Thursday, 30 June 2016

समाज आणि स्वातंत्र्य

समाज म्हणजे सामाजिक संबंधांचे जाळे अशी समाज या संकल्पनेची व्याख्या केली जाते. समाजच काय अखिल विश्वच संबंधांचे विराट जाळे  आहे. या जगातील प्रत्येक गोष्ट, मग ती  सजीव असो की निर्जिव, परस्परांशी असलेल्या संबंधांनी जखडलेल्या असतात. त्यामुळे कोणा एकातही झालेला बदल दुसऱ्या अनेक गोष्टींतील बदलांना कारणीभूत होतो. थोडक्यात, कोणतेही कार्य स्वेच्छेनुसार करण्यास जरी आपण स्वतंत्र वाटत असलो तरी हे स्वातंत्र्य मर्यादित स्वरूपाचे आहे. या मर्यादा आपल्यात असणाऱ्या विविध प्रकारच्या संबंधांमुळे  आलेल्या असतात. या संबंधांच्या निमित्ताने हक्क, कर्तव्ये,कायदा, नियम,रूढी, नीती इत्यादी विनियमने तयार होतात. ही सर्व नियमने आपल्याला सातत्याने  नियंत्रित करीत असतात. त्यामुळे आपण स्वतंत्र आहोत हे नि:संदिग्धरीत्या म्हणता येत नाही. जे काही स्वातंत्र्य  आपण अनुभवतो ते सैल असणाऱ्या बंधनरुपी दोरांसारखे आहे..
प्रत्येकजन वरील  विनियमांचा विचार न करता या स्वातंत्र्याचा अनियंत्रित वापर करू लगला तर अखिल विश्वाची व्यवस्था नष्ट  होण्यास वेळ लागणार नाही. आजकाल आपण निसर्गाशी जुळवून घेण्यापेक्षा त्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याचे मानवी जीवनावर झालेले गंभीर परिणामही आज  आपण भोगत आहोत. माझ्या प्रत्येक कृतीचा बारा-वाईट  परिणाम इतरांवर होत आहे आणि इतरांकडून होणाऱ्या प्रत्येक कृतीचा तसाच परिणाम माझ्यावरही  होत असतो, ही गोष्ट आपण क्षणभरही विसरता कामा नये.

स्वातंत्र्यासंबंधी  दुसरा एक विचार! प्रत्येक कार्याला कारण असते हा एक प्रसिद्ध नियम आहे. याचा अर्थ आपल्या प्रत्येक कृतीचे काहीतरी कारण असले पाहिजे. याच नियमानुसार त्या कारणालाही कोणते तरी कारण असायला हवे. अशी कार्य-कारणाची अनंत शृंखला असल्याची कल्पना आपल्याला  करता येते. थोडक्यात आपल्या प्रत्येक कृतीचे मूळ कारण हे आपल्या पलीकडचे असू शकते. हे कारण आपल्या प्रभावक्षेत्राबाहेरचे असल्याने त्याचे कर्तृत्व तसेच जबाबदारी आपल्यावर येऊ शकत नाही. उलट आपण जी कृती करतो ती आपण स्वत:हून न करता ती कोणत्यातरी बाह्य कारणामुळे आपल्याकडून होत असते असे म्हणावे लागते.. याचा अर्थ आपण कोणतीही कृती करण्यास स्वतंत्र नाहीत असाच होत नाही काय?


विचार करायला काय हरकत आहे?

Tuesday, 28 June 2016

अण्वस्त्रप्रसारबंदी करारावर स्वाक्षरी केल्याशिवाय NSG मध्ये प्रवेश मिळत नाही, हे जर खरे असेल तर NSG मध्ये  प्रवेश मिळण्यासाठी मिळविल्या जाणाऱ्या आणि अनेक देशांकडून मिळत असलेल्या  पाठीम्ब्याचा काय अर्थ असेल! की हा सर्व प्रकार म्हणजे एका राजकीय नाट्याचा अविष्कार होता? भारताचा NSG मध्ये प्रवेश व्हावा असे खरोखरच या देशांना वाटत असेल तर अण्वस्त्रप्रसारबंदी करारावर स्वाक्षरी करण्याच्या अटीबद्दल या देशांचे काही मत होते असे काही वाचनात आले नाही. की पाठींबा द्यायचे नाटक आपण करायचे, प्रवेश होऊ न देण्याचे काम परस्पर चीन सारखे देश करतीलच यावर या पाठींबा देणाऱ्या देशांचा विश्वास होता?

Friday, 24 June 2016

दिनांक २२-०६-२०१६ च्या लोकसत्तामधील “जातिव्यवस्था आली कोठून?” हा शेषराव मोरे यांचा लेख वाचला. बेटीबंदी हे जातीव्यवस्थेचे व्यवच्छेदक लक्षण असले तरी तिच्यामधील श्रेष्ठ-कनिष्ठत्व, स्पर्शास्पर्शत्व ही वैशिष्ट्ये अधिक अमानवी आणि घातक आहेत. जातिव्यवस्थेचा उगम जर आदिम समाजाच्या टोळीव्यवस्थेत शोधायचा झाल्यास तिच्यातील अमानवी श्रेष्ठ-कनिष्ठत्व, स्पर्शास्पर्शत्व यांचा उगम कोठे शोधायचा, हाही प्रश्न सोडविण्याची गरज आहे. जातीव्यवस्था ही ब्राह्मणांनी निर्मिली नाही हा निष्कर्ष काढण्यासाठी मोरे यांनी तिचा उगम टोळीव्यवस्थेत शोधलेला आहे की काय, असे वाटते. जातीव्यवस्थेने भारतीय समाजाची जी हानी केलेली आहे ती तिच्यातील कप्पेबंद श्रेष्ठ-कनिष्ठत्व व  स्पर्शास्पर्शत्व यांच्यामुळे. जातीव्यवस्थेत ही वैशिष्ट्ये कशी आली हे टोळीसिद्धांताने मुळीच सिद्ध होऊ शकत नाही.

जातीव्यवस्था कोणत्याही कारणांमुळे निर्माण झालेली असली तरी तिला धर्मव्यवस्थेने पाठींबा दिला हे स्पष्ट आहे. यासाठी जरी भाकडकथांचा आधार घेतला असला तरी ते धार्मिक समर्थन होते हे लक्षात घेतले पाहिजे. जातीव्यवस्थेमध्ये श्रेष्ठ-कनिष्ठत्व कसे निर्माण झाले हे नि:संदिग्धपणे स्पष्ट करता आले नाही तरी मनुस्मृतीसारख्या स्मृतिग्रंथांनी या बाबींना मजबूत समर्थन दिलेले आहे, हे स्पष्ट आहे. त्यावेळी समाजमनावर या स्मृतिग्रंथांचा जबरदस्त पगडा होता यात शंका नाही. स्मृतिग्रंथांतील निर्देश जशास तसे अंमलात येत नसले तरी वेळोवेळी त्यांचा आधार घेतला जात असे. तेराव्या शतकात चक्रधरस्वामींच्या एका दलित भक्ताला धर्माधिकार नाही हे निश्चित करून त्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली ती शास्त्राचा आधार घेऊनच. लीळाचरित्रात या घटनेचा स्पष्ट उल्लेख आहे.

Tuesday, 21 June 2016

परकीय गुंतवणुकीला अनेक क्षेत्रे अधिकाधिक खुली केल्यामुळे काही अनिष्ट परिणाम होऊ शकतील काय, यावर विचार करण्याची गरज वाटते. भांडवल आणि तंत्रज्ञान यांच्या प्रचंड गुंतवणुकीच्या आधारावर परकीय उद्योजक येथील अर्थव्यवस्थेवर नियंत्रण प्रस्थापित करू शकतील काय, या प्रश्नाचे उत्तर सामान्यांना मिळाले पाहिजे. अवाढव्य गुंतवणूक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानापुढे येथील उद्योजक टिकाव धरू शकतील काय, यावरही शंका निर्माण होऊ शकते. मग येथील लोकांनी या परकीय उद्योगांमध्ये फक्त नोकऱ्याच करायच्या काय? त्याही या उद्योगांच्या मर्जीवर.
मर्यादित परकीय गुंतवणुकीसोबतच देशांतर्गत भांडवल वाढीसाठी प्रयत्न करणे अतिशय महत्त्वाचे वाटते. त्या दृष्टीने आपण काय करीत आहोत, यावर अर्थतज्ज्ञांनी प्रकाश पडावा, असे वाटते. 
कर्मकांड करणे हे माणसाचे वैशिष्ट्यच असते. त्यातही भारतीयांचे तर हे विशेष वैशिष्ट्य आहे. म्हणूनच आपल्याकडे प्रत्यक्ष कामापेक्षा त्याचे साजरीकरणच अधिक जोरात सुरु असते. त्याचाच परिणाम म्हणजे केलेल्या किंवा न केलेल्या कामांची पैशांची उधळपट्टी करून केलेली अमाप जाहिरात. अशा जाहिराती आपण व्यक्तिगत व सार्वजनिक पातळ्यांवर सातत्याने करीत असतो. काम सुरु करण्याआधीच शपथविधीचा कार्यक्रम जोरदारपणे साजरा करणे, उठसुठ वेगवेगळे दिन (योगदिन, स्वच्छता दिन इत्यादी), जाहीर करून साजरे करणे, योजनांची अंमलबजावणी करण्यापेक्षा त्यांचे नामकरणविधी गाजविणे यासारखे प्रकार करण्यात आपला हात कोणी धरू शकत नाही.
कामाची जाहिरात प्रत्यक्ष कामेच करतात. खरोखर कामे केली तर त्यांची वेगळी जाहिरात करण्याची आवश्यकताच निर्माण होणार नाही. उलट या जाहिरातीवर उडविला जाणारा पैसा अधिक कामे करण्यात खर्च होऊ शकेल.

विकासदराच्या अतिरेकी प्रदर्शनाबाबतीतही असेच म्हणता येईल. विकासदर हा येथील सामान्य लोकांच्या जीवनमानातून दिसून आला पाहिजे. लोकांची आर्थिक स्थिती, रोजगार, आरोग्य इत्यादी बाबी विकासदर निश्चित करीत असतात. त्यासाठी त्याची वेगळी जाहिरात करण्याची काहीच आवश्यकता नाही. हा विकासदर लोकांच्या जीवनमानात दिसला नाही तर उलट अशा जाहिराती लोकांची क्रूर थट्टा ठरू शकतात. 

Friday, 29 April 2016

भारतीय संस्कृती ही जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती असून या संस्कृतीत सर्व विज्ञानांचा व विचारांचा उच्चत्तम विकास झाला होता आणि जगातील इतर संस्कृतींनी आपल्या संस्कृतीकडूनच उसनवारी केलेली आहे, असे मानणारा गट हा आज सर्वांत प्रभावशाली गट आहे.
जगातील सर्वच संस्कृतींचा कमी-अधिक विकास घडतच असतो. त्यामुळे आमच्याच संस्कृतीत सर्व वैज्ञानिक शोध पूर्वीच लागलेले आहेत, असे म्हणणे ही स्वत:ची फसवणूक व जाणकारांची करमणूकच म्हटली पाहिजे. आधुनिक विज्ञानाने प्रत्यक्षात एखादा शोध लावला की , तो आमच्याकडे यापूर्वीच लागलेला होता, असे म्हणणे व त्याविषयक प्राचीन ग्रंथांतील एखादे उद्धरण किंवा एखादी भाकडकथा प्रस्तुत करणे  हे आपल्या पश्च्यातबुद्धीचे उदाहरण आहे. आधुनिक विज्ञानाकडून  असा शोध लागण्याआधी  तो आपल्याकडे लागला असल्याचे कोणी निदर्शनास आणून देत नाही. असा शोध लागल्यानंतरच वरील युक्तीवाद केल्या जातो. नासदीय सुकतात सृष्टीविषयक मूलगामी चिंतन आढळते. तसे महाभारतादी अनेक धर्मग्रंथांतून सृष्टीविषयी भिन्न भिन्न स्वरूपाचे व बऱ्याचवेळा परस्परविरोधी असे चिंतन आढळते. परंतु या सर्व चिंतनांमधून आम्हाला नासदीय सुक्तात उक्त चिंतनच प्रमाण आहे, असे कधी एखादा धर्मग्रंथ किंवा संस्कृतीवाचक म्हटल्याचे आढळत नाही. परंतु जेंव्हा आधुनिक विज्ञानही नासदीय सुक्तासारखेच चिंतन-विचार मांडते, हे कळले तेंव्हा नासदीय सूक्ताचा उद्घोष करण्यात आला. आणि आमच्याकडे सृष्टीविषयक सिद्धांतांची प्रगती आजच्या विज्ञानाइतकीच झाली होती, असा दावा करण्यात आला. मग इतर ग्रंथांतून सृष्टीविषयक जे उथळ चिंतन आलेले आहे त्यांचे काय करायचे हा प्रश्न या संस्कृतीप्रवाचकांना पडत नाही.
 गुरुत्वाकर्षणाची नुसती जाणीव म्हणजे विज्ञान नव्हे. गणिताने गुरुत्वाकर्षणाचे मोजमाप करणे हे विज्ञानाच्या प्रगतीला आवश्यक आहे. केवळ परमाणुची कल्पना करणे पुरेसे नाही. त्याचे स्वरूप, त्याची रचना, त्याची गती इत्यादी बाबी शोधून काढणे याला विज्ञान म्हटले जाते.

याचा अर्थ भारतीय संस्कृतीत उल्लेखनीय असे काहीच नाही काय? खरे तर अशा बऱ्याच अभिमानयोग्य गोष्टी आपल्याकडे आहेतच. भौतिक सुखाचा उत्कटतेने स्वाद घेण्याची प्रेरणा देणारे, प्राचीन ऋषींच्या प्रतिभालावण्याने नटलेले जगातील सर्वांत प्राचीन साहित्य म्हणजे वेद, ही आपली अभिमानवस्तु आहे. समकालीन सर्व वैद्यकशाखांमध्ये सर्वांत प्रगत असणारा आयुर्वेद ही अभिमान बाळगण्याजोगी बाब आहे. मानवीतत्त्वज्ञानाचा उच्चत्तम अविष्कार ज्यांत प्रकट झालेला आहे ती उपनिषदे आपली प्रतिमा उंचावणारीच आहेत. शून्याचा शोध लावणारे भारतीय गणितज्ज्ञ, प्राचीन शिल्पकला, धातुविद्या, रामायण-महाभारतासारखी महाकाव्ये, या गोष्टी आपल्या अभिमानाच्या विषय असायला हरकत नाही. पुराणांतील वानगी पुराणातच ठेवावीत. पुराणातील या वानगींमुळे आपल्या सद्यस्थितीमध्ये काहीही फरक पडणार नाही, हे समजून घ्यायची कधी नव्हे तेवढी  आज गरज निर्माण झालेली आहे.

Monday, 18 April 2016

दिनांक ३१-०३-२०१६ च्या लोकसत्तामधीलभारतीय सांस्कृतिक ऐक्याचे पहिले सूत्रहा लेख वाचला. वेदकाळापासून निरनिराळ्या समूहांच्या देवतांचे  वैदिक देवतांशी ऐक्य दाखवून  किंवा वेदांमध्ये बहुजनांचे देव स्थास्पित करून त्यांना वेदांत स्थान देण्याची प्रक्रिया अव्याहतपणे सुरु आहे. बहुजनांच्या या देवतांचे आर्यीकरण झाल्याने सर्वच गटांमध्ये एकप्रकारचे सांस्कृतिक ऐक्य निर्माण झाले. याच प्रक्रियेचा भाग म्हणून अगदी शक शक-कुषाणांच्या सुर्यालाही पंचायतनात स्थान दिले गेलेले आहे. त्यामुळे येथील पत्येक समूहाला आपण एका विशाल सांस्कृतिक समूहाचे एक घटक असल्याची भावना निर्माण झाली. त्यामुळे स्वत:च्या वैशिष्ट्यांची जपवणूक करूनही एकात्मकतेची भावना अनुभवता येऊ लागली.त्यामुळेच  भारतात कोणताही विशिष्ट धर्म निर्माण होताही येथे सांस्कृतिक ऐक्य निर्माण झाल्याचे श्री मोरे यांना वाटते.
बारकाईने बघितल्यास वेदोपनिषदांवर आधारित मूठभरांचा वैदिक धर्म आणि बहुजनांचा लोकधर्म हे वेगवेगळेच असल्याचे दिसून येतेविठोबा, खंडोबा, ज्योतिबा, मातृरुपातील विविध देवता या आहेत बहुजनाच्या देवता. वेदांमधून या देवतांचा आढळ होण्याचा प्रश्नच उद्भवत  नाही. परंतु  पुरोहितशाहीच्या वर्चस्वाच्या काळात पुराणांच्या माध्यमातून लोकदैवतांचे वैदिक देवतांशी ऐक्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाला यासाठी अनेक भाकडकथा निर्माण करण्यात आल्या. लोकदेवतांच्या प्रत्येक स्थानाचे स्थानमाहात्म्य रचण्यात आले आणि  अशा स्थानमहात्म्याचा संबंध कोणत्यातरी पुराणांशी जोडण्यात आला. मग ते स्थानमहात्म्य त्या पुराणात असो वा नसो. या स्थानमहात्म्याच्या निमित्ताने अनेक व्रतवैकल्ये निर्माण करण्यात आले. थोडक्यात पुरोहितांनी बहुजनांच्या  लोकप्रिय देवतांचा आधार घेवून बहुजनसमाजावर आपली पकड मजबूत केली. बहुजनसमाज आपसूक या जाळ्यात अडकत गेला. त्यालाही आपण या परंपरेचे अनादिकालापासून भाग आहोत असे वाटू लागले. यालाच मोरे भारताचे सांस्कृतिक ऐक्य मानतात. या सांस्कृतिक ऐक्यामुळे बाकी काय झाले माहित नाही, पण पुरोहितांचे भवितव्य मात्र  निश्चित झाले. एवढेच नव्हे तर  पुरोहितशाहीची  भरभराट झाली. कदाचित या सांस्कृतिक ऐक्याचा उद्देशच तसा असावा.
हे सांस्कृतिक ऐक्य निर्माण करणाऱ्यांना येथील जातीव्यवस्था मात्र दिसली नाही. ज्या समाजात या जातिव्यवस्थेमुळे अनेकांना पशूपेक्षाही हीन जीवन वाट्याला आले होते त्या समाजातील सांस्कृतिक ऐक्य काय कामाचे? अनेक राज्यांमध्ये विभागलेल्या या देशातील प्रजा आपल्या राजाशीही नाते प्रस्थापित करू शकली नव्हती. (याला अपवाद फक्त शिवाजी महाराजांचा.) त्यामुळेच परकीय आक्रमणांच्या वेळी या सांस्कृतिकदृष्ट्या एक असलेल्या प्रजेने कोणतेही राज्य वाचविण्याचा प्रयत्न केलेला नाही. अशा सांस्कृतिक ऐक्याचे गोडवे कशासाठी गायचे? असंख्य देव, रूढी, अंधश्रद्धा, जातीव्यवस्था या सांस्कृतिक बाबी समान असणारा हा समाज तथाकथित एकत्वाची बढाई मारत असला तरी या बाबींनी या समाजाला चैतन्यहीन करून टाकले आहे.
धार्मिकदृष्ट्या तरी हा समाज एक होता काय! शैव आणि वैष्णव यांच्यातील पराकोटीचा संघर्ष, बौद्धांचा जैनांचा झालेला जीवघेणा छळ या बाबी शेषराव मोरे यांचे सांस्कृतिक ऐक्य ते  दाखवितात तेवढे मोहक नाही, हेच सिद्ध करतात.

मोऱ्यांच्या सांस्कृतिक ऐक्याला एक भारत प्रस्थापित करण्यासाठी ब्रिटीशांची वाट का बघावी लागली, या प्रश्नांचे उत्तरही द्यावे लागेल. सर्वांना समान असणाऱ्या मागास रूढी, अंधश्रद्धा, जातीव्यवस्था, धर्मव्यवहारपद्धती या सारख्या बाबींनी भारतीयांमध्ये समानता निर्माण केलेली आहे. थोडक्यात या सांस्कृतिक ऐक्याचा आधार अशा बाबी ठरलेल्या आहेत. परंतु हे ऐक्य मनांचे नाही. बाहेरून बघणाऱ्यांना भारतीय समाजात एक प्रकारची समानता दिसत असली तरी भारतीयांमध्ये मात्र असंख्य भेदांची बजबजपुरी माजलेली आहे, हे स्पष्ट आहे. शेषराव मोरे यांच्या सांस्कृतिक ऐक्याने त्याच्यावर कोणताही परिणाम केलेला नाही.

भारतीयांमधील अंधश्रद्धा, जुनाट रूढी, धार्मिक कर्मकांड, जातीअधिष्ठित समाजरचना  इत्यादी सांस्कृतिक बाबींचे ऐक्य म्हणजे मोरे यांचे सांस्कृतिक ऐक्य होय.