Sunday, 8 December 2013

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या परिणामाला Modi  Factor  पेक्षाही राज्यकर्त्याची भोंगळ आणि चुकलेली आर्थिक धोरणे, निष्क्रिय आणि दिशाहीन प्रशासन, अनिर्बंध प्रमाणात वाढलेली महागाई  आणि आकाशही व्यापणारा भ्रष्टाचार हीच कारणे महत्त्वाची ठरलेली असावीत.

इतरत्रही ''आप'' सारखा सक्षम पर्याय मिळाला तर Modi Factor ची कसोटी लागेल, यात शंका नाही.

अन्नसुरक्षा कायद्यासारख्या लोकप्रिय योजना आता लोकांना फसवू शकणार नाहीत, असे वाटते. जनसामान्याच्या जीवनात मूलगामी परिवर्तन घडवू आणणारी धोरणेच आता आकर्षक ठरतील किंवा ठरावित, असे वाटते.

हिंदुत्ववाद किंवा धर्मनिरपेक्षता या बाबीही आता फार प्रभाव टाकू शकतील , असे वाटत नाही.  राजकीय पक्षाच्या  हिंदुत्ववादाचा थोडा सकारात्मक आणि अधिक नकारात्मक आणि त्यांच्या धर्मनिरपेक्षतेचा थोडा सकारात्मक आणि थोडा  नकारात्मक,परिणामी शुन्य परिणाम होईल, असे वाटते. नवीन पिढीला यात फारसा रस नाही, हे राजकीय पक्षांनी शक्य तितक्या लवकर लक्षात घेण्याची गरज आहे. 

Sunday, 1 December 2013

जी बाब वैज्ञानिक पद्धतीद्वारे सिद्ध होऊ शकत नाही, तिला अस्तित्वात राहण्याचा अधिकार नाही. थोडक्यात अशी बाब अस्तित्वात असू शकत नाही. हा निष्कर्ष वैज्ञानिक दृष्टीकोनाची निष्पत्ती आहे.
याचा दुसरा अर्थ , ज्ञान मिळविण्याचा वैज्ञानिक पद्धतीशिवाय इतर मार्ग नाही, असाही निघतो. 
मानवी जीवनात आपल्याला आणि इतरांना असेही अनुभव आलेले असतात की , ज्यांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण करता येत नाही. याचा अर्थ या प्रकारच्या अनुभवाचे कालांतराने वैज्ञानिक स्पष्टीकरण मिळणार आहे किंवा हे अनुभव म्हणजे केवळ आभास आहेत. 
बरेच अनुभव वैज्ञानिक नियमाशी पूर्णपणे विरोधी असतात. मग ते वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार  निश्चितपणे आभास ठरतात. 
आपल्याला काय वाटते?

Monday, 25 November 2013

भारतीय कार्मावादाचा सिद्धांत माणसाची कार्यप्रेरणा  नष्ट करतो. तो त्याला निराशाग्रस्त बनवितो . अशा प्रकारची सर्वसाधारण समजूत आहे. तथापि कर्मवाद समजून घेतल्यावरही आपल्याला असेच वाटते काय, हे पाहायला हवे.
कर्मवाद थोडक्यात--
१) केलेल्या प्रत्येक मानसिक, वाचिक, शारीरिक कर्माचे चांगले- वाईट फळ मिळतेच.
२) हे फळ मागच्या किंवा या जन्मात केलेल्या कर्माचे असून ते या जन्मात किंवा पुढील जन्मात  मिळू शकते.
३) चांगल्या कर्माचे फळ चांगले आणि वाईट कर्माचे फळ वाईट मिळते.
४) याचा अर्थ चांगले फळ मिळवायचे असेल तर चांगलेच कर्म करावे लागते
५) आपण सध्या दु:खात  असूत तर आपण आपल्या पूर्वी केलेल्या वाईट कर्माचे नियत फळ भोगत आहोत, असे समजावे. त्यासाठी इतरांना  दोष देण्याचे कारण नाही .
६) दु:खाच्या  परिस्थितीतही आपण चांगलेच काम करीत राहिलो तर आपल्याला या चांगल्या कामाचे फळ पुढे निश्चितपणे मिळणारच आहे. याचा अर्थ , दु:ख भोगून संपणारच आहे आणि चांगली स्थिती येणारच आहे .
७) आपण वाईट परिस्थितीत असताना वाईट वागलो तर आपली प्राप्त परिस्थितीतून विशिष्ट वेळी सुटका होइलही . परंतु आपण या परिस्थितीत असताना केलेल्या वाईट कर्माचे फळ आपणास पुढे निश्चितच मिळणार आहे.
कर्मवादाच्या वरील स्वरूपामुळे मला जगण्याचे पुढील तत्त्वज्ञान प्राप्त होऊ शकते.--
१) वाईट परिस्थितीत किंवा दु:खातही चांगले कर्म करणे मुळीच सोडू नये.
२) आपल्यावर इतर कोणामुळे दु:खी स्थिती ओढवली असली तरी सुडाची भावना न ठेवता आपण चांगलेच वागावे. कारण वाईट वागून तात्पुरते बरे वाटले तरी  पुढे दीर्घकाळाचे दु:ख ठेवलेलेच आहे.
थोडक्यात -----------
भारतीय कर्मवाद  व्यक्तीला नेहमीच चांगले कर्म करण्याची  प्रेरणा देतो.
तो व्यक्तीला कधीच निष्क्रिय किंवा निराशावादी बनवित नाही.
आपल्याला काय वाटते ? 

Wednesday, 20 November 2013

साचलेला किंवा साचू पाहणारा मानवी जीवनाचा प्रवाह प्रवाहित करणे, मानवी जीवनाची गुणवत्ता  लक्षनिय प्रमाणात वाढविणे तसेच तळातील माणसाला तिथून काढून मुख्य प्रवाहात आणणे ही आणि अशा स्वरुपाची उद्दिष्टे साध्य  करण्यात अत्युत्कृष्ट योगदान देणारी व्यक्ती ''भारतरत्न'' या पारितोषिकास पात्र ठरावी, असे वाटते .

मानवी जीवनाचे शारीरिक, मानसिक,वैचारिक,बौद्धिक, राजकीय,आर्थिक,धार्मिक, सांस्कृतिक,सामाजिक असे अनेक पैलू आहेत. मानवी जीवनाची  प्रगती म्हणूनच अशा अनेक पैलूवर अवलंबून असणे स्वाभाविक आहे.

क्रीडा , संगीत ही मानवी संस्कृतीची एकेक अंगे आहेत. केवळ कोणत्याही एका अंगाच्या प्रगतीमुळे मानवी जीवनाची सर्वंकष प्रगती होणे शक्य नाही.  अशा एकेक क्षेत्रात अत्युत्कृष्ट योगदान देणाऱ्यास त्या त्या क्षेत्रातील सर्वाच्च पारितोषिक बहाल करणे समजू शकते. परंतु "भारत रत्न '' हे पारितोषिक मात्र  मानवी जीवनाच्या सर्वंकष प्रगतीला प्रेरक ठरणाऱ्या महनीय व्यक्तीसाठी राखून ठेवणे आवश्यक आहे . अन्यथा या पारितोषिकाचे लवकरच अवमुल्यन झाल्याशिवाय राहणार नाही.

निवडणुकीवर डोळा ठेऊन लोकमताच्या लाटेवर आरूढ होणाऱ्या  नेतृत्वाकडून होणाऱ्या  या प्रकारच्या निर्णयातून देशाला काय संदेश मिळत आहे, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. लोकमत घडविणे हे नेतृत्वाचे काम आहे,लोकमताच्या लाटेवर  आरूढ होऊन खुर्च्या टिकविणे नव्हे.

या देशातील तरुण वर्ग हा स्वत:ची जबाबदारी ओळखू शकत नाही  किंवा आंधळेपणाने तो ती टाळत आहे.  कोणाला तरी देव मानून, त्याच्यामध्ये स्वत:चे प्रतिबिंब पाहणे आणि त्याच्या खांद्यावर आपले सगळे ओझे टाकून निवांत होणे, ही भारतीयांची प्रवृत्ती आहे. विभूतीपुजा  हा आपला स्थायीभाव आपल्या चिकित्सेला अवकाश देत नाही.

आपल्या श्रद्धा, आपली भक्ती, आपले प्रेम या बाबी  आपल्या  चिकित्सेतील फार मोठे अडथळे आहेत. या बाबी म्हणजे आपल्या दृष्टीपुढील झापडे असून त्यामुळे आपल्याला आपल्या पुढील मार्ग तसेच आपले हित आणि आपले भवितव्य दिसू शकत नाही.

आपला देश आज खरोखरच अंधारात चाचपडत आहे. आपली शोकान्तिका म्हणजे आपण अंधारात चाचपडतो आहोत, हेच आपल्याला कळत नाही आणि कळले तरी आपण ते मान्य करीत नाही . यालाच आपण आपला सकारात्मक दृष्टीकोन म्हणतो. 

Thursday, 3 October 2013


वारकरी संप्रदायाला ब्राह्मणांनी हायजॅक केले. वारकरी संप्रदायाचे आजचे बहुतांश नेते ब्राह्मण आहेत, हा या हायजॅकिंगचाच परिणाम आहे . ब्राह्मण महानुभाव संप्रदायाला  हायजॅक करु शकले नाहीत.मग त्यांनी या पंथाचा द्वेष व बदनामी करण्यास सुरुवात केली. हा द्वेष तरी किती करावा? तर या द्वेषाचा व बदनामीचा एक इतिहास बनला.
मला वाटते, चक्रधरस्वामींनी मनुस्मृतीप्रणीत ‘ब्राह्मणश्रेष्ठत्व’ या तत्त्वाचा नि:संदिग्धरित्या विरोध केला. तसेच त्यांनी वेदाची अपूर्णता घोषित करून देवताजानित कर्मकांडांची निरर्थकता स्पष्ट केल्यामुळे ब्राह्मणी अर्थव्यवस्थेवर संकट आणून ठेवले.
ब्राह्मणी परंपरा काहीही सहन करू शकेल. तुम्ही कोणतेही तत्त्वज्ञान मांडा, कोणत्याही देवतांची आराधना करा. त्याविषयी या परंपरेला कोणताही आक्षेप नसतो. तथापि हे सर्व ब्राह्मणश्रेष्ठत्व, वेदप्रामाण्य, वर्णाश्रम धर्म, देवताजनित कर्मकांड या बाबी मान्य करून, त्यांचे आचरण करून, किमान ही चौकट मान्य करून त्या चौकटीत करा, असा या परंपरेचा आग्रह असतो.
मनुस्मृतिप्रणीत धर्मशास्त्राच्या या गाभ्यालाच स्वामींनी स्पष्टपणे विरोध केला. असा विरोध करताना त्यांनी कोणत्याही तडजोडी केल्या नाहीत किंवा तथाकथित समन्वयाचीही भूमिका घेतली नाही. त्यासाठी त्यांनी तत्कालीन धर्मसत्तेच्या प्रचंड विरोधाला तोंड दिले.
संतांनीही देवताभक्ती आणि देवताजानित कर्मकांड यांचा खणखणीत विरोध केला. परंतु संत या बाबतीत फार आग्रही राहू शकले नाहीत. संतांच्या समन्वयवादी दृष्टिकोनाची ही निष्पत्ती होती.
त्यामुळेच ब्राह्मण वारकरी पंथाला सहजपणे हायजॅक करू शकले व त्यांनी या पंथाला सनातनी धर्माचा एक भाग करून टाकले.
महानुभाव संप्रदायाला  हायजॅक करता आले नाही. मग परंपरेने या पंथाची पद्धतशीरपणे बदनामी करून त्याचे यशस्वीपणे खच्चीकरण केले. तडजोड करा, नाही तर उद्ध्वस्त व्हा, हे परंपरेचे धोरण आहे.
प्रसिद्ध विचारवंत प्रभाकर वैद्य यांचा ‘संतांनीसुद्धा वाळीत टाकलेला संतश्रेष्ठ चक्रधर’ हा ग्रंथ या विषयावर चांगलाच प्रकाश टाकतो.
चक्रधर स्वामींचे  विचार –
रज काळात स्त्रियांचा विटाळ मानणे अत्यंत हास्यास्पद ठरविले आणि आपल्या अनुयायांना तसे करू दिले नाही.
गाय पवित्र आणि कुत्रे अपवित्र अशा कल्पना हास्यास्पद ठरविल्या .
मातंग आणि ब्राह्मण हे दोघेही  मनुष्य देहधारीच असल्याने त्यांच्यांमधील श्रेष्ठ कनिष्ठत्व ही कल्पना निरर्थक ठरविली. आणि हे प्रत्यक्षात आणले.
स्त्री-पुरुष यांच्यातील चैतन्य एकाच प्रकारचे असल्याने त्यांच्यात भेद मानणे निरर्थक आहे, असे मानले.
कर्मकांड , व्रतवैकल्ये यांचा विरोध केला. देवताभक्ती अनुपयोगी असल्याचे सांगितले.
शेवटी—
देव धातूचा नव्हे
देव पाषाणाचा नव्हे
देव काष्ठाचा नव्हे
देव मातीचा नव्हे
देवा पटीचा(वस्त्राचा ) नव्हे
देव चित्रीचा नव्हे
      धातूचा तो झिजेल
      पाषाणाचा तो फुटेल
      काष्ठाचा तो मोडेल
      मातीचा तो  विरेल
      पटीचा तो फाटेल
      चित्रीचा तो पुसेल
            देव तो अच्छेदू अभेदू की.

                  इति चक्रधर .