देशात सहिष्णुता आहे किंवा नाही यावर फार मोठे
वादंग आपण अनुभवीत आहोत. परंतु देशातील सर्वसामान्य अल्पसंख्य आणि शोषित यांना
याविषयी काय वाटते, याचा विचार फारसा
केल्या जात नाही. अल्पसंख्य आणि शोषित यांच्या संरक्षणाचे व हिताचे विचार
मांडणाऱ्यांना काय अनुभव येतात, याचीही दखल घेतल्या जात नाही. धर्मनिरपेक्षता,
व्यक्तिस्वातंत्र्य, वैज्ञानिक दृष्टीकोन, समता, विज्ञानसमर्थित इतिहासवाद यांचे
समर्थक आणि पुरस्कर्ते आपले विचार बिनधास्तपणे मांडू शकतात काय? त्यांच्या मतांचा
प्रस्थापित लोक आदर करतात काय? याही प्रश्नांची उत्तरे आपणास शोधावी लागतील.
एखादे वादग्रस्त मत अल्प्संख्याकाने केले किंवा बहुसंख्याकाने
केले यावर आपल्या प्रतिक्रियांचे प्रमाण व स्वरूप अवलंबून असते. आज एकंदर
परिस्थितीविषयी अल्पसंख्यांकांना काय वाटत असते, हे आपण जाणून घेऊ इच्छित नाहीत.
आपल्याला त्याची गरजही वाटत नाही. पुरोगाम्यंना उत्तरे देण्याऐवजी त्यांना शिव्या
देऊन पुरोगामी हीच शिवी बनविण्याचा आपला उद्योग काय सांगतो? परंपरासमर्थकांच्या अवैज्ञानिक दाव्यांना
वैज्ञानिक उत्तरे देण्याचीही लोकांना का भीती वाटते?
देशात सहिष्णुता आहे किंवा नाही याचे उत्तर
शोधण्यासाठी ज्यांना या असहिष्णुतेला तोंड द्यावे लागते त्यांनाच विचारावे लागेल.
या वादात भाग घेणाऱ्यांना आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी या घटकाचेच
अनुमोदन घ्यावे लागेल. अन्यथा या चर्चेला काही अर्थ नाही. आणि या घटकाला असे का वाटते याचाही आपण विचार करणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment