Sunday 23 August 2015

मतभेद असण्याबद्दल कोणाचा मतभेद असण्याचे कारण नाही. कारण ‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’ हे सगळ्यांना मान्य असावे. पण जेंव्हा गटा-तटाचे राजकारण सुरु होते, तेंव्हा मात्र  ते सामाजिक आरोग्यावर अनिष्ट परिणाम करते. खरे तर गटा-तटाची भावना ही माणसाच्या ठिकाणी असलेल्या ethnocentrism  चा परिणाम असते. आपल्याकडील जातीय अहंकार आणि जातीय पूर्वग्रह या ethnocentrism चाच देशी अविष्कार आहे. म्हणूनच प्रत्येक गटाला आपलीच विचारसरणी व आदर्श खरे वाटतात. खरे तर ethnocentrism ला बैद्धिक-तार्किक आधार कमी व भावनिक आधारच  जास्त असतो. त्यामुळे या गटांचे मनोमिलन होण्याची  शक्यता अवघड बनते. म्हणूनच अशा राजकारणाला आपण निरुत्साहितच केले पाहिजे. परंतु आजकाल विशिष्ट गटाचा पाठींबा आणि त्यातूनच लोकप्रियता मिळविण्यासाठी अशा प्रकारच्या राजकारणाला प्रोत्साहित केले जाते. गटा-तटाच्या राजकारणाचा बिमोड करण्यासाठी पहिल्या प्रथम  जातीय अहंकार आणि जातीय पूर्वग्रह यांना दूर करून आपले वर्तन व विचार  ‘मनुष्य मात्र होवोनि असावे’ या चक्रधरोक्तीप्रमाणे ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपले तेच खरे याचा अट्टाहास सोडून देऊनच आपल्याला  कोणत्याही गोष्टीचा विचार करताना विरोधी विचाराच्या व्यक्तीच्या मानसिकतेशी समरस होणे शक्य होईल. त्यामुळे आपल्या मनातील द्वेष कमी होऊन आपण ज्ञान व प्रेम यासाठी अधिक पात्र व  मोकळे होणे शक्य होईल.

No comments:

Post a Comment