Friday 24 June 2016

दिनांक २२-०६-२०१६ च्या लोकसत्तामधील “जातिव्यवस्था आली कोठून?” हा शेषराव मोरे यांचा लेख वाचला. बेटीबंदी हे जातीव्यवस्थेचे व्यवच्छेदक लक्षण असले तरी तिच्यामधील श्रेष्ठ-कनिष्ठत्व, स्पर्शास्पर्शत्व ही वैशिष्ट्ये अधिक अमानवी आणि घातक आहेत. जातिव्यवस्थेचा उगम जर आदिम समाजाच्या टोळीव्यवस्थेत शोधायचा झाल्यास तिच्यातील अमानवी श्रेष्ठ-कनिष्ठत्व, स्पर्शास्पर्शत्व यांचा उगम कोठे शोधायचा, हाही प्रश्न सोडविण्याची गरज आहे. जातीव्यवस्था ही ब्राह्मणांनी निर्मिली नाही हा निष्कर्ष काढण्यासाठी मोरे यांनी तिचा उगम टोळीव्यवस्थेत शोधलेला आहे की काय, असे वाटते. जातीव्यवस्थेने भारतीय समाजाची जी हानी केलेली आहे ती तिच्यातील कप्पेबंद श्रेष्ठ-कनिष्ठत्व व  स्पर्शास्पर्शत्व यांच्यामुळे. जातीव्यवस्थेत ही वैशिष्ट्ये कशी आली हे टोळीसिद्धांताने मुळीच सिद्ध होऊ शकत नाही.

जातीव्यवस्था कोणत्याही कारणांमुळे निर्माण झालेली असली तरी तिला धर्मव्यवस्थेने पाठींबा दिला हे स्पष्ट आहे. यासाठी जरी भाकडकथांचा आधार घेतला असला तरी ते धार्मिक समर्थन होते हे लक्षात घेतले पाहिजे. जातीव्यवस्थेमध्ये श्रेष्ठ-कनिष्ठत्व कसे निर्माण झाले हे नि:संदिग्धपणे स्पष्ट करता आले नाही तरी मनुस्मृतीसारख्या स्मृतिग्रंथांनी या बाबींना मजबूत समर्थन दिलेले आहे, हे स्पष्ट आहे. त्यावेळी समाजमनावर या स्मृतिग्रंथांचा जबरदस्त पगडा होता यात शंका नाही. स्मृतिग्रंथांतील निर्देश जशास तसे अंमलात येत नसले तरी वेळोवेळी त्यांचा आधार घेतला जात असे. तेराव्या शतकात चक्रधरस्वामींच्या एका दलित भक्ताला धर्माधिकार नाही हे निश्चित करून त्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली ती शास्त्राचा आधार घेऊनच. लीळाचरित्रात या घटनेचा स्पष्ट उल्लेख आहे.

No comments:

Post a Comment