Thursday, 26 November 2015

आमिर खान आणि

अमीर खानच्या वक्तव्याविरुद्ध प्रतिक्रियांचा जो गदारोळ उठला आहे, तो अमीर खानच्या वक्तव्यात काही अंशी तरी तथ्य आहे, हेच अधोरेखित करीत नाही काय? सध्या वाढलेल्या तथाकथित असहिष्णुतेविषयी देशातील अनेक लेखक-कलावंत-विचारवंत-शास्त्रज्ञ यांचे जे मत बनले आहे, ते का बनले आहे याचाही विचार आपण करू नये काय? अमीर खानचे तसे मत बनले असेल तर ते का बनले आहे याचा खोलात जाऊन विचार करण्याची गरज आहे.त्याच्या वक्तव्याच्या मागचे पुढचे संदर्भ लक्षात न घेता आपण प्रतिक्रिया व्यक्त करण्याची किती घाई करतो! तरीही  अमीर खानच्या वाटण्यात काही अंशी तरी तथ्य आहे काय, याचाही विचार करायला हवाच. काही असले तरी अमीर खानची उक्त प्रतिक्रिया ही Over Reaction च्या सदरात येते हे मात्र मान्य करावे लागेल.तेवढ्यापुरता त्याला दोष दिलाच पाहिजे. त्याच्यासारख्या प्रथितयश व्यक्तीने अशी वक्तव्ये करण्यापूर्वी विचार केला पाहिजे.
अमीर खानऐवजी इतर मुस्लीम नसलेल्या व्यक्तींनी जेंव्हा अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या तेंव्हा आपण एवढा गदारोळ केलेला आहे काय?  अमीर खान मुस्लीम नसता तर त्याच्या प्रतिक्रियेवर आपण एवढे क्रुद्ध  झालो असतो काय, याचेही  प्रत्येकाने आत्मपरीक्षण  केले पाहिजे. याचे उत्तर नकारात्मक येत असेल तर ते अतिशय गंभीर आणि संवेदनशील माणसांची काळजी वाढविणारे आहे, यात शंका वाटत नाही.

Thursday, 19 November 2015

असहिष्णुते विषयी

यापूर्वी घडलेल्या असहिष्णुतानिदर्शक घटनांच्या वेळी लेखक, विचारवंतांनी  पुरस्कार परत केले नाहीत म्हणून त्यांनी  आता ते परत करू नयेत, असा युक्तीवाद कसा काय सिद्ध होऊ शकतो. आधी पुरस्कार परत न करण्यात चूक झाली असेल तर आता ते परत करून ही चूक दुरुस्त करूच नये काय?

दुसरी गोष्ट महणजे यापूर्वी घडलेल्या असहिष्णुतादर्शक घटनांना त्यावेळच्या सरकारचा पाठींबा नव्हता, असे लोकांचे मत असल्याचे दिसते. आता मात्र या घटना सरकारपुरस्कृतच असाव्यात असा संशय लोकांच्या मनात असल्याचे जाणवते. त्यामुळेच यापूर्वी पुरस्कारवापसीचा प्रश्न निर्माण झाला नसावा. आता मात्र सरकारवरील संशयामुळे लेखक-विचारवंतांना पुरस्कार परत करून सरकारचा निषेध करण्याची आवश्यकता वाटली असावी. 

Thursday, 12 November 2015

Wakeup: स्वातंत्र्य आणि समता. न्याय व नीतीही.

Wakeup: स्वातंत्र्य आणि समता. न्याय व नीतीही.: समता आणि स्वातंत्र्य या तत्त्वांवर आजपर्यंत अनेकांनी प्रकाश टाकलेला आहे. परंतु या तत्त्वविचारांचे आकर्षण मुळीच कमी होत नाही. समता हे तत्त्...

स्वातंत्र्य आणि समता. न्याय व नीतीही.

समता आणि स्वातंत्र्य या तत्त्वांवर आजपर्यंत अनेकांनी प्रकाश टाकलेला आहे. परंतु या तत्त्वविचारांचे आकर्षण मुळीच कमी होत नाही. समता हे तत्त्व अखिल मानवजातीच्या समानतेकडे निर्देश करते. परंतु जगातील माणसे प्रत्यक्षात समान नसतात. प्रत्येकाची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमता वेगवेगळी असल्यामुळे यच्चयावत मानवजात स्वभावत: समानतेच्या पातळीवर येऊ शकत नाही. त्याचबरोबर जगाच्या विविध भागांतील वेगवेगळ्या संस्कृतीने मानवाचे जात, धर्म. वंश, वर्ण, आर्थिक क्षमता, राजकीय सत्ता इत्यादी शारीरिक व सांस्कृतिक आधारांवर असंख्य भेद केलेले आहेत. या भेदांवर आधारित असलेले प्रस्थापित गट त्याहून कनिष्ठ गटांवर अन्याय करून त्यांचे सातत्याने शोषण करीत असतात. त्यामुळे विविध गटांमधील दरी उत्तरोत्तर वाढत जाते आणि त्यातूनच सामाजिक आरोग्याला बाधा पोहोचते. या स्थितीच्या पार्श्वभूमीवर समाजातील काही जाणत्या लोकांना समाजात समानतेची प्रस्थापना करण्याची  आवश्यकता जाणवली असावी. परंतु अशी प्रस्थापना कशी करायची हा एक जटील प्रश्न जाणत्या लोकांसमोर उभा राहतो.
हा प्रश्न सोडविण्यासाठी वेगवेगळ्या अंगांनी विचार करण्यात आला. आधुनिक काळातील मार्क्सवाद हा त्यापैकीच एक विचार होय. समाजाचे आर्थिक अंग हा त्याचा पाया आहे. यात आवश्यक ते मुलभूत बदल झाल्यास समाजरूपी इमारतीच्या इतर अंगांतही आपोआप  बदल होतात, असे मार्क्सवादाचे प्रतिपादन आहे. म्हणूनच आर्थिक समानता आली की इतर समता आपोआपच प्रस्थापित होतात, हे ओघाने आलेच. परतू या समानतेच्या स्थापनेसाठी हा विचार स्वातंत्र्याचा बळी घेतो. संपत्तीचे समान वितरण घडवून आणायचे असेल तर ज्याच्याकडे ती अधिक प्रमाणात आहे, ती त्याच्याकडून हिरावून घेणे अपरिहार्य असते. अशा वेळी त्या संपन्न माणसाच्या स्वातंत्र्याला साहजिकच पायदळी तुडविले जाते. यातूनच समता व स्वातंत्र्य यांच्यात ताळमेळ घालणे ही एक समस्या समोर येते. आपल्याला स्वातंत्र्य या मूल्याची बूज राखण्याबरोबरच समाजात समताही प्रस्थापित करावयची आहे. त्यासाठी स्वातंत्र्य आणि समता या दोन्हीही मुल्यांचा संकोच करावा लागतो.
समतेच्या तत्त्वानुसार सर्व नागरिक कायद्यासमोर समान आहेत. याचा अर्थ राज्य हे नागरिकांमध्ये धर्म, जात, लिंग, अर्थसत्ता, धर्मसत्ता अशा आधारांवर भेदाभेद करणार नाही. एवढेच नव्हे तर वरील आधारांवर भेदाभेद करणाऱ्या प्रवृत्तींवर प्रतिबंध घालील.  जातीचा आधारावर दुसऱ्याला हीन लेखणाऱ्या प्रवृत्तींना अटकाव करण्यासाठीच राज्याला “अॅट्रोसिटी प्रतिबंध” सारखे कायदे पारित करावे लागतात. कायद्यासमोर सर्व नागरिक समान असतील तर कायदा हा सर्वांना विकासाची समान संधी देईल. कोणत्याही जाती-धर्माच्या व्यक्तीला विकास करण्यासाठी राज्य समान अवकाश उपलब्ध करून देईल. कोणी कोणालाही कनिष्ठ समजून हीन लेखू शकणार नाही. अन्यथा स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशात  मनुस्मृतीप्रणित धर्मशास्त्र हे माणसाला जन्माधारित जातीवर श्रेष्ठ-कनिष्ठ असा दर्जा प्रदान करीत असे. समता हे तत्त्व म्हणूनच मनुस्मृतीप्रणित धर्मशास्त्राला पूर्णपणे विरोधी असल्याचे स्पष्ट होते. यामुळेच बाबासाहेब आंबेडकरांना मनुस्मृतीचे दहन करणे आवश्यक वाटले. केवळ कायद्यासमोर समान या तत्त्वाचा अवलंब केल्याने खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित होऊ शकत नाही. एखाद्या लंगड्या व्यक्तीबरोबर सुदृढ व्यक्तीची  धावण्याची शर्यत लावली आणि अशा शर्यतीत दोघांनाही सारखीच संधी, सारख्याच सुविधा आणि सारखेच नियम लावले तरीही या शर्यतीत सुदृढ व्यक्ती जिंकणार हे उघड आहे. आपल्याला या दोघांमध्ये खऱ्या अर्थाने शर्यत लावायची असल्यास त्यांना सर्व दृष्टींनी समान पातळीवर आणणे आवश्यक आहे. त्यासाठी लंगड्या व्यक्तीच्या ठिकाणी असणारी अक्षमता लक्षात घेता त्याच्यासाठी वेगळे नियम लावावे लागतील. केवळ समान संधी पुरविल्याने लंगड्या व्यक्तीला सुदृढाच्या पातळीवर आणता येणार नाही. आरक्षणाच्या मागेही हेच तत्त्व अनुस्यूत असल्याचे आपल्या लक्षात येईल. थोडक्यात खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित करायची असल्यास सर्वांसाठी समान धोरणे अवलंबून उपयोगाचे नाही. धोरणातील असा भेदाभेद हा अंतिमत: समतेसाठीच आहे, हे आपल्या सहज लक्षात येईल.
समता या मूल्याचा विचार करताना स्वातंत्र्य या मुल्याचाही विचार करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय? माणसाला कशापासून स्वातंत्र्य पाहिजे आहे? या सारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यातूनच आपल्याला स्वातंत्र्याचा अर्थ उमगू शकेल. सूक्ष्म पातळीवर विचार करता माणसाला त्यांच्या  अज्ञान आणि  अज्ञानजनित अंधश्रद्धा व पूर्वग्रह यांच्यापासून स्वातंत्र्य हवे आहे. परंतु अशा अज्ञान व पूर्वग्रहदूषित माणसाला याची जाणीव नसते त्यामुळे त्याला अशा स्वातंत्र्याची आवश्यकताही भासत नाही. कदाचित विषमता, पारतंत्र्य, अन्याय व तद्जनित शोषण यामुळे असा माणूस स्वातंत्र्य व समता  या मूल्यांची कल्पनाही करू शकत नाही.   तथापि  ढोबळपणे विचार करता माणसाला परकीय सत्तेपासून मात्र  स्वातंत्र्य हवे असते. कारण माणसाला शारीरिक, वाचिक स्वरूपाच्या कृती करण्याचे स्वातंत्र्य पाहिजे आहे. आणि परकीय सत्ता असे स्वातंत्र्य देत नसते. परंतु अशा कृती करण्याचे स्वातंत्र्य कशाला हवे आहे? माणसाला मुळात त्याच्या दु:ख, दारिद्र्य, यांच्यापासून स्वातंत्र्य पाहिजे. त्यासाठी त्याला स्वविकासार्थ वांछित कृती करण्याची गरज असते. आणि अशा कृती स्वातंत्र्यातच शक्य होऊ शकतात. याचा अर्थ स्वातंत्र्य हे कशाचे तरी साधन आहे काय, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही.
एखाद्या हुकुमशहाने आपल्या प्रजेच्या सर्व शारीरिक गरजा पूर्ण केल्या तर माणसाला स्वातंत्र्याची इच्छा राहणार नाही काय? जागतिक इतिहासाचा विचार केला तर या प्रश्नाचे उत्तर “ तशाही स्थितीत स्वातंत्र्याची आस राहीलच” असेच द्यावे लागते.  प्रारंभीच्या काही कालावधीसाठी  माणूस अशा राजवटीत समाधानी राहील. परंतु हे समाधान फार काळ टिकणारे नसते. लवकरच त्याची स्वातंत्र्याची उर्मी जागृत होते  आणि तो पारतंत्र्याच्या विरोधात लढायला तयार होतो. कारण माणसाला मुळातूनच शारीरिक-वाचिक कृतीचे स्वातंत्र्य हवे असते. अशा स्वातंत्र्याची इच्छा इतकी प्रभावी असते की  हे स्वातंत्र्य कशाचे तरी साधन नसून त्याला  साध्यमूल्यच आहे, असे वाटते. यामुळेच माणूस या स्वातंत्र्यासाठी आपल्या  सर्व ऐहिक सुखांचा त्याग करायला तयार होतो. एवढेच काय, तो स्वातंत्र्यासाठी आपले प्राणही द्यायला तयार होतो. थोडक्यात माणूस कोणत्याही परिस्थितीत, सोन्याचा असला तरी , पिंजऱ्यात बंदिस्त होऊ इच्छित नाही. याचा अर्थ स्वातंत्र्याला साधनमूल्यापेक्षाही अधिक मूल्य आहे, असे दिसून येते.
वरील विवेचनावरून स्वातंत्र्य हे माणसाची मुलभूत उर्मी आहे आणि ते मानवी प्रगतीचे साधनही असल्याचे ठरते. तथापि हे स्वातंत्र्य अनिर्बंध असून उपयोगाचे नाही. ते तसे असल्यास मानवी प्रगतीचा उद्देश पूर्ण होण्याची शक्यता नाहीशी होते. कारण असे अनिर्बंध स्वातंत्र्य समाजात स्पर्धा, संघर्ष आणि त्यातून अराजक निर्माण करू शकते. शारीरिक, मानसिक, बौद्धिक पातळीवर प्रत्येकजन वेगळा असल्यामुळे जे लोक बलवान आहेत ते बलहीनांचे शोषण व दमन करू शकतात. यातून अखिल मानवसमाजाच्या स्वातंत्र्याऐवजी मुठभरांचे स्वातंत्र्य प्रस्थापित होऊ शकते. इतिहासाने ते सिद्ध केलेच आहे.  सहाजिकच अशा समाजात समतेचे तत्त्व पायदळी तुडविले जाते. म्हणूनच अखिल मानव्याच्या कल्याणाच्या दृष्टीने समता व स्वातंत्र्य या मुल्यांचा ताळमेळ घातलाच पाहिजे. त्यासाठी स्वातंत्र्याचे तत्त्व समता व न्याय या तत्त्वांच्या मर्यादेतच राबविणे आवश्यक आहे. तरच या स्वातंत्र्याचा लाभ सर्व मानवसमाजाला होऊ शकेल.
परंतु मुठभर बलवानांनी आपल्या अनिर्बंध स्वातंत्र्याला मर्यादा का घालून घ्यावी? अशी मर्यादा घालून घेण्यासाठी त्यांच्यावर कोणती प्रेरणा कार्य करीत असावी? बलवानांनाही स्वातंत्र्याचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्याभोवतीचे वातावरण स्वस्थ असण्याची गरज आहे. अन्यथा त्यांना विनाअडथळा या स्वातंत्र्याचा लाभ घेता येणे शक्य होणार नाही. कारण स्वातंत्र्याअभावी बलहीनांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता  बलवानांच्या स्वातंत्र्यामध्ये अडथळे निर्माण करते. त्यासाठी अशा बलवान लोकांना आपल्या स्वातंत्र्याला मर्यादा घालून घेणे अपरिहार्य होते.
माणसाच्या ठिकाणी बंधुतेची भावनाही नैसर्गिकरीत्या अस्तित्वात असते. स्वातंत्र्याच्या तुलनेत ही भावना बलवान नसली तरी ती काही प्रमाणात तरी ती कार्य करीत असतेच. या भावनेमुळे व्यक्तीच्या मनात  आपल्या गटातील अन्य व्यक्तींच्या बाबतीत  सहानुभाव व आपुलकीची संवेदना निर्माण होते. या संवेदनेतून व्यक्तीच्या ठायी काही प्रमाणात तरी नि:स्वार्थी भावना निर्माण होत असावी. आपल्या सहकाऱ्यासाठी  आपल्या स्वातंत्र्यालाही मर्यादा आणण्याला त्याला आनंदच होत असावा. समाजात समता प्रस्थापित करण्यासाठीही राज्याला व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आणाव्या लागतात.
स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याच्या इच्छेतूनच ‘नीतिशास्त्र’ निर्माण झालेले आहे काय, असाही विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. आपल्याशी समोरच्याने कसे वागावे, याविषयी आपली एक निश्चित कल्पना असते. त्याने तसे वागावे यासाठी आपण बळाचाही वापर करू शकतो. पण आपल्यापेक्षा अधिक बलवान व्यक्ती आपल्या बाबतीतही त्याच बळाचा वापर करून आपल्यालाही गुलाम बनवू शकतो. मग यावर उपाय काय? मग समोरचा आपल्याशी ज्या प्रकारे वागावा, अशी आपली इच्छा असते, तसेच आपण त्याच्याशी वागल्यास काय होईल? कदाचित तोही आपल्याशी तसाच वागेल. यावर कांट या तत्त्वज्ञाचे विचार वाचणे मननीय ठरेल. थोडक्यात आपल्याला आपले स्वातंत्र्य निर्भयपणे वापरायचे असेल तर समोरच्यालाही त्याच्या स्वातंत्र्याचा उपभोग निर्भयपणे घेता आला पाहिजे. अर्थात अशा नीतीच्या प्रस्थापनेसाठी सबलांनीच पुढाकार घ्यायला हवा. अंतिम हिताचा विचार केल्यास दुसऱ्याचा विचार करून वागणे, आवश्यकच आहे, हे समाजाला समजल्यामुळे नितीशास्राचा उदय झाला असावा, असे वाटते. अशी नीती समाजात प्रस्थापित होण्यासाठी प्रथा, रूढी, धर्मवचनें व कायदा या बाबींची निर्मिती झाली असावी. साधारणत: धर्म हा नीतीचा स्रोत मानल्या जातो. परंतु सूक्ष्मपणे विचार केल्यास प्रथम सामाजिक आवश्यकता निर्माण होते आणि त्यानंतर समाज साधने निर्माण करतो, हे लक्षात येईल. म्हणूनच समाज टिकण्यासाठी नीती अपरिहार्य आहे, हे लक्षात आल्यानेच नीतिशास्त्र निर्माण झाले असावे, असे वाटते. आणि त्यानंतरच नीती प्रस्थापनेसाठी आणि ती टिकविण्यासाठी धर्माने पुढाकार घेतला असावा. म्हणूनच धर्म न मानणारी व्यक्तीही उच्च कोटीची नीतिमान असू शकते. थोडक्यात सांगायचे झाल्यास, नीती ही मानानिर्मित संस्कृतीचा भाग असून पुढे ती  आपल्या सवयीचा भाग झाली आणि आपल्याला मात्र नीती ही नितीसाठीच असते, असे वाटू लागले.
सारांश, समाजविकासाच्या ओघात प्रथम  स्वातंत्र्याची उर्मी उद्भूत झाली असावी. या स्वातंत्र्याच्या उपभोगासाठी बलवानांनी स्वत:च्या बळाने व अन्यायकारक तत्त्वांच्या सहाय्याने  समाजात विषमता प्रस्थापित केली. आणि ती टिकविण्यासाठी धर्माचा वापर केला. समाजातील अन्यायग्रस्त लोकांमधील जागृतीमुळे या बलवान लोकांना आपल्या स्वातंत्र्यावर मर्यादा आणणे आवश्यक ठरले. त्यातूनच समतेचा मार्ग सुकर झाला असावा.

Monday, 2 November 2015

स्वामी विवेकानंद यांना समजून घेताना.

सामान्य भारतीयांच्या मनात स्वामी विवेकानंदांची प्रतिमा ‘हिंदू धार्मिक नेता’ अशीच असते. प्रत्यक्षात स्वामी विवेकानंद कोण होते, हे समजावून घ्यायचे असेल तर त्यांचे चरित्र आणि विचार मुळातूनच वाचले पाहिजेत. खरे विवेकानंद भारतीय समाजासमोर का येऊ शकले नाहीत, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि आपल्या देशाचे ते एक दुर्दैवच म्हणावे लागेल. स्वामी विवेकानंदांना समजून घेण्यासाठी त्यांची वक्तव्ये आपल्याला  उपयोगी ठरतील. त्या दृष्टीने मी त्यांची  काही वक्तव्ये उदधृत करणार आहे.
रामनदचे राजे ‘भास्कर सेतुपती’ यांना उद्देशून-  “ मोक्ष हेच संन्याशाचे लक्ष्य असले तरीही, भारतवर्षातील जनतेची उन्नती करण्याचा प्रयत्नदेखील मोक्षप्राप्तीचे एक साधन होय”
म्हैसूरच्या महाराजांना २३-०६-१८९४ रोजी शिकागोहून लिहिलेल्या पत्रातील काही अंश—
“भारताच्या सर्व प्रकारच्या दुर्गतीचे मूळ कारण आहे, तेथील दरिद्री सर्वसाधारण जनतेची दु:स्थिती. .....खालच्या म्हणून गणल्या जाणाऱ्या जातींच्या बाबतीत आमचे एकमेव कर्तव्य म्हणजे त्यांना शिक्षण देणे, त्यांच्या व्यक्तित्वाचा विकास करणे, हे होय. त्यांना हेच शिकवावे लागेल की, तुम्हीही माणसे आहा,.....या लोकांची ही जाणीवच मुळी हरपून गेली आहे. आपल्या देशातील कार्यकर्त्यांपुढे आणि राजांपुढे सेवेचे हे विस्तृत क्षेत्र पसरलेले आहे. आजपावेतो या दिशेने काहीच हालचाल झालेली नाही. पुरोहित-पंड्यांच्या आणि विदेशी राजशक्तींच्या पायाखाली शतकानुशतके सतत तुडविले गेल्यामुळे हे (खालचे गणले जाणारे) लोक विसरून गेले आहेत की तेही मनुष्यच होत. ......पुष्कळ दिवसांपासून माझ्या मनात याच (खालच्या म्हणून गणल्या जाणाऱ्या लोकांसंबंधी) कार्यासंबंधीच्या कल्पना सारख्या घोळत आहेत. त्यांना प्रत्यक्षात उतरविण्याचा उपाय मला भारतात आढळेना म्हणून मी या देशात(अमेरिकेत) आलो आहे. ......ही दरिद्री मुले शिक्षणकेंद्रावर येऊ शकत नसतील तर शिक्षणच त्यांच्या घरी न्यावे लागेल.”
या पत्रात स्वामीजींनी त्यांचा अमेरिकेत जाण्याचा उद्देश स्पष्ट केलेला आहे. आपल्याला उगीचच वाटते की स्वामीजी हिंदू धर्माची पताका फडकाविण्यासाठीच अमेरिकेत गेले.
आणखी काही उद्धरणे-----
१०-०७-१८९३ रोजी जपानहून त्यांच्या मद्रासी शिष्याला लिहिलेल्या पत्रात  स्वामी विवेकानंद लिहितात.
“(भारतीय सुशिक्षितांना उद्देशून-) ह्या हजारो वर्षांच्या साचलेल्या खुळचट समजुतींचा बोजा डोक्यावर घेऊन बसला आहात. शतकानुशतके खाद्य-अखाद्याचा विचार करण्यात सारी शक्ती बरबाद करीत आहात. पुरोहितगिरीरुपी महामुर्खपणाच्या भोवऱ्यात गरगरा चक्कर खात आहात. ......या, मनुष्य व्हा. आधी त्या दुष्ट पुरोहितांना दूर करून टाका. कारण हे बिनडोक्याचे लोक कधीही चांगल्या गोष्टी ऐकायला तयार व्हायचे नाहीत. त्यांचे हृदयही शून्य होऊन बसलेले आहे. त्याचा विकास-विस्तार कधीही होणे शक्य नाही. शेकडो शतकांच्या खुळचट समजुतींमध्ये आणि अत्याचारांमध्ये यांचा जन्म—आधी यांना बाजूस सारा.”
त्यांनी एका ठिकाणी लिहिले आहे-
“(आपल्या अनुयायांना उद्देशून-) लक्षावधी, कोट्यावधी दारिद्र्यपीडितांच्या हृदयातील वेदनेची स्वत:ला जाणीव होऊ द्या, निष्कपट होऊन त्यांच्यासाठी भगवंताजवळ सहाय्यार्थ प्रार्थना करा- साहाय्य लाभेलच लाभेल. वर्षांमागून वर्षे ह्याच चिंतेचा भार डोक्यावर,आणि ह्याच दु:खाचा भार हृदयामध्ये बाळगून मी सारखे भ्रमण केले आहे. तथाकथित धनी आणि मोठ्या लोकांच्या दारोदार फिरलो आहे. आणि अखेरीस हृदयाचे रक्त सांडत सांडत अर्धी अधिक पृथ्वी पायाखाली तुडवून या सुदूर विदेशी (अमेरिकेत) साहाय्यलाभाच्या आशेने येऊन उपस्थित झालो आहे. ......मी कदाचित या परदेशात थंडीने आणि उपासमारीने मारूनही जाईन, परंतु हे युवकांनो! आपल्या या दरिद्री, पतित आणि रंजल्यागंजल्या बांधवांसाठी प्राण पणास लावून प्रयत्न करण्याचा वारसा मी तुम्हा सर्वांसाठी मागे ठेवून जात आहे. तुम्ही या तीस कोटी नर-नारींच्या उद्धाराचे व्रत घ्या”

वरील उद्धरणावरून स्वामीजींचा खरा जीवनोद्देश काय होता आणि त्यांना आपल्याकडून काय अपेक्षित होते, हे स्पष्ट होते. त्यांचे अनुयायी म्हणवून घेणारे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायला तयार आहेत काय, हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही.

Monday, 26 October 2015

चरित्रनायक समजून घेताना-

कोणत्याही महापुरुषाचे चरित्र लिहिताना चरित्रकाराने तटस्थता तर बाळगलीच पाहिजे. त्यासोबतच तो चरित्रविषय असलेल्या महापुरुषाशी समरसही व्हायला पाहिजे. तटस्थता बाळगल्यामुळे तो त्या महापुरुषाचे विचार, कृती, उक्ती यांचे योग्य असे  मूल्यमापन करण्यात यशस्वी ठरू शकतो. आणि समरसतेमुळे त्या महापुरुषाने व्यक्त केलेले विचार व केलेल्या कृती कोणत्या विशिष्ट सामाजिक-राजकीय-आर्थिक  अवस्थेत आणि कोणत्या मानसिक अवस्थेत केलेल्या आहेत याचे आकलन चरित्रकाराला होऊ शकते. कोणत्याही महापुरुषाच्या उक्ती-कृतीला त्या त्या देश-काळ-स्थितीच्या मर्यादा असतातच. चांगला चरित्रकार महापुरुषाच्या उक्ती-कृतीची मांडणी-वर्णन-मूल्यमापन करताना त्या त्या वेळची सामाजिक-राजकीय-आर्थिक अवस्था व त्या महापुरुषाची मानसिक अवस्था पार्श्वभूमीवर ठेवतो. त्यामुळे वाचकाला त्या महापुरुषाचे आकलन योग्यप्रकारे होते. शाहू महाराजांचे चरित्र लिहिताना त्या काळाची राजकीय स्थिती लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण महाराजांना विशिष्ट राजकीय स्थितीच्या मर्यादेत आपले काम करावे लागलेले आहे. सावरकरांचे चरित्र लिहिताना सावरकरांची जन्माठेपेमुळे जी मानसिक अवस्था झालेली होती, ती लक्षात घेतलीच पाहिजे. म्हणजे त्यांच्या माफिनाम्याचाही अर्थ लागू शकतो तसेच त्यांचा माणूसघाणेपणाही समजून घेता येतो. फुल्यांचे चरित्र लिहिताना त्यांच्या शिक्षण व ज्ञानाच्या मर्यादा आपण लक्षात घेतल्याच पाहिजेत. ते ज्या वातावरणात वाढले होते त्या वातावरणात तेवढी ज्ञान-साधणे त्यांना प्राप्त होणे शक्य नव्हते. किंवा अशी ज्ञान-साधणे मिळाली असती तरी त्यांना प्राप्त परिस्थितीत त्यांचा वापर करता आला असता काय? हे जर आपण समजून घेतले तर इंग्रजी सत्तेची वास्तविकता त्यांना समजली नाही ही बाब आपल्याला समजावून घेता येते. समाजातील सर्वात तळाशी असलेल्यांच्या उद्धाराची त्यांची तळमळ आपण समजून घेतली तर असा उद्धार करण्यासाठी इंग्रजी सत्ता अधिक अनुकूल होती, हे आपणास मान्य करावे लागेल. आणि मग इंग्रजी सत्तेविषयीची त्यांची आपुलकीही आपणास समजू शकते. मध्ययुगीन संतांची चरित्र लिहिताना संतांना असलेल्या त्या काळाच्या मर्यादा आपण लक्षात घेतल्याच पाहिजेत. आताच्या सामाजिक सुधारणांची त्यांच्याकडून अपेक्षा करणे चुकीचेच ठरेल. संतांकडून त्या काळात बुद्धिवाद, इहवाद यांची अपेक्षा करणेही  अवाजवीच म्हणावे लागेल. उगीचच आधुनिक मुल्ये त्यांना चिकटवणे अनैतिहासिकच म्हणावे लागेल. अशी मुल्ये त्यांच्या चरित्रात दाखविता आले नाहीत म्हणून  संत छोटेही ठरत नाहीत.
या दृष्टीने विचार करता धनंजय कीर हे चरित्रकार सर्वात उजवे ठरतात, असे मला वाटते. महात्मा फुले, शाहूमहाराज, बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर यांना खऱ्या अर्थाने समजावून घ्यायचे असेल तर कीरांच्या चरित्रांना पर्याय नाही, असे मला वाटते. त्यांची चरित्रे वाचताना चरित्रनायक गुण-दोषांसहीत आपल्यासमोर स्पष्ट होतात. ही चरित्रे वाचताना आपणामध्ये  या चरित्रनायकांचे दोषही समजावून घेण्याची क्षमता निर्माण होते.
जाता जाता-

वरील पार्श्वभूमीवर आपण चरित्रनायकांना देवत्व बहाल करून या देवतांना एकेका जातीमध्ये बंद करून त्यांच्या आकलनाचे  मार्गच बंद करीत नाहीत काय?

Sunday, 18 October 2015

ब्राह्मणेतरांमध्ये प्रामुख्याने दोन गट पडतात. एक गट स्थितीवादी आहे. ते आर्थिकदृष्ट्या बऱ्या स्थितीत असतात किंवा सामाजिक इतिहासाविषयी बऱ्यापैकी अनभिज्ञ असतात. दुसरा गट बंडखोर आहे. इतिहासाची थोडीफार तरी जानकारी यांना असते. हे क्रियाशील असतात. पण यांची क्रियाशीलता इतकी तीव्र असते की ते चटकन टोकाच्या  निष्कर्षांवर येतात.
१)      स्थितीशील ब्राह्मणेतरांना बहुत्येक वेळा इतिहासातील समांतर प्रवाहाची जाणीव नसते. ते मुख्य प्रवाहातील विचारांनीच प्रभावित झालेले असतात.
२)      दुसऱ्या टोकावरील थोड्या प्रमाणात असलेल्या बंडखोर  ब्राह्मणेतरांचा  ‘इतिहासातील सर्व पापे ब्राह्मणांनीच केलेली आहेत’ यावर पूर्ण विश्वास असतो.
३)      सर्वच ब्राह्मण कावेबाज असतात, याची त्यांना खात्रीच असते. त्यामुळे कोणी ब्राह्मण सद्हेतूनेच केवळ काही विचार मांडत असेल यावर त्यांचा विश्वास बसने शक्य होत नाही.
४)      ब्राह्मणांवर टीकाच करायची असल्याने ते त्यांचे चुकीचे संदर्भ आधारासाठी घेतात. आणि या संदर्भांचा सरळ अर्थ न लावता वाकड्यात घुसतात. त्यांच्या मते हाच त्या संदर्भांचा गर्भितार्थ आहे. खरे तर यांना ब्राह्मणांना अचूकपणे पकडताच येत नाही.
५)      परंपरांना ते आवर्जून विरोध करतात. मग त्या काही वेळा चांगल्या असल्या तरी. त्यासाठी त्या परंपरांचा ते स्व अर्थ साधक असा अर्थ लावतील. बहुजन समाजाने मोठ्या प्रमाणात स्वीकृत केलेल्या काही परंपरांचा ते ब्राह्मण विरोधी असा अर्थ लावतील.
६)      ब्राह्मणेतरांच्या मधील बहुसंख्य ब्राह्मणेतर या बंडखोर ब्राह्मणेतरांना विरोध करतात किंवा उपेक्षा तरी करतात. पुरंदरे प्रकरणात विश्वास पाटील आठवावेत.
७)      अशा बहुत्येक ब्राह्मणेतरांना परंपरेचा भाग व्हायला आवडते.
८)      अशा  ब्राह्मणेतरांना वाद नको असतात. सगळे गोडी गोडी असणे त्यांना निर्धोक वाटते. बहुत्येक करून अशी मंडळी आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असतात. किंवा प्रस्थापित व्यवस्थेत त्यांना आपापल्या जागा प्राप्त झालेल्या असतात.
९)      ब्राह्मणेतरांमधील या फुटीमुळे- जसे सर्वच ब्राह्मण पुरंदरेंना पाठींबा देतात तसे सर्व ब्राह्मणेतर पुरंदरेंना विरोध करीत नाहीत. त्यातील विश्वास पाटलांसारखे काहीजण तर पुरंदरे यांचे कट्टर समर्थकही असतात.
१०)  ब्राह्मणेतरांमधील बंडखोर ब्राह्मणेतर दलित आणि मुस्लीम यांच्याबद्दल बरे बोलत असतात. ब्राह्मणांच्या विरुद्ध लढावयाच्या लढ्यात त्यांना दलित आणि मुस्लीम यांना सोबत घ्यावयाचे आहे. इतर ब्राह्मणेतर मात्र दलित आणि मुस्लीम यांच्याबाबत खाजगीत प्रतिकूल शेरे मारीत असतातच.
११)  बंडखोर ब्राह्मणेतर हे प्राय: हिंदुत्ववादाविरोधी असतात. त्यामुळे हे  हिंदुत्ववादी विचार व विचारवंत यांच्याविरुद्ध तुटून पडतात. हिंदुत्वाची मांडणी करणारे सावरकर किंवा शिवाजी महाराजांची हिंदू राजा अशी प्रतिमा  रंगविणारे  पुरंदरे म्हणूनच त्यांच्या टोकाच्या टीकेचे लक्ष्य ठरतात. मग सावरकरांचे निरातिशय देशप्रेम व इतर गुण  त्यांना महत्त्वाचे वाटणार नाहीत. किंवा शिवचरित्र लोकप्रिय करण्याचे श्रेयही ते पुरंदरेंना देणार नाहीत.

जाता जाता – मला वाटते, ब्राह्मण व ब्राह्मणेतर यांचे एकमेकाविरुद्ध टोकांवर असणे हे क्रिया-प्रतिक्रियांचा खेळ आहे काय? एकाने टोकावर जाऊन क्रिया व्यक्त केली की दुसरा गट दुसऱ्या टोकावर जाणारच. समतोल विचार करताच येणार नाही काय?