Tuesday 21 June 2016

कर्मकांड करणे हे माणसाचे वैशिष्ट्यच असते. त्यातही भारतीयांचे तर हे विशेष वैशिष्ट्य आहे. म्हणूनच आपल्याकडे प्रत्यक्ष कामापेक्षा त्याचे साजरीकरणच अधिक जोरात सुरु असते. त्याचाच परिणाम म्हणजे केलेल्या किंवा न केलेल्या कामांची पैशांची उधळपट्टी करून केलेली अमाप जाहिरात. अशा जाहिराती आपण व्यक्तिगत व सार्वजनिक पातळ्यांवर सातत्याने करीत असतो. काम सुरु करण्याआधीच शपथविधीचा कार्यक्रम जोरदारपणे साजरा करणे, उठसुठ वेगवेगळे दिन (योगदिन, स्वच्छता दिन इत्यादी), जाहीर करून साजरे करणे, योजनांची अंमलबजावणी करण्यापेक्षा त्यांचे नामकरणविधी गाजविणे यासारखे प्रकार करण्यात आपला हात कोणी धरू शकत नाही.
कामाची जाहिरात प्रत्यक्ष कामेच करतात. खरोखर कामे केली तर त्यांची वेगळी जाहिरात करण्याची आवश्यकताच निर्माण होणार नाही. उलट या जाहिरातीवर उडविला जाणारा पैसा अधिक कामे करण्यात खर्च होऊ शकेल.

विकासदराच्या अतिरेकी प्रदर्शनाबाबतीतही असेच म्हणता येईल. विकासदर हा येथील सामान्य लोकांच्या जीवनमानातून दिसून आला पाहिजे. लोकांची आर्थिक स्थिती, रोजगार, आरोग्य इत्यादी बाबी विकासदर निश्चित करीत असतात. त्यासाठी त्याची वेगळी जाहिरात करण्याची काहीच आवश्यकता नाही. हा विकासदर लोकांच्या जीवनमानात दिसला नाही तर उलट अशा जाहिराती लोकांची क्रूर थट्टा ठरू शकतात. 

No comments:

Post a Comment