Thursday 3 October 2013

वारकरी संप्रदायाला ब्राह्मणांनी हायजॅक केले. वारकरी संप्रदायाचे आजचे बहुतांश नेते ब्राह्मण आहेत, हा या हायजॅकिंगचाच परिणाम आहे . ब्राह्मण महानुभाव संप्रदायाला  हायजॅक करु शकले नाहीत.मग त्यांनी या पंथाचा द्वेष व बदनामी करण्यास सुरुवात केली. हा द्वेष तरी किती करावा? तर या द्वेषाचा व बदनामीचा एक इतिहास बनला.
मला वाटते, चक्रधरस्वामींनी मनुस्मृतीप्रणीत ‘ब्राह्मणश्रेष्ठत्व’ या तत्त्वाचा नि:संदिग्धरित्या विरोध केला. तसेच त्यांनी वेदाची अपूर्णता घोषित करून देवताजानित कर्मकांडांची निरर्थकता स्पष्ट केल्यामुळे ब्राह्मणी अर्थव्यवस्थेवर संकट आणून ठेवले.
ब्राह्मणी परंपरा काहीही सहन करू शकेल. तुम्ही कोणतेही तत्त्वज्ञान मांडा, कोणत्याही देवतांची आराधना करा. त्याविषयी या परंपरेला कोणताही आक्षेप नसतो. तथापि हे सर्व ब्राह्मणश्रेष्ठत्व, वेदप्रामाण्य, वर्णाश्रम धर्म, देवताजनित कर्मकांड या बाबी मान्य करून, त्यांचे आचरण करून, किमान ही चौकट मान्य करून त्या चौकटीत करा, असा या परंपरेचा आग्रह असतो.
मनुस्मृतिप्रणीत धर्मशास्त्राच्या या गाभ्यालाच स्वामींनी स्पष्टपणे विरोध केला. असा विरोध करताना त्यांनी कोणत्याही तडजोडी केल्या नाहीत किंवा तथाकथित समन्वयाचीही भूमिका घेतली नाही. त्यासाठी त्यांनी तत्कालीन धर्मसत्तेच्या प्रचंड विरोधाला तोंड दिले.
संतांनीही देवताभक्ती आणि देवताजानित कर्मकांड यांचा खणखणीत विरोध केला. परंतु संत या बाबतीत फार आग्रही राहू शकले नाहीत. संतांच्या समन्वयवादी दृष्टिकोनाची ही निष्पत्ती होती.
त्यामुळेच ब्राह्मण वारकरी पंथाला सहजपणे हायजॅक करू शकले व त्यांनी या पंथाला सनातनी धर्माचा एक भाग करून टाकले.
महानुभाव संप्रदायाला  हायजॅक करता आले नाही. मग परंपरेने या पंथाची पद्धतशीरपणे बदनामी करून त्याचे यशस्वीपणे खच्चीकरण केले. तडजोड करा, नाही तर उद्ध्वस्त व्हा, हे परंपरेचे धोरण आहे.
प्रसिद्ध विचारवंत प्रभाकर वैद्य यांचा ‘संतांनीसुद्धा वाळीत टाकलेला संतश्रेष्ठ चक्रधर’ हा ग्रंथ या विषयावर चांगलाच प्रकाश टाकतो.
चक्रधर स्वामींचे  विचार –
रज काळात स्त्रियांचा विटाळ मानणे अत्यंत हास्यास्पद ठरविले आणि आपल्या अनुयायांना तसे करू दिले नाही.
गाय पवित्र आणि कुत्रे अपवित्र अशा कल्पना हास्यास्पद ठरविल्या .
मातंग आणि ब्राह्मण हे दोघेही  मनुष्य देहधारीच असल्याने त्यांच्यांमधील श्रेष्ठ कनिष्ठत्व ही कल्पना निरर्थक ठरविली. आणि हे प्रत्यक्षात आणले.
स्त्री-पुरुष यांच्यातील चैतन्य एकाच प्रकारचे असल्याने त्यांच्यात भेद मानणे निरर्थक आहे, असे मानले.
कर्मकांड , व्रतवैकल्ये यांचा विरोध केला. देवताभक्ती अनुपयोगी असल्याचे सांगितले.
शेवटी—
देव धातूचा नव्हे
देव पाषाणाचा नव्हे
देव काष्ठाचा नव्हे
देव मातीचा नव्हे
देवा पटीचा(वस्त्राचा ) नव्हे
देव चित्रीचा नव्हे
      धातूचा तो झिजेल
      पाषाणाचा तो फुटेल
      काष्ठाचा तो मोडेल
      मातीचा तो  विरेल
      पटीचा तो फाटेल
      चित्रीचा तो पुसेल
            देव तो अच्छेदू अभेदू की.

                  इति चक्रधर .

No comments:

Post a Comment