Thursday 11 February 2016

शिक्षण व्यवस्थेची दुरावस्था।

दोन वर्षांचा डी. एड. चा थातूरमातूर अभ्यासक्रम पूर्ण करून येणाऱ्या अपरिपक्व पोरांच्या हातात आपण देशाचे भावी भविष्य सोपवीत असतो. हे किती भयंकर आहे हे आपल्या लक्षात का येत नसावे? या तथाकथित शिक्षकांची Maturity काय, त्यांचा अनुभव काय, त्यांचे ज्ञान ते काय, त्यांचा  बालमानसशास्त्राचा अभ्यास तो काय यांचा आपण मुळीसुद्धा विचार करीत नाही, याचे खरोखरच आश्चर्य वाटते. ही लहान मुले शाळेत शिकताना त्यांच्या जडणघडणीच्या अवस्थेत असतात. त्यांच्या सभोवती घडणाऱ्या बऱ्या-वाईट घटनांचा त्यांच्यावर तात्काळ परिणाम होत असतो. त्या परिणामांच्या स्वरूपावर व प्रमाणावर मुलांच्या मनाचे वळण अवलंबून असते. सध्याच्या शिक्षकांना या मुलांशी मानसशास्त्रीयदृष्ट्या आंतरक्रिया साधता येणे शक्य होइल काय?  याचा गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यसाठी या शिक्षकांना बालमानासशास्त्राचे मुलभूत ज्ञानही  आवश्यक नाही काय?

आपल्याला  भारताची भावी पिढी घडवायची असेल तर आपण किती गंभीर असले पाहिजे! या विद्यार्थ्यांना  इतर अनेक  सुविधा देण्याबरोबरच त्यांना सुजाण, अनुभवी,ज्ञानी व बालमानसशास्त्रात प्रभावी अशा शिक्षकांकडे सोपविले पाहिजे. असे शिक्षक तयार करण्यासाठी  शिक्षकांच्या अभ्यासक्रमात अमुलाग्र बदल करण्याची गरज आहे. या अभ्यासक्रमात प्रामुख्याने बालमानसशास्त्राचा समावेश केला पाहिजे. खरे तर बालमानसशास्त्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्यांना येथे प्राधान्य दिले पाहिजे. मुलांना जसे आपल्या जीवनात डॉक्टर, इंजिनिअर, अधिकारी व्हावेसे  वाटते तसेच त्यांना शिक्षक व्हावेशे  वाटावे. त्यासाठी शिक्षकांचे करिअर उज्ज्वल वाटेल असे काही तरी करावे लागेल. त्यासाठी कितीही बदल आणि कितीही खर्च करावा लागला तरी तो कमीच समजाला  पाहिजे. देशाच्या उज्ज्वल भाविष्यापुढे खर्चाची मातब्बरी ती काय? तो खर्च नव्हे, गुंतवणूकच आहे.

No comments:

Post a Comment