Friday, 24 October 2014

लोकाभिमुख प्रशासनाशिवाय  लोकशाहीला पूर्णत्व येउच शकत नाही. तरीही कोणत्याही पक्षाने निवडणुकीत या विषयाला महत्त्वाचा मुद्दा बनविलेला नाही,याचे आश्चर्य वाटते.  
लोकसेवकाला  आपण लोकांचे काम करीत असतो, असे वाटण्याऐवजी आपण आपलेच काम करतो,असे वाटले पाहिजे.

Wednesday, 9 July 2014

अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी ताबडतोबीचे तसेच दूरगामी असे दोन्हीही उपाय एकाच वेळी योजणे आवश्यक आहे.
पेट्रोल- डिझेलचे दर वाढविणे अर्थव्यवस्थेसाठी अपरिहार्य असले तरी इथेनॉल मिश्रणाच्या उपायाने ही समस्या काही प्रमाणात तरी सौम्य बनविता येउ शकते. त्याच वेळी देशांतर्गत पेट्रोलियम उत्पादनासाठी संशोधनासाठी भर देणेही तेवढेच आवश्यक आहे.
कृषी क्षेत्रासाठी उत्पादन खर्चावर आधारित भाव देणे या उपायाबरोबरच कृषी क्षेत्रासंबंधित पायाभूत संरचनेसाठी मूलगामी योजना आखण्याचे व अंमलात आणण्याचेही काम करावे लागेल.
लोकांना फुकट सवलती देण्यापेक्षा त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे हे अधिक शहाणपणाचे आणि सर्वांच्याच हिताचे आहे. 
आपल्या बहुत्येक सर्व समस्या या व्यवस्थेच्या किंवा योजनेच्या  सदोष अंमलबजावनीतून उद्भवलेल्या आहेत. म्हणूनच दोष व्यवस्थेच्या रचनेमध्ये किंवा योजनांच्या स्वरूपामध्ये शोधण्यापेक्षा अंमलबजावनीतच शोधला पाहिजे.
कार्यात्मक व्यवस्थेची अंमलबजावणी १००% क्षमतेने केली गेली तर उद्दिष्टे  पूर्ण होण्यात मदत तर होईलच , परंतु योजनेत किंवा व्यवस्थेत काय दोष आहेत , हेसुद्धा सनजेल.
उदाहरणार्थ, आपल्या करव्यवस्थेची अंमलबजावणी आपण पूर्णपणे करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला  त्यातील मुलभूत दोषही समजत नाहीत. त्यामुळे आहे त्या व्यवस्थेची अंमलबजावणीही नीटपणे होऊ शकत नाही. मग सुधारणा कोठून होणार?

Saturday, 24 May 2014

एका मतदाराच्या दृष्टीकोनातून--
मी एक मतदार-
काँग्रेसचा भ्रष्टाचार,कुशासन, अव्यवस्था, कमालीची निष्क्रियता, इत्यादी बाबींना कंटाळलो,वैतगलो.
काँग्रेस हा पक्ष कोणत्याही स्वरुपात उपयोगी नाही,या निर्णयाप्रत आलो.
तथापि काँग्रेसला पर्याय काय, या गोष्टीवर अडखळलो.
मध्येच केजरीवालांच्या रूपाने एक पर्याय दिसला आणि त्यांना मी डोक्यावर घेतले.
पण प्रचंड निराशा.
आणि एवढ्यात मोदींच्या रूपाने एक पर्याय दिसला.
नाहीतरी मला एक पर्याय हवा होताच. अशा कोणत्याही पर्यायाचा मला स्वीकार करायचा होताच.
अशावेळी मोदी प्रभावीपणे समोर आले .
मोदींचे प्रभावी सादरीकरण मला भावले.
अन माझे मत मी मोदींना सहर्ष अर्पण केले.
हे करताना  ---------
मी उमेदवार कोण हे फारसे लक्षात घेतले नाही.
उमेदवाराचे चारित्र्य आणि कर्तृत्वही पाहिले नाही.
भ्रष्टाचाराकडेही थोडा कानाडोळाच केला.
एवढेच काय, दुसऱ्या पक्षाच्या चारित्र्यवान किंवा कर्तृत्ववान उमेदवाराकडेही दुर्लक्षच केले.
आश्चर्य म्हणजे मी उमेदवाराची जातही पाहिली नाही.
तसेच हे करताना ---
रुपयाचे अवमुल्यन, गंभीर स्वरूप धारण करणारी व्यापार तुट, सामाजिक समरसता, संपत्तीचे न्यायोचित वितरण या बाबत कोण काय बोलले किंवा  किंवा कोण काहीच बोलले नाही, याकडेही  दुर्लक्षच केले.
कारण ---
मला कोणत्याही परिस्थितीत काँगेसला पर्याय हवा होताच.

Tuesday, 20 May 2014

पंडित  नेहरू यांची पुण्यतिथी नुकतीच पार पडली.  भारत-चीन संघर्ष , काश्मीर प्रश्न , त्यांचे तथाकथित व्यक्तिगत चारित्र्य या सारखे विषय घेऊन त्यांच्यावर टीका करणे ही अलीकडील फ्याशन झालेली आहे. आज आपण पंडित नेहरुविषयी वेगळा विचार करूयात.
तत्कालीन भारताच्या आर्थिक- सामाजिक स्थितीचा विचार करून नेहरूंनी भारताचा आर्थिक विकास ही प्राथमिकता निश्चित केली. खाजगी क्षेत्रातील भांडवलाचा अभाव लक्षात घेऊन त्यांनी मिश्र अर्थव्यवस्थेचा अंगीकार करणे स्वाभाविकच होते. आज जरी मिश्र अर्थव्यवस्था कालबाह्य वाटत असली तरी त्या काळाची  ती आवश्यकता असल्याचे त्यांनी ओळखले होते. तत्कालीन मागासलेपणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार तसेच विज्ञान संशोधनाला प्राधान्य देऊन सरकारी क्षेत्रात पायाभूत उद्योग सुरु केले. आपल्या देशाची  कृषी प्रधानता लक्षात घेऊन मोठमोठी  धरणे बांधण्यास सुरुवात केली.
आर्थिक विकासाला पोषक स्थिती निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी अलीप्ततावादाचा पुरस्कार केला. थोडक्यात, संरक्षणविषयक प्रश्न त्यांनी अलिप्ततावादाच्या सहाय्याने सोडविण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन भारताच्या आर्थिक दुरावस्थेच्या पार्श्वभूमीवर संरक्षणविषयक प्रश्न सोडविण्याचा एवढा सुलभ व स्वस्त असा दुसरा पर्याय त्यांच्यापुढे नव्हता.
आर्थिक विकास ही प्राथमिकता निश्चित करून त्या ध्येयाला वाहून घेतल्यामुळे त्यांचे इतर प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले. यात काश्मीर प्रश्न तसेच चीनचा धोका यांचाही समावेश होता. त्यामुळे नेहरू विरोधकांच्या टीकेचे धनी झाले. तथापि त्यांनी त्यावेळी निश्चित केलेली प्राथमिकता ही त्यांच्या दूरदृष्टीची द्योतक होती. त्यामुळेच नवभारताची उभारणी करण्यात नेहरूंचे योगदान अतुलनीय अशा स्वरूपाचे होते हे  मानले पाहिजे.

Wednesday, 30 April 2014

मानवी समाजातील बहुत्येक समस्या या शोषणातून निर्माण होतात. शोषणाची आवश्यकता चंगळवादाच्या आकर्षणातून निर्माण होते.
तर मग या चंगळवादाचे आव्हान  पेलायचे कसे?