाचा मूळ आधार ‘बंधुता’ हे तत्त्व आहे. फ्रेंच राज्यक्रांतीने समता, स्वातंत्र्य या तत्त्वांबरोबरच बंधुता या तत्त्वाचा जरी उद्घोष केला असला तरी या तत्त्वाचा समाजविचारात पुढे पाहिजे तेवढा अवलंब  करण्यात आला नाही. समता व स्वातंत्र्य या तत्त्वांचा  व्यक्तिवाद्यांनी आपल्याला हवा तोच अर्थ काढला. कायद्यासमोर सगळे समान, व्यक्तिविकासासाठी समान स्थिती असणे आणि त्यासाठी व्यक्ती स्वतंत्र असणे, हाच या तत्त्वांचा अर्थ लावल्या गेला. बंधुता हे तत्त्व  व्यक्तिवादाला फारसे अनियंत्रित होऊ देत नाही. सहानुभाव, प्रेम, संवेदनशीलता हे बंधुता या तत्त्वाचे आधार आहेत. माणसामध्ये बंधुत्वाच्या भावनेचाही स्वभावत:च आढळ होतो. परतू स्वार्थापुढे या तत्त्वाची मातब्बरी नाही.
पूर्वी म्हटल्याप्रमाणे शोषणाची अवस्था ही लोकशाही समाजवादी विचाराला पुढे आणते, हे खरे असले तरी ही अवस्था संपली की माणसाला व्यक्तिहितच आठवते. जगाचा इतिहास याला साक्षी आहे. याचा अर्थ ‘लोकशाही समाजवाद’ ही तात्कालिक अवस्था आहे काय ? आर्थिकदृष्ट्या सुस्थितीतील समाज  अस्तित्वात आणण्याचे केवळ साधन  आहे काय ? आर्थिकदृष्ट्या सुस्थितीतील समाजाला लोकशाही समाजवादाची आवश्यकता नाही काय ? संपत्तीचे बऱ्यापैकी(पूर्णपणे नव्हे) समान वितरण हेच लोकशाही समाजवादाचे उद्दिष्ट आहे काय ?
लोकशाही समाजवादाचा असा नकारात्मक विचार करणे योग्य ठरणार नाही, असे वाटते. व्यक्ती, समाज आणि त्यांचे भवितव्य यासाठी लोकशाही समाजवाद सर्व काळी व सर्वदेशी उपयुक्त आहे, असे वाटते. व्यक्तीवादाला नियंत्रित करून समाजहिताला प्राधान्य  देण्यामध्ये लोकशाही समाजवाद महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, हे लक्षात घेतले पाहिजे. केवळ व्यक्तीहित हे समाजात अस्वस्थता निर्माण करून समाजाचे पर्यायाने व्यक्तीचे आरोग्य बिघडवू शकते. व्यष्टी व समष्टीचे संबंध हे परस्परपूरक आहेत, हे आपण क्षणभरही विसरता कामा नये. या परस्परसंबंधांची काळजी घेण्यास लोकशाही समाजवाद समर्थ आहे, असे वाटते. व्यष्टी-समष्टीच्या हितांचा ताळमेळ साधणे एकंदर मानवीहितासाठी अत्यावश्यक आहे. लोकशाही समाजवाद हे तत्त्व या ताळमेळाला आधार पुरविते. यासाठी समाजात लोकशाही समाजवादाचे तत्त्व रुजविणे आवश्यक आहे. लोकशाही समाजवाद हा केवळ राजकीय विचार नसून ती एक जीवननिष्ठा आहे. सामाजिक स्वास्थ्य हे व्यक्तिहिताला आधार पुरविते. आणि सामाजिक स्वास्थ्य निर्माण करायचे असेल तर लोकशाही समाजवादाला पर्याय नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

लोकशाही समाजवाद हे जीवनमूल्य समाजात रुजविण्यासाठी दोन पातळींवर  प्रयत्न व्हायला हवेत. एक म्हणजे सामाजिक पातळीवर आणि  दुसरे म्हणजे शासनाच्या पातळीवर. वर म्हटल्याप्रमाणे  बंधुता हे तत्त्व लोकशाही समाजवादाचा आधार आहे. त्यासाठी बंधुतेला सुसंगत अशा संस्थांची उभारणी करणे आवश्यक आहे. तसेच या विचाराला सुसंगत असे तत्त्वज्ञान व चळवळी उभारणे आपले कर्तव्य आहे. हे प्रयत्न सामाजिक पातळीवर होऊ शकतात. यात लोकशाही शासन लोकसहभाग प्राप्त करून पुढाकार घेऊ शकते. शासनपातळीवर शासनाने आपली धोरणे ठरविताना समाजाच्या तळातील लोकांची उन्नती करण्याच्या दृष्टीने त्यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. संपत्तीचे वितरण समान व न्याय्य होण्याच्या दृष्टीने शासनाचे प्रयत्न राहिले पाहिजेत. व्यक्तिविकासाला पुरेसा वाव देऊनही हे साध्य करता येऊ शकते. मुठभर श्रीमंतांना त्यांचे  स्वास्थ्य व सुरक्षा हवी असेल तर त्यांनाही या लोकशाही समाजवादाच्या प्रस्थापनेसाठी सहकार्य करावे लागेल. लोकशाही समाजवादाचा हाच आधुनिक अर्थ आहे.

Monday 31 August 2015

आर्थिक निकषांवर आरक्षण ?

लोकांचा मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळवायचा असल्यास समतोल विचार किंवा विधायक कार्य फारसे उपयुक्त ठरत नाही. त्यासाठी हवा अत्यंत स्वार्थी असा आततायी विचार आणि भडकावू भाषणे! हार्दिक पटेल यांना मिळणारा भरगोस पाठींबा हा वरील वास्तवाची प्रचीती आणून देतो. आपल्या गटाच्या स्वार्थापुढे इतर कोणत्याही गटाच्या हिताची काळजी करण्याचे कोणतेही करण हार्दिक पटेलसारख्यांना दिसत नाही. पटेलांचे आरक्षण समाजातील खरोखरच्या दलित-पिडीत-शोषित लोकांवर काय अनिष्ट परिणाम करणार आहे, याचीही  काळजी पटेलांना करावीशी वाटत नाही. हे अत्यंत दुर्दैवी आणि काळजी वाढविणारे आहे यात शंका नाही. या निमित्ताने विचारवंतानी आरक्षण या विषयावर पुन्हा एकदा गंभीरपणे व तटस्थपणे चिंतन करण्याची गरज आहे, याची जाणीव होते. खाजगी भांडवलाचा विस्तार होत असला तरी सरकारी क्षेत्र अजूनही मोठेच आहे. त्यामुळे आरक्षणाचे आकर्षण इतक्यात कमी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे आरक्षणामुळे अशा किती नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत, असा युक्तिवाद करून या विषयापासून पळण्यात अर्थ नाही.   
सर्वंकष समतेकडे वाटचाल करताना आर्थिक क्षमतेसोबतच सामाजिक क्षमतेचाही विचार करणे आवश्यक आहे. करण आर्थिक क्षमता वाढली तरी त्यासोबत सामाजिक प्रतिष्ठा मिळेलच असे नाही. मागासलेली जात हा घटक व्यक्तीची अप्रतिष्ठा तर निश्चित करतोच त्या सोबतच बहुतेक करून व्यक्तीचा  आर्थिक मागासलेपणाही निर्देशित  करतो. म्हणूनच आरक्षणाचे धोरण ठरविताना जात हा हा आधार ठरविला गेला असला पाहिजे. त्याचबरोबर जात हा घटक वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असून तो  निश्चित, स्पष्ट आणि अपरिवर्तनीय स्वरूपाचा आहे. त्यामुळे आरक्षणाची अंमलबजावणी सुलभ होते. तथापि आजच्या काळात जातीयतेची आग उत्तरोत्तर भडकत असून या आगीत मानवतेचा स्वाहा होण्याची भीती वाटत आहे. अलीकडच्या काळात जाती आधारित सामाजिक विषमतेचे प्रमाणही  बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येते. त्यामुळे कधी कधी वाटते आरक्षणाचा आधार आर्थिक निकषावर ठरविणे योग्य होईल काय? असा आर्थिक निकष ठरविण्यातही अनेक अडचणी आहेत, हे खरेच. आर्थिक निकषावर आरक्षण द्यावयाचे ठरल्यास व्यक्तीची सामाजिक अक्षमता ध्यानात घेतली जावू शकत नाही. आपल्या देशात जाती आधारित सामाजिक अक्षमता असंख्य लोकांना पांगळी करीत आहे, हे लक्षात घेतल्यास ही अडचण मोठीच आहे हे लक्षात येते. दुसरी अडचण आहे आर्थिक निकष निश्चित करण्याची ! आर्थिक निकषाला वस्तुनिष्ठ स्वरूप देणे खूपच कठीण आहे. त्यामुळे ज्यांना आरक्षण मिळण्याची गरज नाही त्यांना ते  मिळण्याचा आणि ज्यांना त्याची अत्यंत गरज आहे त्यांना ते न मिळण्याचा धोका निर्माण होतो. आर्थिक निकष  हा आकर्षक व तर्कदृष्ट्या निर्दोष वाटत असला तरी त्याआधारे आरक्षणाची  अंमलबजावणी गोंधळ निर्माण करू शकते, यात शंका नाही.
जाती आधारित आरक्षणातही आता फार मोठ्या समस्या निर्माण होत आहेत. आरक्षणाचा फायदा घेवून जी मंडळी सुस्थितीत आलेली आहेत  त्यांच्याशी त्याच जातीतील सर्वार्थाने अक्षम लोकांना स्पर्धा करावी लागत आहे. अशा स्पर्धेत या अक्षम लोकांचा पराभव होणे नेहमीचेच झालेले आहे. दुसरे म्हणजे जाती आधारित आरक्षणामुळे मागास जातीतील सुस्थितीत असणारे लोक अनारक्षित  जातीतील दु:स्थितीत असणाऱ्या लोकांच्या तुलनेत प्राधान्यक्रमावर असतात. यामुळे सामाजिक असंतोषात वाढ होऊन सामजिक तेढ निर्माण होत आहे. अर्थात या युक्तिवादामागे जातीआधारित आरक्षणाला विरोध करण्याचा हेतू नसून आरक्षण धोरण ठरविणे किती गुंतागुंतीचे आहे , हे सांगण्याचा आहे.
दुसरे म्हणजे जातीआधारित आरक्षणाला समर्थन देणे हे पुरोगामित्वाचे व विरोध करणे हे प्रतीगामित्वाचे लक्षण मानले जाते. त्यामुळे समाजातील तुलनात्मकदृष्ट्या सुस्थितीतील जातीही आक्रमकपणे आरक्षणाची मागणी करीत आहेत. मागासलेल्या जातीतील आर्थिक विषमतेमुळे आधीच आरक्षणाच्या हेतूचा पराभव होत आहे. त्यात या जातींना आरक्षण दिल्यास खऱ्या अर्थाने मागास असलेल्या जातींच्या हिताचे काय होईल, याचाही विचार करणे आवश्यक आहे. तसेच या जातींना आरक्षण दिल्यास इतर तथाकथित उच्च जातींचा स्कोप कमी होणे निश्चित होते. त्यामुळे त्यांच्यातही वैफल्याची भावना निर्माण होणे स्वाभाविक आहे.
थोडक्यात सांगायचे झाल्यास आरक्षणाचा निकष आर्थिक असो की जातीय , दोन्हीतही मोठी गुंतागुंत आहे यात शंका नसावी. तथापि आजची जातीय अस्मितांची भडकणारी आग पहिली की वाटते आरक्षणाचा निकष आर्थिक ठेवणे योग्य होईल. परंतु असा निकष वस्तुनिष्ठ असला पाहिजे. आणि अशा आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी एक स्वायत्त अशी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली पाहिजे.

Sunday 23 August 2015

मतभेद असण्याबद्दल कोणाचा मतभेद असण्याचे कारण नाही. कारण ‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’ हे सगळ्यांना मान्य असावे. पण जेंव्हा गटा-तटाचे राजकारण सुरु होते, तेंव्हा मात्र  ते सामाजिक आरोग्यावर अनिष्ट परिणाम करते. खरे तर गटा-तटाची भावना ही माणसाच्या ठिकाणी असलेल्या ethnocentrism  चा परिणाम असते. आपल्याकडील जातीय अहंकार आणि जातीय पूर्वग्रह या ethnocentrism चाच देशी अविष्कार आहे. म्हणूनच प्रत्येक गटाला आपलीच विचारसरणी व आदर्श खरे वाटतात. खरे तर ethnocentrism ला बैद्धिक-तार्किक आधार कमी व भावनिक आधारच  जास्त असतो. त्यामुळे या गटांचे मनोमिलन होण्याची  शक्यता अवघड बनते. म्हणूनच अशा राजकारणाला आपण निरुत्साहितच केले पाहिजे. परंतु आजकाल विशिष्ट गटाचा पाठींबा आणि त्यातूनच लोकप्रियता मिळविण्यासाठी अशा प्रकारच्या राजकारणाला प्रोत्साहित केले जाते. गटा-तटाच्या राजकारणाचा बिमोड करण्यासाठी पहिल्या प्रथम  जातीय अहंकार आणि जातीय पूर्वग्रह यांना दूर करून आपले वर्तन व विचार  ‘मनुष्य मात्र होवोनि असावे’ या चक्रधरोक्तीप्रमाणे ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपले तेच खरे याचा अट्टाहास सोडून देऊनच आपल्याला  कोणत्याही गोष्टीचा विचार करताना विरोधी विचाराच्या व्यक्तीच्या मानसिकतेशी समरस होणे शक्य होईल. त्यामुळे आपल्या मनातील द्वेष कमी होऊन आपण ज्ञान व प्रेम यासाठी अधिक पात्र व  मोकळे होणे शक्य होईल.

Wednesday 19 August 2015

बाबासाहेब पुरंदरे यांची शिवाजी महाराजांप्रती असलेली निष्ठा आणि प्रेम यावर संशय घेण्यात अर्थ नाही. या निष्ठेमुळेच त्यांनी शिवचरित्राला वाहून घेतलेले आहे. तथापि त्यांनी शिवचरित्र हे त्यांच्या चष्म्यातून पहिले आणि तसेच रंगविले. शिवाजी महाराजांचे एकंदर व्यक्तिमत्त्व, त्यांचा एकंदर दृष्टीकोन कदाचित बाबासाहेबांना गवसला नसावा. आपण ज्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक पर्यावरणात वाढलेलो असतो त्याचा परिणाम आपल्या एकंदर व्यक्तिमत्त्वात आणि वैचारिक दृष्टिकोनावर होतोच होतो. थोडक्यात आपले पर्यावरण आपल्याला एक वैचारिक चौकट किंवा चष्मा प्रदान करते. बाबासाहेबांनाही त्यांच्या पर्यावरणाने त्यांना एक चष्मा दिलेला आहे. हा चष्मा पुरोगाम्यांच्या चाष्म्यापेक्षा निश्चितच वेगळा आहे. बाबसाहेब खऱ्या अर्थाने इतिहासकार नसल्यामुळे त्यांना हा चष्मा थोडाही दूर करता आलेला नसावा. इतिहासकारांना तरी तो पूर्णपणे काढता येतो काय? शिवाजी महाराज हे हिंदू असले तरी आजच्या हिंदुत्वाचे  त्यांच्या हिंदुत्वाशी कोणतेही साधर्म्य नाही. बाबासाहेबांच्या ग्रंथांमधून मात्र आधुनिक हिंदुत्ववाद्यांना आपल्या हिंदुत्वाचा स्रोत सापडला असावा. पुरोगाम्यांना शिवाजी महाराज आधुनिक अर्थाने धर्मनिरपेक्ष वाटत असल्यामुळे त्यांना गोब्राह्मणप्रतिपालक शिवप्रतिमा आवडणे शक्यच नाही. थोडक्यात हा प्रतिमा संघर्ष आहे की काय, असे वाटते. एकदा संघर्ष सुरु झाला की मग दुसऱ्या बिनमहत्त्वाच्या गोष्टी दोन्ही बाजूंकडून समोर केल्या जातात. आणि वातावरण अधिकाधिक गढूळ होते.

काही झाले तरी बाबासाहेबांचा उद्देश शिवचरित्रावर शिंतोडे उडविण्याचा असण्याचे कारण नाही. परंतु दोन्ही बाजूंकडील लोकांचा  अहंकार आणि पूर्वग्रह त्यांना सत्याप्रत  येऊ देत नाही, हेच खरे.

Friday 14 August 2015

अनिश्चित मान्सून

पाणीप्रश्न उत्तरोत्तर उग्र होत असल्याचे दिसत आहे. या विषयातील तज्ज्ञ या प्रश्नाचे गांभीर्य अनेक वर्षांपासून लोकांच्या नजरेस आणून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु या बाबत लोकांमध्ये पुरेशी जागृती अद्यपिही झालेली नाही. आणि सत्ताधाऱ्यांनी हा प्रश्न कधीच मनावर घेतल्याचे दिसले नाही. कागदावर योजना आखायच्या व त्यांची थातूर मातूर अंमलबजावणी करायची एवढेच या विषयी सरकारचे योगदान असते.
सुधाकरराव नाईक यांनी मात्र हा प्रश्न मनापासून आपल्या अजेंड्यावर घेतला होता. त्यांनी या विषयासाठी मंत्रालयात एका विभागाची स्थापना केल्याच्या बातम्याही कानावर आल्या होत्या. परंतु दुर्दैवाने त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. त्यांनी हाती घेतलेल्या कामालाही पुढे पाहिजे तशी गती आली नाही.
आतातरी सर्वांनी या प्रश्नावर खडबडून जागे होण्याची गरज आहे. निसर्गाचे बिघडलेले चक्र लक्षात घेऊन आणि ते तसेच मान्य करून यावर उपाय योजावे लागतील. या समस्येला उत्तरे नाहीत, असे नाही. अण्णा हजारे, पोपटराव पवार, राजेंद्रसिंग, सुरेश खानापूरकर यांच्या सारख्यांनी आपल्या कामांद्वारे या उत्तरांचे दिग्दर्शन केलेले आहे.
कोणत्याही परिस्थितीत पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ द्यायचा नाही, हे प्रथम ठरविले पाहिजे. त्यासाठी लोकप्रबोधनाबरोबरच कडक उपाययोजनाही करणे आवश्यक आहे. उसाच्या पिकासाठी होणाऱ्या पाण्याच्या भरमसाट वापरावर आवश्यक वाटल्यास कायद्याने प्रतिबंध घालावा. आणि अशा कायद्याची कडकपणे अंमलबजावणी करण्यात यावी. या बाबत कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांना प्रोत्साहन देणेही शक्य आहे. तसेच उसासारख्या पिकांना ठीबकसिंचन बंधनकारक करण्याच्या शक्यतेचाही विचार व्हायला हरकत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे वर्षभरात केंव्हाही पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब साठविण्याची गरज आहे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. मग या साठविलेल्या पाण्याचा आपल्याला वर्षभर वापर करणे शक्य होईल.
या प्रश्नावर या विषयातील तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था, कार्यकर्ते यांनी भरपूर काम केलेले आहे. ते आता सर्वांना माहित झालेले आहे. परंतु हे एकट्या-दुकट्याचे काम नाही. त्यासाठी आता शासनाने या बाबत खऱ्या अर्थाने पुढाकार घेण्याची गरज आहे. सरकारद्वारे राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार सारख्या योजनांची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करून त्यांचा खरोखरच फायदा होत आहे काय, याचा नियमितपणे आढावा घेण्याची गरज आहे. खरे तर सरकारच्या सर्वच योजनांच्या आढाव्याला संस्थात्मक रूप द्यायला हवे. कारण खरा दोष योजनांमध्ये नसून त्यांच्या अंमलबजावणीत आहे, हे आता सर्वांना कळत आहे.
या बरोबरच मोठ-मोठ्या प्रकल्पापेक्षा छोट्या छोट्या प्रकल्पांवर अधिक लक्ष्य केंद्रित केले पाहिजे. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाचीही काळजी घेता येणे शक्य आहे. नदी जोड प्रकल्प  पर्यावरणावर किती गंभीर परिणाम होतील, याची आपण कल्पनाही करू शकत नाही.
मीडियालाही या विषयी खूप काही करता येईल. या क्षेत्रात प्रामाणिकपणे केल्या जाणाऱ्या कामांना विशेष आणि सातत्यपूर्ण प्रसिद्धी देता येणे शक्य आहे. या क्षेत्रातील प्रदर्शनीय कामापेक्षा चिरंतन बदल घडवून आणणाऱ्या कामांना नियमितपणे प्रसिद्धी दिली पाहिजे.
आपली शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. कृषी उत्पनाची शेकडेवारी एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या अगदीच कमी (म्हणजे १३.९ एवढीच) आहे, असे म्हणून चालणार  नाही. ही शेकडेवारी कमी असली तरी शेतीवर अवलंबून असणाऱ्या जनसंखेची शेकडेवारी(६५% पेक्षाही जास्त) अधिक महत्त्वाची आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.


Tuesday 11 August 2015

मुक्त अर्थव्यवस्थेची सार्थकता?

बाजारनियंत्रित अर्थव्यवस्था हा सध्या परवलीचा विषय  झालेला आहे. या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत प्रत्येक व्यक्ती ही कोणतीही आर्थिक क्रिया करायला स्वतंत्र असते. अशा क्रियांवर सरकारचे कमीतकमी ते नाहीच्या बरोबर नियंत्रण असणे अभिप्रेत आहे. परंतु अशा प्रकारच्या स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यास सर्वचजण सक्षम आहेत काय याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या जनगणनेच्या आकड्यांवरून आढळणारे ग्रामीण जीवनातील भीषण वास्तव, अजूनही ७०% लोक आर्थिक क्रिया करण्यासाठी सक्षम नाहीत, ही वस्तुस्थिती स्पष्ट करते. अशा परिस्थितीत मुक्त अर्थव्यवस्था देत असलेल्या आर्थिक स्वातंत्र्याला काय अर्थ राहतो, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. यावरूनच आपण अजूनही मुक्त अर्थव्यवस्था राबविण्यास पूर्णपणे स्वतंत्र नाहीत, असे दिसून येते. एका लंगड्या व्यक्तीला दुसऱ्या धडधाकट व्यक्तीबरोबर धावायला लावून काहीही हाती लागणार नाही.
आपल्या आर्थिक धोरणांचे केंद्र ग्रामीण जीवनाकडे सरकले पाहिजे, हे जनगणनेचे आकडे अधोरेखित करतात. गावातील लोकांच्या विकासातूनच देशाच्या विकासाला सार्थकता प्राप्त होईल, असे वाटते. शेवटी देश म्हणजे देशातील माणसेच होत.

Thursday 6 August 2015

संतांचे कार्य-

संतांच्या कामगिरीविषयी आतापर्यंत खूप लिहिले गेले आहे. आजही त्याविषयी चर्चा झडतच आहेत. यावरून संतप्रभाव चांगल्या प्रकारे प्रत्ययास येतो,असे वाटते.
कोणताही पूर्वग्रह न ठेवता संतांच्या कामगिरीविषयी पुढीलप्रमाणे सांगता येईल, असे मला वाटते. संतांचे मुख्य लक्ष्य हे पारलौकिक हित हेच होते. आणि याच लक्ष्याचा  त्यांनी समाजात प्रचार केला.ऐहिक सुख हे त्यांचे मुख्य लक्ष्य कधीच नव्हते. ‘अवघाची  संसार सुखाचा करीन’ अशी काही वचणे पुढे करून विचारवंतांनी वाचकांची दिशाभूल करू नये. संसार, स्त्री, ऐहिक सुखोपभोग या बाबतीत संतांनी टोकाचे नकारात्मक विचार व्यक्त केले आहेत. आणि तेही अनेकवेळा. त्यामुळे ‘संसार हा असार आहे’ हेच संतविचाराचे सार आहे, हे मान्य करण्यात अडचण येऊ नये.
वरीलप्रमाणे विचार करताना संतांनी बऱ्याच प्रमाणात परंपरेच्या विरुद्ध विचार आणि कृती केल्या.आध्यात्मिक पातळीवर का होईना समता,बंधुता,भूतदया, औदार्य अशा तत्त्वांचा पुरस्कार केला. त्याचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष व्यावहारिक जीवनावरही प्रभाव पडला असणारच. लोक आध्यात्मिक मार्गाद्वारे जागृत झाले. त्यामुळेच या संत मंडळीत अठरापगड जातींचा समावेश होऊ शकला. जनसामान्यांत अशी चेतना निर्माण करणे ही त्या काळाची गरजच होती. आणि संतांनी आपल्या कार्याद्वारे ती  पूर्ण केली.
जरी विठ्ठलप्राप्ती हे संतांचे मुख्य गंतव्य असले तरी त्याकडे जाणारी संतांची वाट ही समता, भूतदया, करुणा,परोपकार,औदार्य या मैदानातूनच जात होती. या मार्गाने  विठ्ठलप्रप्ती जरी झाली नाही तरी त्या वाटेने जाताना समाजाचे एकंदर हितच झाले, हे आपण मान्य करायला हरकत नाही.
ऐहिक सुखाचे आपण फार कौतुक करीत असलो तरी या ऐहिक सुखाच्या अभिलाषेने माणूस आपले माणूसपण विसरत चालला आहे. आपल्या या सुखासाठी तो वाट्टेल ते करायला तयार आहे. त्यामुळे समाजात अशांती, अविश्वास, संघर्ष, मानसिक तणाव निर्माण होत आहेत. तसेच निसर्गाचे शोषण व पर्यावरणाची हानी झाल्याशिवाय आपल्याला तथाकथित सुख देणारा विकासही  होऊ शकत नाही.
मानवजातीला या संकटातून वाचविण्यासाठी आपल्या गरजा नियंत्रित करणे, नैसर्गिक साधनसंपत्तीचा संयमित उपयोग करणे, आपापसातील विश्वास व प्रेम वाढविणे या बाबींची गरज आहे. या साठी संत विचार आणि कार्य प्रेरक ठरतील. या अर्थाने संतांची प्रासंगिकता आपण लक्षात घेतली पाहिजे. संतांच्या विचार व कार्यावर अपेक्षांचे  अवाजवी ओझे टाकणे आणि आधुनिक ओझे त्यांना पेलता येणार नाहीत, अशी टीका करण्याची आपणास काहीही आवश्यकता नाही.


Friday 17 July 2015

सरकारी नोकरभरती प्रतिबंध आणि प्रशासन

सरकारच्या नोकरभरतीवर प्रतिबंध घालणाऱ्या निर्णयाविषयी सर्वत्र चर्चा चालू झालेली आहे. आणि ती स्वाभाविकही आहे. सामान्य नागरिक म्हणून मीही या विषयी काही विचार मांडू इच्छितो.
सरकारला कल्याणकारी तसेच विकासाच्या योजना राबवायच्या असतात. लोकांना वेळेत आणि चांगल्या सेवाही द्यायच्या असतात. त्यासाठी सरकार विविध योजना आणि कायदे बनविते. सेवाहमी कायदा हा त्याचेच एक उदाहरण आहे.  या विकास योजना राबविण्यासाठी आणि चांगल्या सेवा कार्यक्षमपणे पुरविण्यासाठी सरकारकडे प्रशासनव्यवस्था असते. परंतु ही व्यवस्था चालविण्यासाठी सरकारकडे पुरेसे व कार्यक्षम असे मनुष्यबळ असणे आवश्यक असते. सद्यस्थिती बघता या व्यवस्थेत पुरेसे मनुष्यबळ कार्यरत आहे, असे दिसत नाही. बऱ्याच सरकारी खात्यात तर ५०% च्या जवळपास अधिकारी-कर्मचारी यांची पदे रिक्त असल्याचे दिसून येते. आणि त्यामुळे नागरिकांना त्यांची कामे वेळेवर होण्यात अडचणी निर्माण होत असल्याचा अनुभव येतो. अशा परिस्थितीत सरकार विविध कल्याणकारी व विकास योजना यशस्वीपणे राबवू शकणार नाही. तसेच नागरिकांना अभिप्रेत असलेल्या सेवाही चांगल्याप्रकारे पुरवू शकणार नाही.
लोकाभिमुख प्रशासन ही लोकशाहीची पूर्वावश्यकता आहे. कोणत्याही सरकारच्या कामाचे अंतिम परिणाम हे प्रशासनाच्या कर्तबगारीवरच अवलंबून असतात. तरीही एवढ्या महत्वाच्या मुद्द्यावर कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यात लोकाभिमुख प्रशासनाची हमी दिलेली नसते. कोणताही पक्ष किंवा मीडियाही या विषयावर आवश्यक तेवढा आवाज  उठवीत नाही, असे दिसते.
थोडक्यात सरकारला दोन पातळ्यांवर काम करावे लागेल. उद्दिष्टप्राप्तीसाठी प्रशासनाला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देणे , हे पहिले काम. त्यासाठी सरकारला रिकामी पदे भरावीच लागतील. या बाबतीत विदर्भ-मराठवाडा या भागाचा अनुशेष भरून काढण्यासाठी (विभागीय संवर्गविषयक शासन निर्णय) इतर विभागांचा अनुशेष निर्माण करण्याने प्रशासनाचे आणि पर्यायाने शासनाचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही.
दुसरी पातळी म्हणजे प्रशासनात लोकाभिमुखता आणण्यासाठी विविध उपाययोजना करणे. सरकारला हे करणे निश्चितपणे शक्य आहे. कणखर व नोकरशाहीचे वर्म जाणणाऱ्या सरकारच्या योग्य अपेक्षांना नोकरशाहीला सकारात्मक प्रतिसाद द्यावाच लागेल. पण त्यासाठी सरकारचे उद्दिष्ट आणि इच्छाशक्ती तशीच पाहिजे.

या बाबतीत आर्थिक काटकसरीचा मुद्दा उपस्थित केल्या जातो. परंतु सरकारला ज्या कामांसाठी पैसा हवा आहे, ती कामे करायला माणसे तर उपलब्ध असायलाच हवीत. त्याशिवाय सरकार पैशाचा उपयोग  कार्यक्षमतेने व परिणामकारकतेने करू शकणार नाही.