Thursday 30 June 2016

समाज आणि स्वातंत्र्य

समाज म्हणजे सामाजिक संबंधांचे जाळे अशी समाज या संकल्पनेची व्याख्या केली जाते. समाजच काय अखिल विश्वच संबंधांचे विराट जाळे  आहे. या जगातील प्रत्येक गोष्ट, मग ती  सजीव असो की निर्जिव, परस्परांशी असलेल्या संबंधांनी जखडलेल्या असतात. त्यामुळे कोणा एकातही झालेला बदल दुसऱ्या अनेक गोष्टींतील बदलांना कारणीभूत होतो. थोडक्यात, कोणतेही कार्य स्वेच्छेनुसार करण्यास जरी आपण स्वतंत्र वाटत असलो तरी हे स्वातंत्र्य मर्यादित स्वरूपाचे आहे. या मर्यादा आपल्यात असणाऱ्या विविध प्रकारच्या संबंधांमुळे  आलेल्या असतात. या संबंधांच्या निमित्ताने हक्क, कर्तव्ये,कायदा, नियम,रूढी, नीती इत्यादी विनियमने तयार होतात. ही सर्व नियमने आपल्याला सातत्याने  नियंत्रित करीत असतात. त्यामुळे आपण स्वतंत्र आहोत हे नि:संदिग्धरीत्या म्हणता येत नाही. जे काही स्वातंत्र्य  आपण अनुभवतो ते सैल असणाऱ्या बंधनरुपी दोरांसारखे आहे..
प्रत्येकजन वरील  विनियमांचा विचार न करता या स्वातंत्र्याचा अनियंत्रित वापर करू लगला तर अखिल विश्वाची व्यवस्था नष्ट  होण्यास वेळ लागणार नाही. आजकाल आपण निसर्गाशी जुळवून घेण्यापेक्षा त्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याचे मानवी जीवनावर झालेले गंभीर परिणामही आज  आपण भोगत आहोत. माझ्या प्रत्येक कृतीचा बारा-वाईट  परिणाम इतरांवर होत आहे आणि इतरांकडून होणाऱ्या प्रत्येक कृतीचा तसाच परिणाम माझ्यावरही  होत असतो, ही गोष्ट आपण क्षणभरही विसरता कामा नये.

स्वातंत्र्यासंबंधी  दुसरा एक विचार! प्रत्येक कार्याला कारण असते हा एक प्रसिद्ध नियम आहे. याचा अर्थ आपल्या प्रत्येक कृतीचे काहीतरी कारण असले पाहिजे. याच नियमानुसार त्या कारणालाही कोणते तरी कारण असायला हवे. अशी कार्य-कारणाची अनंत शृंखला असल्याची कल्पना आपल्याला  करता येते. थोडक्यात आपल्या प्रत्येक कृतीचे मूळ कारण हे आपल्या पलीकडचे असू शकते. हे कारण आपल्या प्रभावक्षेत्राबाहेरचे असल्याने त्याचे कर्तृत्व तसेच जबाबदारी आपल्यावर येऊ शकत नाही. उलट आपण जी कृती करतो ती आपण स्वत:हून न करता ती कोणत्यातरी बाह्य कारणामुळे आपल्याकडून होत असते असे म्हणावे लागते.. याचा अर्थ आपण कोणतीही कृती करण्यास स्वतंत्र नाहीत असाच होत नाही काय?


विचार करायला काय हरकत आहे?

No comments:

Post a Comment