Sunday 7 February 2016

समाजसेवेचे ढोंग.

राजकारणात विशिष्ट स्थान असणाऱ्या व्यक्ती आणि नोकरशाहीतील प्रस्थापित अधिकारीवर्ग बऱ्याचवेळा समाजसेवेत भाग घेत असल्याचे दिसते. वृत्तपत्रातून या तथाकथित समाजसेवेच्या चर्चाही होतात. ही मंडळी आवर्जून सार्वजनिक कार्यक्रमांतून स्वत:ला प्रकट करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. यांच्या एकंदर अविर्भावातून हे खरोखर समाजसेवा करतात की तसे केल्याचे नाटक करतात याबाबत सर्वसामान्यांचा गोंधळ उडतो. बहुतेक ही मंडळी नाटकच करीत असणार. त्याचे कारण हे लोक त्यांच्या भूमिका पार पाडताना जो गोंधळ घालतात यात सापडते. आपल्या भूमिका पार पाडताना केले जाणारे लफडे, भ्रष्टाचार, कामचुकारपणा, नकारात्मक दृष्टीकोन, ढोंगीपणा, अपारदर्शकता यातून यांचे खरे स्वरूप उघड होते. यांना त्याची जाणीवही असते. हीच जाणीव त्यांना टोचत राहते. या जाणिवेची बोच कमी करण्याच्या दृष्टीने यांना मग यांना  समाजसेवेचे नाटक करावे लागते. सुट्टीच्या दिवशी आदिवासी पाड्यात जाऊन जुने कपडे, भांडी वाटणे, एखाद्या आपत्कालीन जागी जाऊन सेल्फी काढणे व तो whats app किंवा face book वरून मिरविणे, सार्वजनिक कार्यक्रमातून नितीमत्ता  शिकविणारी भाषणे ठोकणे, अशा भाषणांना  प्रसिद्धी मिळवून देणे, भानाप्रधान व आकर्षक असे विचार समाजमाध्यमातून share करणे, त्यासाठी एकमेकांना आवर्जून दाद देणे, त्याचीही प्रसिद्धी करायला न चुकणे अशी अनेक नाटके ही लोक करतात. असे करताना यांना मुळीच संकोच वाटत नाही. खरे तर मला लाजा वाटत नाहीत, असे म्हणायचे आहे. ही समाजसेवेची नाटके झाली की मग ही मंडळी आपल्या नियतकालिक ओल्या पार्ट्या साजऱ्या करायला मोकळी होतात.
समाजसेवेची ही  सगळी नाटके  करण्याऐवजी यांनी आपल्या वाट्याला आलेल्या भूमिका जर प्रामाणिकपणे पार पाडल्या तर समाजावर यांचे उपकारच होतील. हीच खरी समाजसेवा नव्हे काय? पण हे लोक असे करणार नाहीत. कारण असे करण्यात यांची पैशाची व प्रसिद्धीची हाव शमणार नाही. समाजाचे हे दुर्दैव आहे. आपला मीडियाही अजूनही बालिश तसेच भ्रष्टही आहे. अन्यथा मिडीयाने यांचे अंतरंग उघड केले असते आणि खरे चारित्र्यवान लोक प्रसिद्धीला आणले असते. पण असे होणार नाही. कारण खऱ्या चारित्र्यवान लोकांना प्रसिद्धीचे तंत्र माहित नसते आणि खरे तर त्यांना या प्रसिद्धीची गरजही वाटत नसते. त्याचप्रमाणे या चारित्र्यवान लोकांकडे प्रसिद्धी विकत घेण्यासाठी पैसे कुठे असतात?

आता तरी लोकांनीच जागृत व्हावे. पेपरवाल्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. आणि  या ढोंगी आणि दांभिक लोकांचे बुरखे टराटर फाडून टाकून यांचे सत्यस्वरूप उघड केले पाहिजे.  बस झाली नाटके. 

No comments:

Post a Comment