Sunday 21 February 2016

काटकसर। पाणी।GDP । प्रेरणा ।

काही तत्त्वे, साध्या गोष्टी म्हणता येतील, एवढी साधी असतात. सगळ्यांनाच ती माहित असतात. परंतु त्यांचे निर्णायक मत्त्व आपण समजत नाही. उदाहरणार्थ काटकसरीचे तत्त्व. हे तत्त्व आपल्या जीवनात अवलंबविले तर आपण आपल्या उपभोगात काटकसर करूत. त्यामुळे आपल्या उधळपट्टीला  लगाम बसेल. पर्यायाने पाणी, खनिजे, खनिज तेले यासारख्या  नैसर्गिक संसाधनात बचत होईल. थोडक्यात पर्यावरण शोषण व प्रदूषण या ज्वलंत समस्येला आळा बसण्यास मदत होईल. पण आपण काटकसरीच्या तत्त्वाला एवढे महत्त्व देतो काय? प्राथमिक शिक्षणापासून मुलांवर या तत्त्वाचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतो काय? दुर्दैवाने या प्रश्नांची उत्तरे “नाही” अशीच द्यावी लागरील.

असाच विचार पाण्याविषयी करता येईल. आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी सातत्याने चर्चा-अभ्यास करतो. या अभ्यासकांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे मूळ अज्ञान, कर्ज, बाजारपेठ व वितरणाचा प्रश्न, शेतमाल साठवणुकीचा प्रश्न, अल्प उत्पादकतेचा प्रश्न, शेतमालाला उत्पादनखर्च आधारित भाव न मिळणे या सारख्या प्रश्नांमध्ये दिसते. परंतु शेतकऱ्यांचा मूळ प्रश्न सिंचनाचा आहे, या वस्तुस्थितीवर आपण का भर देत नाही?  इतर अनेकविध प्रश्नांची चर्चा करून आपण मूळ प्रश्नांवरील लक्ष विचलित तर करीत नाही?  इतर प्रश्न आहेतच. परंतु सिंचनाचा मूळ प्रश्न सोडविल्याशिवाय इतर प्रश्नांना हात घालून उपयोग काय? अगदी ठिबक सिंचनाचा वापर करण्यासाठीही थेंबभर तरी पाणी पाहिजेच ना!  हजारो कोटी रुपये सिंचनावर खर्च करून आपण सिंचन क्षेत्रात किती भर टाकली हा लाज आणणारा प्रश्न आपल्याला का पडत नाही. आताही पाण्याचा अतिवापर टाळण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो? वाया जाणाऱ्या पाण्याला अटकाव करण्यासाठी आपल्याकडे काय उपाययोजना आहेत? थेंबभरही पाणी वाया जाता कामा नये ही भावना लोकांच्या मनांवर बिम्बाविण्यासाठी आपण सातत्याने प्रबोधन करण्याची गरज आहे. काटकसरीचा वापर करून थेंबभर पाणीही वाया जाऊ न देणे, पावसाद्वारे  उपलब्ध होणारे थेंब थेंब पाणी साठविणे, अल्प पर्जन्यावर येणाऱ्या पिकांचे संशोधन व प्रसार या त्रिसूत्रीचा वापर मानवी भविष्याच्या संरक्षणासाठी अत्यावश्यक आहे. पाणीच नसेल तर कोणती अत्याधुनिक तंत्रे वापणार?  काय बाजारपेठेत आणणार? कशाला उत्पादनखर्चाधारित भाव देणार? याचा आपण का विचार करीत नाही?
“कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वत:पासून केली पाहिजे”, हे एक अति लोकप्रियता लाभलेले विधान! पण अशी सुरुवात कोणीच का करीत नाही, याचा विचार मात्र आपण  करीत नाही. अशी सुरुवात करण्यासाठी लोकांना एक प्रेरणा लागत असते. अशी प्रेरणा आर्थिक सुधारणाप्रेरित बाजारपेठेत विकत मिळत नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यासाठी अशा प्रेरणा आपल्याला जित्याजागत्या समाजातून मिळाल्या पाहिजेत. कुठे आहेत या प्रेरणा? कोणी शोधून देता का या प्रेरणा?

आज आपण GDP च्या वृद्धीदराला अत्याधिक महत्त्व देत असतो. परंतु या GDP वृद्धीचे प्रतिबिंब आपणास ६५ % ग्रामीण जीवनांमधून दिसून येते काय? जर या तथाकथित GDP चा सबंध या ६५ % ग्रामीण जीवनांशी दाखविता येत नसेल तर आपल्या आर्थिक धोरणांचा पुनर्विचार करायला नको काय? शेवटी देश म्हणजे देशातील बहुसंख्य माणसेच ना! देशाचे उत्पन्न म्हणजे या देशातील या माणसांचेच उत्पन्न नव्हे काय? आणि हे उत्पन त्यांच्या जीवनमानातूनच प्रतिबिंबित होईल.

No comments:

Post a Comment