Wednesday 20 November 2013

साचलेला किंवा साचू पाहणारा मानवी जीवनाचा प्रवाह प्रवाहित करणे, मानवी जीवनाची गुणवत्ता  लक्षनिय प्रमाणात वाढविणे तसेच तळातील माणसाला तिथून काढून मुख्य प्रवाहात आणणे ही आणि अशा स्वरुपाची उद्दिष्टे साध्य  करण्यात अत्युत्कृष्ट योगदान देणारी व्यक्ती ''भारतरत्न'' या पारितोषिकास पात्र ठरावी, असे वाटते .

मानवी जीवनाचे शारीरिक, मानसिक,वैचारिक,बौद्धिक, राजकीय,आर्थिक,धार्मिक, सांस्कृतिक,सामाजिक असे अनेक पैलू आहेत. मानवी जीवनाची  प्रगती म्हणूनच अशा अनेक पैलूवर अवलंबून असणे स्वाभाविक आहे.

क्रीडा , संगीत ही मानवी संस्कृतीची एकेक अंगे आहेत. केवळ कोणत्याही एका अंगाच्या प्रगतीमुळे मानवी जीवनाची सर्वंकष प्रगती होणे शक्य नाही.  अशा एकेक क्षेत्रात अत्युत्कृष्ट योगदान देणाऱ्यास त्या त्या क्षेत्रातील सर्वाच्च पारितोषिक बहाल करणे समजू शकते. परंतु "भारत रत्न '' हे पारितोषिक मात्र  मानवी जीवनाच्या सर्वंकष प्रगतीला प्रेरक ठरणाऱ्या महनीय व्यक्तीसाठी राखून ठेवणे आवश्यक आहे . अन्यथा या पारितोषिकाचे लवकरच अवमुल्यन झाल्याशिवाय राहणार नाही.

निवडणुकीवर डोळा ठेऊन लोकमताच्या लाटेवर आरूढ होणाऱ्या  नेतृत्वाकडून होणाऱ्या  या प्रकारच्या निर्णयातून देशाला काय संदेश मिळत आहे, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. लोकमत घडविणे हे नेतृत्वाचे काम आहे,लोकमताच्या लाटेवर  आरूढ होऊन खुर्च्या टिकविणे नव्हे.

या देशातील तरुण वर्ग हा स्वत:ची जबाबदारी ओळखू शकत नाही  किंवा आंधळेपणाने तो ती टाळत आहे.  कोणाला तरी देव मानून, त्याच्यामध्ये स्वत:चे प्रतिबिंब पाहणे आणि त्याच्या खांद्यावर आपले सगळे ओझे टाकून निवांत होणे, ही भारतीयांची प्रवृत्ती आहे. विभूतीपुजा  हा आपला स्थायीभाव आपल्या चिकित्सेला अवकाश देत नाही.

आपल्या श्रद्धा, आपली भक्ती, आपले प्रेम या बाबी  आपल्या  चिकित्सेतील फार मोठे अडथळे आहेत. या बाबी म्हणजे आपल्या दृष्टीपुढील झापडे असून त्यामुळे आपल्याला आपल्या पुढील मार्ग तसेच आपले हित आणि आपले भवितव्य दिसू शकत नाही.

आपला देश आज खरोखरच अंधारात चाचपडत आहे. आपली शोकान्तिका म्हणजे आपण अंधारात चाचपडतो आहोत, हेच आपल्याला कळत नाही आणि कळले तरी आपण ते मान्य करीत नाही . यालाच आपण आपला सकारात्मक दृष्टीकोन म्हणतो. 

No comments:

Post a Comment