सध्याच्या वेगवान
युगात मानसिक तणाव अपरिहार्य आहेत आणि त्यामुळे त्यांच्या नियमनाचेच काम फक्त आपण
करू शकतो, अशी बहुत्येकांची धारणा झालेली आहे. या तणावांपैकी बहुत्येक तणाव
मुळातूनच दूर करता येऊ शकतात, याची कोणाला कल्पनाही करायची गरज वाटत नाही.
बहुत्येक तणावांचा
उगम हा आपल्या आधुनिक विचारसरणीत सापडतो. त्याचप्रमाणे तो आपल्या सदोष व्यवस्थेचीही देन आहे. व्यवस्थेतील
दोष दूर केल्यास असे तणाव मुळातूनच नाहीसे करता येऊ शकतात. परंतु व्यवस्थेतील दोष
कायम राखण्यातच प्रस्थापितांचे हितसंबंध गुंतलेले असतात. त्यामुळे हे दोष दूर
करण्याची कोणतीही व्यवस्था आपल्याकडे दिसत नाही. थोडक्यात, व्यवस्था सदोष ठेवण्यात
प्रस्थापितांचे हितसंबंध गुंतलेले असतात. त्यामुळे व्यवस्था तशीच सदोष राहणे हे त्यांच्या
हिताचे असते. तथापि अशा सदोष व्यवस्थेतून
तणाव आणि त्यातून प्रस्थापितांविरुद्ध असंतोष निर्माण होऊ शकतो. असा असंतोष
प्रस्थापितांच्या दृष्टीने घातक ठरू शकतो. म्हणूनच असे घातक परिणाम टाळण्यासाठी
प्रस्थापित मंडळी तणावनियमनाचे कार्यक्रम आखत असतात. हे कार्यक्रम करताना हे तणाव
कसे अपरिहार्य आहेत, हेही सामान्य लोकांच्या मनांवर बिम्बविण्याचा प्रयत्न होताना
दिसतो. असे करून जनतेमध्ये व्यवस्थेविरुद्ध असंतोषच निर्माण होणार नाही, याची
काळजी घेतली जाते.
एकेकाळी लोकमाण्यांसारखे
नेते लोकांच्या मनांत व्यवस्थेविरुद्ध असंतोष निर्माण करण्याचे काम करीत होते;
कारण त्यांना व्यवस्था बदलायची होती. आता मात्र हा असंतोष निर्माणच होऊ नये म्हणून
तणावनियमनांच्या मोहिमा हाती घेतल्या जातात; कारण आताच्या नेत्यांना ही सदोष
व्यवस्था टिकवायची असते.
No comments:
Post a Comment