Friday, 1 November 2019

"सातपाटील कुलवृत्तांत"- एक अनन्यसाधारण वाचनानुभव.

"सातपाटील कुलवृत्तांत"- एक अनन्यसाधारण वाचनानुभव. 

श्री रंगनाथ पठारे यांची ”सातपाटील कुलवृत्तांत” ही नवीकोरी कादंबरी नुकतीच वाचून संपविली. जागतिक साहित्याचा दर्जा असलेली ही कादंबरी अनन्यसाधारण असा वाचनानुभव देऊन गेली. बऱ्याच काळानंतर इतकी प्रभावी कादंबरी वाचण्यात आली, यात शंका नाही.
‘स्वत:च्या कुळाचा शोध घेऊन त्याचा वृत्तांत सांगणारी कादंबरी’ असे स्थूल मानाने तिचे वर्णन करता येईल. तथापि ही कादंबरी त्याहून कितीतरी अधिक आहे आणि त्यातच तिचे अनन्यसाधारणतव आहे. या कादंबरीत लेखकाने स्वत:च्या कुलाचा शोध घेण्याबरोबरच मानवी मनाचा, विविध मानवी प्रवृत्तीचा अन संस्कृतीचाही शोध घेतलेला आहे. यादव काळापासून आतापर्यंतच्या विशिष्ट कालखंडांतील आपल्या कुळातील प्रातिनिधिक पुरुषांची कथा, त्या कालखंडाच्या राजकीय-सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीवर चितारलेली आहे. असे कालखंड आणि त्यामधील कुळपुरुषांची नावे पुढील प्रमाणे सांगता येतील.
१.       यादवकाळ म्हणजेच इसाविसनाचे तेरावे चौदावे शतक- श्रीपती
२.       सोळाव्या शतकाचा उत्तरार्ध – साहेबराव
३.       पानिपतच्या युद्धाचा काल- दासरत
४.       दुसऱ्या बाजीरावाचा उत्तरकाल- जानराव
५.       १९ व्या शतकाचा मध्यकाल- रखमाजी आणि पिराजी
६.       २० व्या शतकाचा पूर्वार्ध- शम्भूराव
७.       १९५० च्या पुढील काल – देवनाथ अर्थात कादंबरीतील लेखक
या प्रातिनिधिक कुलपुरुषांची कथा लिहिताना लेखकाने त्या काळाचीही कथा वर्णिली आहे. सातपाटील या कुळातील या पुरुषांची  आणि त्यांच्या सबंधित लोकांची कथा वाचताना त्या त्या काळातील सामाजिक-राजकीय-आर्थिक स्थितीचीही कथा सहजपणे उलगडत जाते. केवळ कथाच नव्हे तर, या कथेतील सर्व पात्रांची मनोभावना, त्यांच्या विविध प्रवृत्ती, विचार आणि त्यांचे चिंतनही या कादंबरीत अत्यंत प्रभावीपणे व्यक्त होत जाते. या निमित्ताने लेखक केवळ सातपाटील या कुलाचाच नव्हे तर, समग्र मानवी जीवनविषयक चिंतन आपल्या पुढे मांडतो. हे तत्त्वचिंतन कथेशी एकरूप झाल्याने ते प्रत्ययकारी ठरलेले आहे. या कादंबरीद्वारे वाचकांस सातपाटलांच्या इतिहासासोबातच महाराष्ट्रजीवनाच्या इतिहासाचीही अनुभूती मिळते.
या कादंबरीची भाषा हे एक तिचे मत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ही भाषा अनौपचारिक स्वरुपाची असून ती आपल्या व्यवहारातील आहे.त्यमुळे ती आपली वाटते. निवेदनातील  सहजता आणि संवादात्माकता  आपल्याला कथेशी बांधून टाकते. कादंबरीचा कोणताही भाग वाचला तरी वाचक भारीत होऊन जातो. हे भारावलेपण पुस्तक बाजूला ठेवले तरी बराच काल टिकून राहते. पहिल्या भागाच्या पहिल्याच प्रकरणातील सुरुवातीचा भागच बघा-
“शिरपती चार-चौघांसारखाच होता. म्हटलं तर थोडासा वेगळा. दोनतीनशे वस्तीच्या लहान गावात राहणारी मानसं एकमेकांपेक्षा कितीशी वेगळी असणार? .............तसं चार-चौघासारखं त्याचं लग्न सुद्धा झालेलं होतं आणि त्याला तीन-चार वर्ष वयाचा मुलगा सुद्धा होता. ते असतंच. त्यात वेगळ ते काय?”
या ग्रंथात आपल्याला अनेक आणि वेगवेगळ्या स्तरांतील माणसे भेटतात. तीही त्यांच्या चांगल्या-वाईट स्वभाववैशिष्ट्यांसह. ही माणसे तत्कालीन समाज जीवनाचे दर्शन घडवून देतात. या माणसांच्या मधून आपल्याला माणसाच्या तीव्र जीवनेच्छा प्रत्ययाला येतात. त्यापोटी माणूस करीत असलेली धडपड, साहसे, एकमेकांवरील कुरघोडी, परस्परांच्या जीवांवर उठणे, जगण्यासाठीच जीवावर उदारही  होणे, खोटेपणा, सच्चाई, कपट-कारस्थाने, मत्सर, द्वेष, प्रेम, हळुवारपणा या सर्वांचे विराट दर्शन या महाकादम्बरीमधून होत राहते.
कादंबरीतील पात्रांच्या भाषेबाबत बोलायचे झाल्यास ही भाषा सगळ्याच कालखंडात एकसारखीच दिसून येते. खरे तर कालानुरूप भाषेत सातत्याने बदल होत असतात. यादावकालातील भाषा अविकृत स्वरुपात लीलाचारीत्राच्या रूपाने आपल्यासमोर आहे. तशा सर्वच काळातील भाषेचे नमुने आपल्याला सापडू शकतात. पण असा प्रयत्न कोणी करताना दिसत नाही. दुसरे म्हणजे प्रत्येक काळातील सामाजिक पार्श्वभूमीबाबत. लेखकाने तशी पार्श्वभूमी चितारण्याचा आवर्जून प्रयत्न केलेला आहे. परंतु यादवकालाची पार्श्वभूमी जितक्या उठावदारपणे चित्रित केलेली आहे तितक्या प्रमाणात उर्वरित्त काळखंडाची केलेली क्वचितच दिसून येते.
शेवटचे म्हणजे कादंबरी वाचताना मला बऱ्याच वेळी लीळाचरित्राच्या भाषेची आठवण झालेली आहे.
कादंबरी वाचताना हिंदूची आठवण येते; पण या कादंबरीची उत्कट, उत्कंठावर्धक आणि रोमांचकारी कथा ही एक हिंदुहून वेगळी विशेषता आहे.

Saturday, 12 November 2016

भ्रष्टाचार आणि काळा पैसा!

रु. ५०० व रु.१०० च्या नोटा रद्द करण्यामागे मुख्य आणि कदाचित एकमेव उद्देश अर्थव्यवस्थेत शिरलेल्या  बनावट नोटांवर प्रतिबंध आणण्याचा असावा. हा उद्देश या निर्णयामुळे निश्चितच साध्य झालेला आहे यात शंका नाही. परंतु अर्थव्यवस्थेत प्रविष्ट असलेले  काळे धन  बाहेर काढणे हा या निर्णयामागे मुख्य उद्देश नसावा. असे वाटण्याची कारणे दोन. एक म्हणजे अर्थव्यवस्थेत असलेल्या एकूण काळ्या धनापैकी  फारच थोडा भाग नोटांच्या स्वरुपात असण्याची शक्यता आहे. असा बहुतेक पैसा हा जमीन, सोने, विदेशी चलन याच स्वरुपात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे  वरील निर्णयातून अशा स्वरूपाच्या काळ्या धनावर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही. आणि ही वस्तुस्थिती निर्णयकर्ते जाणतातच. दुसरे म्हणजे रु. ५०० व रु.२००० च्या नव्या नोटा चलनात आणणे याचा अर्थ काळा पैसा पुन्हा अर्थव्यवस्थेत आणण्याचा मार्ग खुला ठेवण्यासाराखेच  नाही काय? उलट रु.२००० च्या नोटांमुळे हा प्रवेश अधिकच सुलभ होऊ शकतो. अर्थात असा काळा पैसा बाहेर काढण्याचे किंवा तो निर्माणच होऊ न देण्याचे इतर मार्ग सरकारकडे असणार आहेत. आणि त्याची अंमलबजावणी नजीकच्या भविष्यकाळात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. परंतु आताचा निर्णय म्हणजे हा  मार्ग नाही हे सरकार जाणतेच.

भ्रष्टाचार आणि काळाबाजार दूर करायचा असेल तर रु. ५०० व रु.२०००  च्या नोटा रद्द करणे हाच महत्त्वाचा मार्ग ठरू शकतो. या नोटा एकदम रद्द करण्याऐवजी त्या हळू हळू चलनातून काढून टाकल्यास लोकांचा कल हळू हळू Cash Less व्यवहार करण्याकडे होईल. आणि राजकारणी आणि नोकरशहा यांना लाच घेणे अवघड होऊन जाईल. काळाबाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठे रोकड व्यवहार करणे सोपे राहणार नाही. आणि बँकेच्या माध्यमातून केलेल्या व्यवहारांवर सर्व प्रकारचे कर भरावे लागतील. त्यामुळे प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या  लोकांना या काळाबाजार करणाऱ्या लोकांबरोबर जी स्पर्धा करावी लागते ती कमी होऊन तिची जागा आरोग्यपूर्ण स्पर्धा घेईल. आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेची Level Playing Field ही  आवश्यक गरज पूर्ण होईल. कदाचित सरकारचे पुढील कार्यक्रम याच स्वरूपाचे असतील अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.


या निर्णयाच्या निमित्ताने एक चांगली गोष्ट दिसून आली. या नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे सामान्य लोकांची मोठी गैरसोय झालेली आहे. परंतु या निर्णयामागील उद्देश लक्षात घेऊन लोक ही गैरसोय मोठ्या धीराने सहन करीत आहेत. असे करण्यातून ते आपली देशभक्तीच सिद्ध करीत आहेत. याचा अर्थ एकंदर व्यवस्था बदलण्याच्या सरकारच्या  पुढील कार्यक्रमांनाही लोक असेच सहकार्य करू शकतात, अशी आशा बाळगायला काहीही हरकत नाही.

Sunday, 30 October 2016

दिवाळी आणि बळी राजाचे स्मरण.

प्राचीन काळापासून भारतात संस्कृतीचे दोन मुख्य प्रवाह अविरतपणे वाहत आहेत, हे आपल्या वेळोवेळी प्रत्ययाला  येते. या दोन धारा परस्परांशी संघर्ष करीत तसेच समन्वय साधित किंवा एक दुसऱ्यावर जबरदस्ती करीत आपले मार्गक्रमण करीत असल्याचेही  दिसून येते. बळी राजाची प्रसिद्ध कथा ही वस्तुस्थिती अधिक प्रकर्षाने समोर आणते.

वेदोत्तर काळात विष्णू ही देवता इतर देवतांच्या तुलनेत अधिक प्रमाणात मान्यता पावलेली होती. त्यामुळेच विष्णूचे दशावतार सर्वप्रसिध्द आहेत. या दशावताराच्या कथेवर बहुतांश हिंदूंचा विश्वास व श्रद्धा असते. दुष्ट निर्दालनासाठी आणि धर्मसंस्थापनार्थ विष्णू अवतार घेत असतो, अशी हिंदूंची श्रद्धा असते. वामनावतार हा विष्णूचा पाचवा अवतार असल्याची पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. तत्कालीन प्रसिद्ध व सामर्थ्यवान असलेल्या बळी राजाला पाताळात दडपणे हे या अवताराचे प्रयोजन. त्यासाठी बळीविरोधी परंपरेला वामनाचे स्वतंत्र पुराणही बनवावे लागले. तथापि या परंपरेला बहुजनांच्या हृदयसिंहासनावर आरूढ झालेल्या बळीराजाला  तसूभरही हलविता आलेले नाही. वामन हा ब्राह्मणी परंपरेचा प्रतिनिधी तर बळी राजा हा बहुजनांचा आदर्श राजा. आपली परंपरा सामर्थ्यशाली आणि दृढ करण्यासाठी विरोधी परंपरेतील श्रेष्ठ आदर्श स्वपरंपरेच्या अवगुंठनात आपलेसे करणे किंवा अशा आदर्शांना नेस्तनाबूत करणे अशी कृत्ये परंपरा करीत असतात. बहुजनांचा प्रभावशाली बळी राजा हा ब्राह्मणी परंपरेच्या विकासातील फार मोठा अडथळा बनला होता. या अडथळ्याला पाताळात दडपण्याची ब्राह्मणी परंपरेची गरज बनली होती. त्यातूनच वामनावतार व त्याची कथा यांची निर्मिती झाली असावी. परतू ही कथा तिच्या निर्मितीचे प्रयोजन साध्य करू शकली नाही. वामनाच्या आराधनेऐवजी लोक बळीचीच आठवण मोठ्या प्रमाणात साजरी करतात. दिवाळी अर्थात बलिप्रतिपदा हे त्याचे साक्षात उदाहरण.

“इडापिडा टळो अन बळीचे राज्य येवो”, ही इथल्या अडाणी माणसाची सदिच्छा, बळीचे भारतीय  संस्कृतीतील अढळ स्थान निश्चित करते, असे वाटते.

दिवाळीच्या निमित्ताने बळी राजाचे स्मरण करताना किंवा बळी राजाच्या स्मरणनिमित्ताने दिवाळी साजरी करताना आनंद होत आहे.

Saturday, 29 October 2016

Tuesday, 25 October 2016

चरित्र आणि आकलन-

कोणत्याही महापुरुषाचे चरित्र लिहिताना चरित्रकाराने तटस्थता तर बाळगलीच पाहिजे. त्यासोबतच तो चरित्रविषय असलेल्या महापुरुषाशी समरसही व्हायला पाहिजे. तटस्थता बाळगल्यामुळे तो त्या महापुरुषाचे विचार, कृती, उक्ती यांचे योग्य असे  मूल्यमापन करण्यात यशस्वी ठरू शकतो. आणि समरसतेमुळे त्या महापुरुषाने व्यक्त केलेले विचार केलेल्या कृती कोणत्या विशिष्ट सामाजिक-राजकीय-आर्थिक  अवस्थेत आणि कोणत्या मानसिक अवस्थेत केलेल्या आहेत याचे आकलन चरित्रकाराला होऊ शकते. कोणत्याही महापुरुषाच्या उक्ती-कृतीला त्या त्या देश-काळ-स्थितीच्या मर्यादा असतातच. चांगला चरित्रकार महापुरुषाच्या उक्ती-कृतीची मांडणी-वर्णन-मूल्यमापन करताना त्या त्या वेळची सामाजिक-राजकीय-आर्थिक अवस्था त्या महापुरुषाची मानसिक अवस्था पार्श्वभूमीवर ठेवतो. त्यामुळे वाचकाला त्या महापुरुषाचे आकलन योग्यप्रकारे होते. शाहू महाराजांचे चरित्र लिहिताना त्या काळाची राजकीय स्थिती लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण महाराजांना विशिष्ट राजकीय स्थितीच्या मर्यादेत आपले काम करावे लागलेले आहे. सावरकरांचे चरित्र लिहिताना सावरकरांची जन्माठेपेमुळे जी मानसिक अवस्था झालेली होती, ती लक्षात घेतलीच पाहिजे. म्हणजे त्यांच्या माफिनाम्याचाही अर्थ लागू शकतो तसेच त्यांचा माणूसघाणेपणाही समजून घेता येतो. फुल्यांचे चरित्र लिहिताना त्यांच्या शिक्षण ज्ञानाच्या मर्यादा आपण लक्षात घेतल्याच पाहिजेत. ते ज्या वातावरणात वाढले होते त्या वातावरणात तेवढी ज्ञान-साधणे त्यांना प्राप्त होणे शक्य नव्हते. किंवा अशी ज्ञान-साधणे मिळाली असती तरी त्यांना प्राप्त परिस्थितीत त्यांचा वापर करता आला असता काय? हे जर आपण समजून घेतले तर इंग्रजी सत्तेची वास्तविकता त्यांना समजली नाही ही बाब आपल्याला समजावून घेता येते. समाजातील सर्वात तळाशी असलेल्यांच्या उद्धाराची त्यांची तळमळ आपण समजून घेतली तर असा उद्धार करण्यासाठी इंग्रजी सत्ता अधिक अनुकूल होती, हे आपणास मान्य करावे लागेल. आणि मग इंग्रजी सत्तेविषयीची त्यांची आपुलकीही आपणास समजू शकते. मध्ययुगीन संतांची चरित्र लिहिताना संतांना असलेल्या त्या काळाच्या मर्यादा आपण लक्षात घेतल्याच पाहिजेत. आताच्या सामाजिक सुधारणांची त्यांच्याकडून अपेक्षा करणे चुकीचेच ठरेल. संतांकडून त्या काळात बुद्धिवाद, इहवाद यांची अपेक्षा करणेही  अवाजवीच म्हणावे लागेल. उगीचच आधुनिक मुल्ये त्यांना चिकटवणे अनैतिहासिकच म्हणावे लागेल. अशी मुल्ये त्यांच्या चरित्रात दाखविता आले नाहीत म्हणून  संत छोटेही ठरत नाहीत. 
या दृष्टीने विचार करता धनंजय कीर हे चरित्रकार सर्वात उजवे ठरतात, असे मला वाटते. महात्मा फुले, शाहूमहाराज, बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर यांना खऱ्या अर्थाने समजावून घ्यायचे असेल तर कीरांच्या चरित्रांना पर्याय नाही, असे मला वाटते. त्यांची चरित्रे वाचताना चरित्रनायक गुण-दोषांसहीत आपल्यासमोर स्पष्ट होतात. ही चरित्रे वाचताना आपणामध्ये  या चरित्रनायकांचे दोषही समजावून घेण्याची क्षमता निर्माण होते.
जाता जाता-

वरील पार्श्वभूमीवर आपण चरित्रनायकांना देवत्व बहाल करून या देवतांना एकेका जातीमध्ये बंद करून त्यांच्या आकलनाचे  मार्गच बंद करीत नाहीत काय?

Thursday, 13 October 2016

मानवी मूल्यांचे रोपण?

मानवजातीच्या अस्तित्वासाठी आणि संवर्धनासाठी मानवी मुल्यांवर आधारित समाजरचना प्रस्थापित होण्याची आवश्यकता आहे यात कोणाला शंका असण्याचे कारण नाही. पण ही मुल्ये कोणती आणि ती कशी रुजवायची यावर अगणित मतभेद आहेत. 

मला वाटते कोणतीही मुल्ये व्यक्तीत रुजवायची असतील तर ती तिच्या बालपणातच रुजविणे यशस्वी होऊ शकते. प्रौढ वयातील व्यक्तींसाठी कितीही संस्कार शिबिरे घ्या, त्यांचा या व्यक्तींवर काहीही परिणाम होत नाही. त्यांना फक्त त्यांचा जवळचा फायदा दिसतो. अशा फायद्याच्या गोष्टींचा मात्र त्यांच्यावर चांगलाच परिणाम दिसतो. 

बालकांची मने संस्कारित करायची असतील तर त्यासाठी प्राथमिक-माध्यमिक शिक्षण यासारखा दुसरा उपाय नाही. अर्थात सध्याच्या शिक्षणव्यवस्थेचा यासाठी काहीही उपयोग नाही. त्यासाठी प्राथमिक-माध्यमिक शिक्षणव्यवस्था  मुळापासूनच सुधारण्याचे काम सर्वात प्राधान्याने हाती घ्यायची आवश्यकता आहे.

पण या बाबीकडे कोणतेही सरकार तितक्याशा  गांभीर्याने का बघत नाही , याचे मला सातत्याने आश्चर्य वाटत आलेले आहे.

Thursday, 6 October 2016

तथाकथित देशभक्ती.

हे एक बरे आहे. एकदा पाकिस्तान विरोध व्यक्त केला किंवा पाकिस्तानला चार शिव्या दिल्या की आपल्या  देशभक्तीची परमावधी  सिध्द होते. मग आपण आपले काळे धंदे, भ्रष्टाचार, सामान्यांची लूट करायला मोकळे होतो. अशी काळी कृत्ये करण्याच्या आड अशी  देशभक्ती मुळीच येत नाही.

मला आपले उगीचच वाटत होते की देश म्हणजे देशातील माणसे. आणि त्यांचे दीर्घकालीन सामुहिक हित सातत्याने डोळ्यासमोर ठेऊन त्यासाठी प्रामाणिकपणे, भ्रष्टाचार न करता  झटणे हीच देशभक्तीची कसोटी आहे.