Sunday 30 October 2016

दिवाळी आणि बळी राजाचे स्मरण.

प्राचीन काळापासून भारतात संस्कृतीचे दोन मुख्य प्रवाह अविरतपणे वाहत आहेत, हे आपल्या वेळोवेळी प्रत्ययाला  येते. या दोन धारा परस्परांशी संघर्ष करीत तसेच समन्वय साधित किंवा एक दुसऱ्यावर जबरदस्ती करीत आपले मार्गक्रमण करीत असल्याचेही  दिसून येते. बळी राजाची प्रसिद्ध कथा ही वस्तुस्थिती अधिक प्रकर्षाने समोर आणते.

वेदोत्तर काळात विष्णू ही देवता इतर देवतांच्या तुलनेत अधिक प्रमाणात मान्यता पावलेली होती. त्यामुळेच विष्णूचे दशावतार सर्वप्रसिध्द आहेत. या दशावताराच्या कथेवर बहुतांश हिंदूंचा विश्वास व श्रद्धा असते. दुष्ट निर्दालनासाठी आणि धर्मसंस्थापनार्थ विष्णू अवतार घेत असतो, अशी हिंदूंची श्रद्धा असते. वामनावतार हा विष्णूचा पाचवा अवतार असल्याची पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. तत्कालीन प्रसिद्ध व सामर्थ्यवान असलेल्या बळी राजाला पाताळात दडपणे हे या अवताराचे प्रयोजन. त्यासाठी बळीविरोधी परंपरेला वामनाचे स्वतंत्र पुराणही बनवावे लागले. तथापि या परंपरेला बहुजनांच्या हृदयसिंहासनावर आरूढ झालेल्या बळीराजाला  तसूभरही हलविता आलेले नाही. वामन हा ब्राह्मणी परंपरेचा प्रतिनिधी तर बळी राजा हा बहुजनांचा आदर्श राजा. आपली परंपरा सामर्थ्यशाली आणि दृढ करण्यासाठी विरोधी परंपरेतील श्रेष्ठ आदर्श स्वपरंपरेच्या अवगुंठनात आपलेसे करणे किंवा अशा आदर्शांना नेस्तनाबूत करणे अशी कृत्ये परंपरा करीत असतात. बहुजनांचा प्रभावशाली बळी राजा हा ब्राह्मणी परंपरेच्या विकासातील फार मोठा अडथळा बनला होता. या अडथळ्याला पाताळात दडपण्याची ब्राह्मणी परंपरेची गरज बनली होती. त्यातूनच वामनावतार व त्याची कथा यांची निर्मिती झाली असावी. परतू ही कथा तिच्या निर्मितीचे प्रयोजन साध्य करू शकली नाही. वामनाच्या आराधनेऐवजी लोक बळीचीच आठवण मोठ्या प्रमाणात साजरी करतात. दिवाळी अर्थात बलिप्रतिपदा हे त्याचे साक्षात उदाहरण.

“इडापिडा टळो अन बळीचे राज्य येवो”, ही इथल्या अडाणी माणसाची सदिच्छा, बळीचे भारतीय  संस्कृतीतील अढळ स्थान निश्चित करते, असे वाटते.

दिवाळीच्या निमित्ताने बळी राजाचे स्मरण करताना किंवा बळी राजाच्या स्मरणनिमित्ताने दिवाळी साजरी करताना आनंद होत आहे.

No comments:

Post a Comment