Saturday 1 November 2014

Wakeup: लोकाभिमुख प्रशासनाशिवाय  लोकशाहीला पूर्णत्व येउच श...

Wakeup: लोकाभिमुख प्रशासनाशिवाय  लोकशाहीला पूर्णत्व येउच श...: लोकाभिमुख प्रशासनाशिवाय  लोकशाहीला पूर्णत्व येउच शकत नाही. तरीही कोणत्याही पक्षाने निवडणुकीत या विषयाला महत्त्वाचा मुद्दा बनविलेला नाही,या...

आजकाल लोक फार धार्मिक झाल्याचे आढळून येते. पण ते खरेच धार्मिक आहेत काय? ते खरोखरच देव मानतात काय?

देवाला मानणे  म्हणजे केवळ देवाचे अस्तित्व मानणे नव्हे. एक सर्वशक्तिमान,सर्वसाक्षी व न्यायी असे व्यापक अस्तित्व म्हणजे देव होय. अशा देवाला आपण खरोखरच मानतो काय? कारण आपण अशा देवाला मनात असतो तर आपल्या हातून वाईट गोष्टी घडल्याच नसत्या. कारण असा देव सर्वसाक्षी असतो आणि त्याला काळा बाजार, फसवणूक,भ्रष्टाचार,खोटेपणा,दांभिकता या बाबी दिसणारच.  तसेच तो सर्वशक्तिमान असल्यामुळे अशा वाईट गोष्टीसाठी तो आपल्याला शिक्षा करणारच.  देव मानणाऱ्याने हे मानलेच पाहिजे. किंबहुना, असे मानले तरच तो देव मानतो, असे मानायला हवे. असा आस्तिक माणूस वाईट कृत्ये करणे शक्यच नाही. म्हणून मला वाटते वाईट कृत्ये करण्यात लाज न बाळगणारी तथाकथित धार्मिक मनसे खऱ्या अर्थाने धार्मिक नसतातच. ते देवालाही आपल्यासारखेच करप्ट समजत असावेत. असा देव अस्तित्वात असू शकत नाही. आणि अशा देवाला देव तरी कसे मानता येईल. त्यामुळे भ्रष्टाचार, खोटेपणा,लुबाडणूक, दांभिकता करून देवाच्या मंदिरात जाऊन केलेली प्रार्थना निरर्थकच ठरणार. अशी आराधना न केलेली बरी. तुमची देवावर खरोखरच श्रद्धा असेल तर तुम्ही वाईट वागूच शकत नाही. सद्गुण अंगी बाणविण्याची प्रक्रिया म्हणजेच देवाची आराधना होय. बाकी सगळे व्यर्थ होय.

वाईट कामे करून धार्मिकतेची आस धरणारी व्यक्ती देव आणि धर्म यांची थट्टा करते, यात शंका नाही.

आजचा काळ मुखवट्याचा आहे. तुम्ही आत कसेही असा. मुखवटे मात्र आकर्षक असावेत. जनसामान्यांनाही याचे काही वाटत नाही. उलट लोक अशा मुखवट्याची देवघरात ठेऊन पूजा करतात.

भारतीय नोकरशाहीची कार्यपद्धती भारतीय लोकशाहीशी मुळीच सुसंगत नाही. महत्त्वाचे म्हणजे याचे कोणालाही काही वाटत नाही. लोकाभिमुख प्रशासनच लोकशाहीला अर्थ प्राप्त करून देते. परतू आपले प्रशासन लोकाभिमुख असल्याचा कोणत्याही नागरिकाला अनुभव नाही. भारतीय नोकरशाही स्वतःला ब्रिटीश सत्तेचा वारस समजते की काय, असे वाटण्याची स्थिती आहे.
नोकरशाही आणि लोक यांची उद्दिष्टे समान असायला हवीत. लोकांची कामे करणे हे नोकरशाहीचे उद्दिष्ट असायला हवे. परंतु नोकरशाही लोकांना वेगळ्या व विरोधी गटात असल्याचे समजते. आणि लोकांची कामे करून आपण लोकांवर उपकार करतो, अशी भावना बाळगत असल्याचे दिसते. खरे तर लोकांची कामे होण्यात लोकांना जितकी आतुरता असते तितकीच आतुरता नोकरशाहीला लोकांची कामे करण्यात असली पाहिजे. लोकांची कामे ही आपलीच कामे असून ती नाही झाली तर नोकरशाहीला अस्वस्थ व्हायला हवे. शेवटी लोक व नोकरशाही ही एकाच गटातील असून एकाच उद्दिष्टासाठी कामे करतात, हे मानले पाहिजे.

सर्व समाजघटकांनी आपापल्या भूमिका व्यवस्थितपणे व प्रामाणिकतेने पार पाडल्या तर वेगळी समाजसेवा करण्याची कदाचित गरज पडणार नाही. तथापि आपल्याकडे, स्वभूमिका पार पाडण्यात कसूर करायचा आणि त्याव्यतिरीक्त समाजसेवा करण्याचा आव आणायचा, असा दांभिकता दर्शविणारा प्रकार सर्वत्र आढळतो.

कॉंग्रेसच्या सर्वसमावेशकतेमुळे राष्ट्रवादीचा अप्रत्यक्ष फायदा होतो, नव्हे ती तरुण जाते. राष्ट्रवादीमधील मराठाप्राधान्य सर्व जगाला स्पष्ट आहे. त्यामुळे मराठेतर समाज राष्ट्रवादीकडे संशयानेच बघतो. तथापि कॉंग्रेस पक्ष आपली सर्वसमावेशकता आपल्या ध्येयधोरनांतूनच नव्हे तर कृतीतूनही बऱ्यापैकी स्पष्ट करतो. त्यामुळे मराठेतर समाजाचे ध्रुवीकरण होणे कठीण जाते. परंतु जेथे आणि जेंव्हा हा मराठा जातिवाद प्रबळ होईल तेथे आणि तेंव्हा मराठेतर समाजाचे ध्रुवीकरण अटळ ठरते. हिंगोली मतदारसंघातील राजीव सातव यांचा विजय या ध्रुवीकरणाचीच परिणती आहे, असे म्हणता येईल काय?