Wednesday 19 August 2015

बाबासाहेब पुरंदरे यांची शिवाजी महाराजांप्रती असलेली निष्ठा आणि प्रेम यावर संशय घेण्यात अर्थ नाही. या निष्ठेमुळेच त्यांनी शिवचरित्राला वाहून घेतलेले आहे. तथापि त्यांनी शिवचरित्र हे त्यांच्या चष्म्यातून पहिले आणि तसेच रंगविले. शिवाजी महाराजांचे एकंदर व्यक्तिमत्त्व, त्यांचा एकंदर दृष्टीकोन कदाचित बाबासाहेबांना गवसला नसावा. आपण ज्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक पर्यावरणात वाढलेलो असतो त्याचा परिणाम आपल्या एकंदर व्यक्तिमत्त्वात आणि वैचारिक दृष्टिकोनावर होतोच होतो. थोडक्यात आपले पर्यावरण आपल्याला एक वैचारिक चौकट किंवा चष्मा प्रदान करते. बाबासाहेबांनाही त्यांच्या पर्यावरणाने त्यांना एक चष्मा दिलेला आहे. हा चष्मा पुरोगाम्यांच्या चाष्म्यापेक्षा निश्चितच वेगळा आहे. बाबसाहेब खऱ्या अर्थाने इतिहासकार नसल्यामुळे त्यांना हा चष्मा थोडाही दूर करता आलेला नसावा. इतिहासकारांना तरी तो पूर्णपणे काढता येतो काय? शिवाजी महाराज हे हिंदू असले तरी आजच्या हिंदुत्वाचे  त्यांच्या हिंदुत्वाशी कोणतेही साधर्म्य नाही. बाबासाहेबांच्या ग्रंथांमधून मात्र आधुनिक हिंदुत्ववाद्यांना आपल्या हिंदुत्वाचा स्रोत सापडला असावा. पुरोगाम्यांना शिवाजी महाराज आधुनिक अर्थाने धर्मनिरपेक्ष वाटत असल्यामुळे त्यांना गोब्राह्मणप्रतिपालक शिवप्रतिमा आवडणे शक्यच नाही. थोडक्यात हा प्रतिमा संघर्ष आहे की काय, असे वाटते. एकदा संघर्ष सुरु झाला की मग दुसऱ्या बिनमहत्त्वाच्या गोष्टी दोन्ही बाजूंकडून समोर केल्या जातात. आणि वातावरण अधिकाधिक गढूळ होते.

काही झाले तरी बाबासाहेबांचा उद्देश शिवचरित्रावर शिंतोडे उडविण्याचा असण्याचे कारण नाही. परंतु दोन्ही बाजूंकडील लोकांचा  अहंकार आणि पूर्वग्रह त्यांना सत्याप्रत  येऊ देत नाही, हेच खरे.

No comments:

Post a Comment