Tuesday 19 July 2016

तणावनियमनाचे गौडबंगाल.

सध्याच्या वेगवान युगात मानसिक तणाव अपरिहार्य आहेत आणि त्यामुळे त्यांच्या नियमनाचेच काम फक्त आपण करू शकतो, अशी बहुत्येकांची धारणा झालेली आहे. या तणावांपैकी बहुत्येक तणाव मुळातूनच दूर करता येऊ शकतात, याची कोणाला कल्पनाही करायची गरज वाटत नाही.

बहुत्येक तणावांचा उगम हा आपल्या आधुनिक विचारसरणीत सापडतो. त्याचप्रमाणे तो  आपल्या सदोष व्यवस्थेचीही देन आहे. व्यवस्थेतील दोष दूर केल्यास असे तणाव मुळातूनच नाहीसे करता येऊ शकतात. परंतु व्यवस्थेतील दोष कायम राखण्यातच प्रस्थापितांचे हितसंबंध गुंतलेले असतात. त्यामुळे हे दोष दूर करण्याची कोणतीही व्यवस्था आपल्याकडे दिसत नाही. थोडक्यात, व्यवस्था सदोष ठेवण्यात प्रस्थापितांचे हितसंबंध गुंतलेले असतात. त्यामुळे व्यवस्था तशीच सदोष राहणे हे त्यांच्या  हिताचे असते. तथापि अशा सदोष व्यवस्थेतून तणाव आणि त्यातून प्रस्थापितांविरुद्ध असंतोष निर्माण होऊ शकतो. असा असंतोष प्रस्थापितांच्या दृष्टीने घातक ठरू शकतो. म्हणूनच असे घातक परिणाम टाळण्यासाठी प्रस्थापित मंडळी तणावनियमनाचे कार्यक्रम आखत असतात. हे कार्यक्रम करताना हे तणाव कसे अपरिहार्य आहेत, हेही सामान्य लोकांच्या मनांवर बिम्बविण्याचा प्रयत्न होताना दिसतो. असे करून जनतेमध्ये व्यवस्थेविरुद्ध असंतोषच निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जाते.


एकेकाळी लोकमाण्यांसारखे नेते लोकांच्या मनांत व्यवस्थेविरुद्ध असंतोष निर्माण करण्याचे काम करीत होते; कारण त्यांना व्यवस्था बदलायची होती. आता मात्र हा असंतोष निर्माणच होऊ नये म्हणून तणावनियमनांच्या मोहिमा हाती घेतल्या जातात; कारण आताच्या नेत्यांना ही सदोष व्यवस्था टिकवायची असते.

Thursday 7 July 2016

धर्मनिरपेक्षता की धर्मसमभाव?

धर्मनिरपेक्षता व  सर्वधर्मसमभाव हे दोन्ही शब्द सामान्यपणे समान अर्थाने वापरले जातात. काटेकोरपणे बघितल्यास  हे अचूक नाही. धर्माचे अस्तित्व किंवा धर्माचे निर्देश लक्षात न घेता केलेले व्यवहार म्हणजे धर्मनिरपेक्ष व्यवहार अशी धर्मनिरपेक्षतेची व्याख्या केली जाते. यामध्ये धर्माचे मुळी अस्तित्वच लक्षात घेतलेले नसते. त्यामुळे सर्व धर्म समान मानण्याचा किंवा न मानण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सर्वधर्मसमभाव या संकल्पनेत सर्व धर्मांना समान लेखून व्यवहार केले जाणे अपेक्षित आहे. सर्व धर्मांना समान लेखने म्हणजे काय? कोणतेही राज्य एखादे धोरण ठरविते किंवा एखादा कार्यक्रम आखते तेंव्हा ते सर्व धर्मांना समान लेखते असा त्याचा अर्थ करावा लागेल. परंतु राज्य एखादी कृती करण्याचे ठरविते किंवा कृती करते तेंव्हा ती कृती सर्व धर्मांना सारखी ठरू शकत नाही. समान नागरी कायद्यासारखा निर्णय हा हिंदूंपेक्षा मुसलमानांना अधिक नाराज करणारा ठरतो. राज्याची ही कृती मुसलमानांना सर्वधर्मसमभाव या संकल्पनेच्या विरोधी वाटेल. थोडक्यात, सर्व धर्मांना समान ठरेल अशी कृती राज्याकडून होणे एकंदर कठीणच ठरते. राज्याला सर्व धर्मांना सारखेच जवळ करता येणे शक्य नाही; पण सर्व धर्मांना सारखेच दूर मात्र ठेवता येईल. सर्वधर्मसमभाव या संकल्पनेला धर्मनिरपेक्षतेच्या जवळ याच अर्थाने आणता येईल. पण त्यामुळे सर्वधर्मसमभाव या संकल्पनेचा भोंगळ असला तरी आकर्षक असा अर्थ आपल्याला करता येणार नाही.

Secular या शब्दाचा मूळ अर्थ मात्र वरीलप्रमाणे नाही. या साल्पनेचा उगम युरोपात झालेला आहे. तेथे केवळ ख्रिश्चन धर्मच अस्तित्वात होता. हा धर्म(तसे सगळेच धर्म) म्हणजे स्वर्गप्राप्तीचे साधन समजले जातो. थोडक्यात, धर्म म्हणजे जीवनविषयक विशिष्ट अशी पारलौकिक विचारसरणी होय. धर्मनिरपेक्ष दृष्टीकोन म्हणजे या पारलौकिक दृष्टीकोनाच्या निरपेक्ष, खरे तर विरूद्धच असा ऐहिक दृष्टीकोन होय. या अर्थाने धर्मनिरपेक्ष राज्य हे इहवादी असते. अशा राज्याच्या दृष्टीने परलोक अशी काही गोष्ट नसतेच. 

धर्मनिरपेक्षता व  सर्वधर्मसमभाव या संकल्पनांचा वरीलप्रमाणे सैद्धांतिक अर्थ होत असला तरी आपल्या देशात कोणती संकल्पना उपयुक्त ठरेल यावर सुद्धा विचार करणे आवश्यक आहे. भारतीय समाज, मग तो हिंदू असो किंवा  मुस्लीम किंवा इतर कोणताही धर्माचा असो,  हा विशेषत्वाने धर्माने प्रभावित आहे. त्याच्या वैयक्तिक किंवा सामाजिक जीवनात धर्म महत्त्वाची भूमिका बजावत असतो. या  समाजाला विशिष्ट दिशेने प्रवृत्त करायचे असेल तर किंवा त्याला आपलेसे करायचे असेल तर राज्य किंवा राजकीय पक्ष त्याच्या  धार्मिक भावनेला चुचकारण्याचे काम करताना दिसतात. विशिष्ट धार्मिक दृष्टीकोन असणाऱ्या पक्षाला येथे यश मिळण्याची शक्यता निर्माण होते. आणि नास्तिक विचारसरणी असणारे समाजवादी पक्षासारखे लोक लोकांना प्रभावी करण्यात मागे पडतात. आपल्या भारतीय समाजाला धार्मिक दृष्टीकोन असणारे नेते आपले वाटतात. ते आपल्या धार्मिक भावनेची सुरक्षा करतील यावर समाजाचा विश्वास वाटतो. उलट विवेकवादी नेते रुक्ष आणि परके वाटायला लागतात. यासाठी म्हणूनच सर्वधर्मसमभाव या संकल्पनेचा आधार घेतल्या जातो. तथापि या प्रयत्नात विशिष्ट धर्माचे लांगूलचालन किंवा ढोंगीपणा केंव्हा सुरु होतो याचे भान राहत नाही. सर्वच धार्मिक समूहांना हा ढोंगीपणा चांगलाच कळतो. त्यमुळे हे समूह या ढोंगी लोकांपासून दूर जातात.कोन्ग्रेससारख्या पक्षाच्या ऱ्हासाचे कारण यातही शोधता येईल काय? 

वरील पार्श्वभूमीवर इथल्या नेत्यांना सामाजिक समरसतेशी अजिबात तडजोड न करता, नि:पक्षपातीपणे धार्मिक समूहांशी   समरस होऊन, त्यंना विश्वासात घेऊन त्यांच्या धार्मिक भावनांना व विश्वासांना योग्य वळण देण्याचे काम करता येणे शक्य आहे. या अर्थाने भारतीय समाजात सर्वधर्मसमभाव या संकल्पनेचा चांगला उपयोग करता येईल.

Tuesday 5 July 2016

काळ स्वतंत्रपणे अस्तित्वात आहे काय?

हे विश्व म्हणजे संबंधांचे विशाल जाळे आहे. हे विश्वरुपी जाळे  म्हणजे केवळ वर्तमानकालीन अस्तित्व नव्हे. भूत आणि भविष्यासहित वर्तमान अस्तित्व म्हणजे हे विश्व! थोडक्यात, आपले संबंध हे वर्तमानातील सर्व घटकांशी तर आहेतच, पण ते भूतकालीन व भविष्यकालीन अस्तित्वाच्या प्रत्येक घटकांशी आहेत. असे असेल तर, आपण आपल्या सभोवताली असलेल्या कोणत्याही घटकांपासून तर स्वतंत्र नाहीतच , पण भूतकालीन व भविष्यकालात  असणाऱ्या   घटकांपासूनही  स्वतंत्र नाहीत, असे म्हणावे लागेल.

कधी कधी वाटते, भूत, वर्तमान आणि भविष्य असे काळाचे प्रकार नसावेतच. काळ हा अनंत विस्तार असलेले व्यापक अस्तित्व असून भूत, वर्तमान व भविष्य हे आपल्या सापेक्षतेने जाणवणारे काळाचे भाग असावेत. आपल्या सीमित क्षमतेला एका वेळी यातील एकच  भाग अनुभवाला येत असावा. जणू काही आपण अनंत विस्तारित काळामध्ये प्रवास करित  आहोत. प्रवासात मागे पडलेले स्थळ हे पुढील स्थळी गेल्यानंतर दिसेनासे होते..तसेच भूतकाळाचे होत असेल काय?  प्रवास करताना मागे पडलेले आणि पुढे येणारे अशी दोन्हीही स्थळे अस्तित्वात असतात. फक्त ती आपल्या वर्तमानकालीन अनुभवात नसतात. तसेच भूतकाळ व भविष्यकाळाचे असेल काय? थोडक्यात, घडून गेलेल्या, घडत असलेल्या व घडल्या जाणाऱ्या घटना एकाच वेळी अस्तित्वात असून आपल्या अनुभवाला मात्र  क्रमाक्रमाने येत असाव्यात काय? 

दुसराही एक विचार! काळ हा मुळी अस्तित्वातच नसावा. घडणाऱ्या घटनांमुळे आपण काळाची कल्पना करतो. काळातून सर्व घटना काढून घेतल्या तर शेवटी काय उरेल? तरीही निरुपाधिक असा काळ राहील काय? मग अशा अस्तित्वाला काय अर्थ राहील ? काहीही असो , आपण अशा काळाची कल्पना मात्र करू शकतो. मात्र असा काळ सर्वव्यापक आणि विभू असला पाहिजे. विभू म्हणजे सर्वव्यापक व अनंत विस्तारित असा. आपण काळाला गतिमान या स्वरुपात कल्पितो. परंतु विभू असणारा काळ गतिमान असू शकत नाही. कारण काळाने सर्व अवकाशच व्यापलेला असतो. आपणच  अशा विभू काळात प्रवास करीत आहोत काय? 

अनंत विस्तारित अशा काळाची आपण कशी कल्पना करायची? कदाचित काळ आणि अवकाश हे अस्तित्वाचेच अभिन्न घटक आहेत की काय?  घटना, पदार्थ अस्तित्वात आले की, त्यासोबतच अवकाश व काळ येत असेल. आणि पदार्थ व घटना काढून घेतल्या की काळ व अवकाश संपुष्टात येत असेल काय?  मग काळ व अवकाश यांचे स्वतंत्र अस्तित्व मानण्याचे काय करण उरेल? फक्त त्यांची कल्पना करता येते म्हणून?