Tuesday 2 February 2016

स्त्रियांचा मंदिरप्रवेश.

सध्या स्त्रियांच्या मंदिरप्रवेशासंबंधी सर्व वृत्तपत्रांमधून चर्चा सुरु झालेली आहे.  मला या चर्चेच्या निमित्ताने ‘ऋतुमतीचा विटाळ’ या कल्पनेला केल्या गेलेला एक  ऐतिहासिक विरोध आपल्या नजरेस आणून द्यावयाचा आहे.
भारतातील धार्मिक परंपरेने स्त्रियांच्या तथाकथित अपावित्र्याचा  मन:पूर्वक पुरस्कार केल्याचे आढळते. या कल्पनेला इतिहासात फारसा विरोध झाल्याचे दिसत नाही. याला एक सुस्पष्ट अपवाद आहे, चक्रधर स्वामींच्या नि:संदिध विरोधाचा. त्यांच्या जीवनातील या संदर्भात घडलेला एक प्रसंग अतिशय बोलका आहे. तो पुढीलप्रमाणे-
चक्रधरस्वामींच्या अंगठ्याला ऋतुमती असलेल्या उमाइसाचा स्पर्श होतो. उमाइसा स्वाभाविकपणे संकोचते. स्वामी तिची थट्टा करतात. ते म्हणतात- “या अंगठ्याला विटाळ झाला. आता त्याला(पवित्र करण्यासाठी) माल्लीनाथाला-केदारनाथाला न्यावे लागेल. या थट्टेनंतर चक्रधरस्वामी आपल्या अनुयायांना जे काही समजून सांगतात ते बौद्धिक-वैज्ञानिक युक्तिवादाचा उत्तम नमुना आहे. ते म्हणतात- “ अशी नव द्वारे आहेत. मल, मुत्र, शेंबूड, डोळ्यांचा मळ, तसाच हा एक धातू स्रवतो व ठरावीक कालावधीनंतर निवर्ततो. त्याचा विटाळ धरू नये.” उमाइसाला हे मान्य होते. ती म्हणते- “ आजपासून असा विटाळ धरणार नाही.”
वरील प्रसंगातून श्रीचक्रधरांचा पुरोगामी दृष्टीकोन प्रत्ययाला येतो. त्याचप्रमाणे भारतीय इतिहासात इसवीसनाच्या तेराव्या शतकातच विटाळाच्या बुरसटलेल्या कल्पनेला बौद्धिक विरोध केल्या गेल्याचेही स्पष्ट होते. सुशिक्षित म्हटल्या जाणाऱ्या बऱ्याचशा स्त्रिया आजही विटाळ या कल्पनेला आपल्या मनातून काढू शकत नाहीत, हे पाहिल्यावर चक्रधरस्वामींच्या वरील विचारांचे कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही.

No comments:

Post a Comment