Thursday 7 July 2016

धर्मनिरपेक्षता की धर्मसमभाव?

धर्मनिरपेक्षता व  सर्वधर्मसमभाव हे दोन्ही शब्द सामान्यपणे समान अर्थाने वापरले जातात. काटेकोरपणे बघितल्यास  हे अचूक नाही. धर्माचे अस्तित्व किंवा धर्माचे निर्देश लक्षात न घेता केलेले व्यवहार म्हणजे धर्मनिरपेक्ष व्यवहार अशी धर्मनिरपेक्षतेची व्याख्या केली जाते. यामध्ये धर्माचे मुळी अस्तित्वच लक्षात घेतलेले नसते. त्यामुळे सर्व धर्म समान मानण्याचा किंवा न मानण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सर्वधर्मसमभाव या संकल्पनेत सर्व धर्मांना समान लेखून व्यवहार केले जाणे अपेक्षित आहे. सर्व धर्मांना समान लेखने म्हणजे काय? कोणतेही राज्य एखादे धोरण ठरविते किंवा एखादा कार्यक्रम आखते तेंव्हा ते सर्व धर्मांना समान लेखते असा त्याचा अर्थ करावा लागेल. परंतु राज्य एखादी कृती करण्याचे ठरविते किंवा कृती करते तेंव्हा ती कृती सर्व धर्मांना सारखी ठरू शकत नाही. समान नागरी कायद्यासारखा निर्णय हा हिंदूंपेक्षा मुसलमानांना अधिक नाराज करणारा ठरतो. राज्याची ही कृती मुसलमानांना सर्वधर्मसमभाव या संकल्पनेच्या विरोधी वाटेल. थोडक्यात, सर्व धर्मांना समान ठरेल अशी कृती राज्याकडून होणे एकंदर कठीणच ठरते. राज्याला सर्व धर्मांना सारखेच जवळ करता येणे शक्य नाही; पण सर्व धर्मांना सारखेच दूर मात्र ठेवता येईल. सर्वधर्मसमभाव या संकल्पनेला धर्मनिरपेक्षतेच्या जवळ याच अर्थाने आणता येईल. पण त्यामुळे सर्वधर्मसमभाव या संकल्पनेचा भोंगळ असला तरी आकर्षक असा अर्थ आपल्याला करता येणार नाही.

Secular या शब्दाचा मूळ अर्थ मात्र वरीलप्रमाणे नाही. या साल्पनेचा उगम युरोपात झालेला आहे. तेथे केवळ ख्रिश्चन धर्मच अस्तित्वात होता. हा धर्म(तसे सगळेच धर्म) म्हणजे स्वर्गप्राप्तीचे साधन समजले जातो. थोडक्यात, धर्म म्हणजे जीवनविषयक विशिष्ट अशी पारलौकिक विचारसरणी होय. धर्मनिरपेक्ष दृष्टीकोन म्हणजे या पारलौकिक दृष्टीकोनाच्या निरपेक्ष, खरे तर विरूद्धच असा ऐहिक दृष्टीकोन होय. या अर्थाने धर्मनिरपेक्ष राज्य हे इहवादी असते. अशा राज्याच्या दृष्टीने परलोक अशी काही गोष्ट नसतेच. 

धर्मनिरपेक्षता व  सर्वधर्मसमभाव या संकल्पनांचा वरीलप्रमाणे सैद्धांतिक अर्थ होत असला तरी आपल्या देशात कोणती संकल्पना उपयुक्त ठरेल यावर सुद्धा विचार करणे आवश्यक आहे. भारतीय समाज, मग तो हिंदू असो किंवा  मुस्लीम किंवा इतर कोणताही धर्माचा असो,  हा विशेषत्वाने धर्माने प्रभावित आहे. त्याच्या वैयक्तिक किंवा सामाजिक जीवनात धर्म महत्त्वाची भूमिका बजावत असतो. या  समाजाला विशिष्ट दिशेने प्रवृत्त करायचे असेल तर किंवा त्याला आपलेसे करायचे असेल तर राज्य किंवा राजकीय पक्ष त्याच्या  धार्मिक भावनेला चुचकारण्याचे काम करताना दिसतात. विशिष्ट धार्मिक दृष्टीकोन असणाऱ्या पक्षाला येथे यश मिळण्याची शक्यता निर्माण होते. आणि नास्तिक विचारसरणी असणारे समाजवादी पक्षासारखे लोक लोकांना प्रभावी करण्यात मागे पडतात. आपल्या भारतीय समाजाला धार्मिक दृष्टीकोन असणारे नेते आपले वाटतात. ते आपल्या धार्मिक भावनेची सुरक्षा करतील यावर समाजाचा विश्वास वाटतो. उलट विवेकवादी नेते रुक्ष आणि परके वाटायला लागतात. यासाठी म्हणूनच सर्वधर्मसमभाव या संकल्पनेचा आधार घेतल्या जातो. तथापि या प्रयत्नात विशिष्ट धर्माचे लांगूलचालन किंवा ढोंगीपणा केंव्हा सुरु होतो याचे भान राहत नाही. सर्वच धार्मिक समूहांना हा ढोंगीपणा चांगलाच कळतो. त्यमुळे हे समूह या ढोंगी लोकांपासून दूर जातात.कोन्ग्रेससारख्या पक्षाच्या ऱ्हासाचे कारण यातही शोधता येईल काय? 

वरील पार्श्वभूमीवर इथल्या नेत्यांना सामाजिक समरसतेशी अजिबात तडजोड न करता, नि:पक्षपातीपणे धार्मिक समूहांशी   समरस होऊन, त्यंना विश्वासात घेऊन त्यांच्या धार्मिक भावनांना व विश्वासांना योग्य वळण देण्याचे काम करता येणे शक्य आहे. या अर्थाने भारतीय समाजात सर्वधर्मसमभाव या संकल्पनेचा चांगला उपयोग करता येईल.

No comments:

Post a Comment